जगन्नाथ भगवान शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगन्नाथ शिंदे
जन्म जगन्नाथ भगवान शिंदे
१९०६
सोलापूर, महाराष्ट्र
मृत्यू १२ जानेवारी १९३१
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती स्वातंत्रसैनिक
धर्म हिंदू

जगन्नाथ भगवान शिंदे (१९०६-१९३१) हे सोलापुरातील स्वातंत्र्यलढ्यातील युवक नेते होते. त्यांच्यावर गाधीजींच्या आवाहनाचा प्रभाव पडला होता. त्यांना फाशी दिली गेली.

शहरातील गिरण्यांमुळे मजूर वर्गाच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. १९२५ साली कॉग्रेस कार्यकर्ते शिवलाल बोरामणीकर आणि परशुरामजी राठी यांना सिटी कोर्टाने दीड वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यावेळी कोर्टाच्या दारातच श्री शिदे यांनी निषेधाची सभा घेऊन जोरदार भाषण केले व निषेध केला. शिंदे हे तालीम संघाचे सभासद होते. हिंदू समाज शक्तिमान असावा अशी त्याची धारणा होती. युवक संघाच्या अधिवेशनातील ठरावावर त्याचे विचार स्पष्ट होतात.

  1. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले जावे. यूटीसीत प्रवेश वाढवावा, तरुणांना तीन वर्षे लष्करी शिक्षण द्यावे.
  2. जातवार मतदार संघ, जातवार प्रतिनिधी, जातवार नोकरी प्रधान्य व जाती प्रधान प्ंरातविभागणी या सर्व गोष्टी देशासाठी घातक आहेत असे या सभेचे मत आहे.
  3. विशीष्ट भावनापेक्षा राष्ट्रधर्म आदर्श आहे. देशात जातिविशिष्ट भावनांना प्राधान्य दिल्यामुळे दुही व कलह माजले आहेत.

सार्वजनिक गणपती व शिवजयंती यामध्ये श्री शिंदे हे प्रामुख्याने भाग घेत असत. बाळ गणेश मेळाव्याचे ते एक आधार होते.१० मे हा स्वतंत्र दिन म्हणून यूथ लीग साजरा करीत होते. त्यावेळी सर्वश्री शिंदे, बेके, डॉ अत्रीळीकर यांच्याबरोबर मुलांनाही भाषणाची संधी मिळत असे. [१]

मिठाचा सत्याग्रह सुरू झाल्यापासून शहरात दररोज सभा होत असत. या सभामधून काही वक्ते भडक भाषणे देत असत. याचा परिणाम हिंसाचारात होईल असे शिंदे यांना वाटत असे. त्यासाठी गिरण्या बंद पाडू नका, हुल्लडबाजी करू नका असे आवाहन त्यांनी सभांमधून केले होते. १९३० सालच्या ८ मेला जमनालाल बजाज आणि वीर नरीमन यांना अटक केल्याची बातमी सोलापुरात येऊन थडकली. त्यावेळी युवक संघाने महामिरवणूक काढली. त्यात जगन्नाथ शिंदे, कवी कुंजविहारी, तुळशीदास जाधव, मल्लप्पा धनशेट्टी, शेठ गुलाबचंद सहभागी झालेले होते. त्यादिवशी निघालेल्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. परंतु जमावातील काही लोक आणि गिरणीतील मजूर शिंदीची झाडे तोडण्यासाठी रूपाभवानी मंदिर परिसराकडे गेले, त्यावेळी हिंसाचार आणि गोळीबार झाला. परंतु त्या हिसाचारात शिंदे याचा अजिबात सहभाग नव्हता. कारण मिरवणुकीनंतर ते घरी गेले होते. परंतु सरकारच्या रोषाला ते बळी पडले. त्यांना अटक करून वयाच्या २५ व्या वर्षी फासावर लटकवून तरुणाच्या मनात दहशत बसविण्याचा प्रयत्न ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केला.

संदर्भ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ पुंडे, नीलकंठ (प्रथम आवृत्ती , मार्च २००९). मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे. सोलापूर: सुविद्या प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)