महाराष्ट्रातील वने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे. राज्यात ६१,९३५ किमी जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रात वनांखालील प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

उष्ण कटिबंधीय सदाहरित वने[संपादन]

महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मीटरदरम्यान असते. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.

आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.[ संदर्भ हवा ]

उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने[संपादन]

वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा, ऐन हे वृक्ष आढळतात.[ संदर्भ हवा ]

उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने[संपादन]

महाराष्ट्रात ही अरण्ये प्रामुख्याने ३५०-४०० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आर्द्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाची खोडे टणक असतात.[ संदर्भ हवा ]थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये[संपादन]

सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. येथील वार्षिक पर्जन्य 120 ते 160 से. मी. असते. अशी अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसवी, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इत्यादी. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैराच्या झाडापासून काथ मिळतो.[ संदर्भ हवा ]

उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने[संपादन]

ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२० से. मी.च्या दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची २५ ते ३० सें.मी.असते. ही झाडे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बेल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इत्यादींचा समावेश होतो.

उष्ण कटिबंधीय काटेरी वने[संपादन]

दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. तशी संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही वने असतात. या वनांत. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष असतात. तारवड (Cassia auriculata)सारख्या झुडुपांचा काही प्रमाणात उपयोग केला जातो.[१]महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.

प्रकार[संपादन]

सदाहरित वने[संपादन]

महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरून आढळतात. वृक्षांमध्ये जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी, वगैरे अजस्र वेली आढळतात.

आर्द्र पानझडी वने[संपादन]

घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी.पाऊस, निचऱ्याची जमीन, उष्ण तापमान यांमुळे सागवानाची झाडे असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मीटरपर्यंत असू शकते. व्यापारीदृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसवी, सावर, बीजा, हळदू, कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

शुष्क पानझडी वने[संपादन]

शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते. उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा, तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळावू लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते, औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

झुडपी व काटेरी वने[संपादन]

पठारी प्रदेशातील ८० सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील नापीक जमिनीवर अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती व त्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. या भागात बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तारवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते असून त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.[२]

संदर्भ[संपादन]

http://satishbhosale01.blogspot.com/p/blog-page_51.html

  1. ^ "महाराष्ट्रातील वने". www.clearmpsc.com. Archived from the original on 2018-10-24. 2018-10-31 रोजी पाहिले.
  2. ^ "सतीशकुमार भोसले : महाराष्ट्रातील वने". सतिशकुमार भोसले. 2018-10-31 रोजी पाहिले.