ज्ञानेश्वर मुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित आहे. जळगावच्याउत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमामध्ये शिकलेला मुलगा स्वत.च्या बुद्धीच्या जोरावर भारतीय परराष्ट्र सेवेत मोठी झेप घेतो, ही प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये जागवण्यासाठीच या आत्मकथनाचा विचार केला गेला आहे.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी (१९८४), दूर राहिला गाव (२०००), रस्ताच वेगळा धरला (२००५), स्वतःतील अवकाश (२००६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ओरिया साहित्यिक रमाकांत रथ यांच्या 'श्री राधा' या खंडकाव्याचा त्यांनी अनुवाद केला आहे.

माणूस आणि मुक्काम, रशिया - नव्या दिशांचे आमंत्रण (२००६) , ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग (२००९) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले असून ऋतु उग रही है (१९९९), अंदर एक आसमान(२००२), मन के खलिहानो में (२००५), सुबह है की होती नही (२००८) हे हिंदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे.

ज्ञानेश्‍वर मुळे हे कडोली मराठी साहित्य संघाच्या वतीने १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ३३व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

त्यांच्या कार्यावर 'जिप्सी', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' आणि 'Voyage Beyond Seas' हे धनंजय भावलेकर Dhananjay Bhawalekar ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेले माहितीपट प्रदर्शित झाले असून त्यांचे विविध देशांत प्रदर्शन देखील झाले आहे. शिवाय मुळे ह्यांनी लिहिलेल्या 'माती, पंख आणि आकाश' ह्या पुस्तकाचे ऑडिओ बुक स्टोरीटेल संस्थेने प्रकाशित केले असून त्याचे दिग्दर्शन ओंकार किंकर ह्यांनी व निर्मिती धनंजय भावलेकर मोशन पिक्चर्स व साउंड ऑफ स्टोरीज ह्या संस्थांनी केली आहे. त्यांनी सुरू केलेला 'चांगुलपणाची चळवळ' https://changulpana.com हा उपक्रम वार्षिक दिवाळी अंक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत असून त्याला लोकप्रियतादेखील मिळत आहे.