शंकराचार्यांचा मठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्यातल्या नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात शंकराचार्यांचा मठ आहे. केवळ या मठात आदि शंकरार्यांची मूर्ती आहे, म्हणून हा शंकराचार्यांचा मठ[१] म्हणून ओळखला जातो. मूर्ती संगमरवरी असून एका छोट्या देवळात तिची स्थापना केलेली आहे. मूर्तीसमोर वैशिष्ट्यपूर्ण बाण (उभा दंडगोल) असलेले एक शिवलिंग आहे. समोर एक संगमरवरी नंदी आहे. [२]

पुण्यातल्या या शंकराचार्यांच्या मठाची स्थापना परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांचे शिष्य शिरोळकर स्वामींनी केली. टेंबेस्वामींनी उत्तरेतील ब्रह्मावर्त अर्थात बिठूर येथे चातुर्मास केला तेव्हा त्यांना शिरोळकर भेटले. स्वामींनी शिरोळकरांना संन्यास घ्यायला लावला. त्यानंतर शिरोळकर पुण्यास आले आणि त्यांनी सन १९७९ या वर्षातील ज्येष्ठ महिन्यात या मठाची स्थापन केली. शिरोळकर स्वामी हे संकेश्वर करवीर शंकराचार्य संस्थान मठाचे २२ वे पीठाधीश होते. शिरोळकर स्वामींनंतर हा मठ एरंडेस्वामींनी चालवला. एरंडेस्वामी सन २०१० पर्यंत हयात होते.

या ‘शंकराचार्यांच्या मठा’ची जागा आणि वास्तू मूळची दिवेकरांची होती. जुन्या पद्धतीची ही जागा आजही २०१७ साली चांगल्या स्थितीत आहे. भर वस्तीत वर्दळीच्या मध्यभागी असला तरी ह्या मठातले वातावरण शांत आहे. मठात वेदपाठशाळा आहे. मंदार शहरकर हे घनपाठी तेथे वेद शिकवतात. जुनी वास्तू, सारवलेले अंगण, शांत पवित्र वातावरण, पांढरी शुभ्र गाय आणि तिचे वासरू ह्या पुणे शहरात दुर्मीळ झालेल्या गोष्टी या मठात आहेत.

महाराष्ट्रातील अन्य शंकराचार्य मठ[संपादन]

  • महाराष्ट्रात संकेश्वर-करवीर येथे ‘श्रीमद्जगद्गुरू शंकराचार्य संस्थान’ या नावाचा मठ आहे. या मठाचे सध्याचे (२०१७ सालचे) पीठाधीश राजाराम अनंत कुलकर्णी ऊर्फ सच्चिदानंद विद्यानरसिंह भारती स्वामी हे आहेत. त्यांचा या मठाचे पीठाधीश म्हणून १० जुलै २०१६ रोजी पीठाभिषेक झाला. राजाराम अनंत कुलकर्णी यांनी एरंडेस्वामींच्या आग्रहाखातर संन्यास घेतला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कैसे शुरू हुई शंकराचार्य परंपरा..देशभर में कितने मठ और कितने प्रमुख". News18 India. 25 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Srimatam starts Veda Patasala at Pune". 25 मे 2020 रोजी पाहिले.