"कर्दळीवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमह...
(काही फरक नाही)

१२:०४, २२ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.

आख्यायिका

लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते (शके १४४०), उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्यरूपाने राहत आहेत अशी समजूत आहे.

नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्‍यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.

असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने ‘आपण कोठून आलात?’ असा प्रश्न विचारला. स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत. मात्र या वेळी स्वामींनी उत्तर दिले- ‘प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. पूर्व बंगाल हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगातटाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो.’ याचा अर्थ स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून आले.