दिनकर दत्तात्रेय भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चारुता सागर या पानावरून पुनर्निर्देशित)

दिनकर दत्तात्रेय भोसले (जन्म-२१ नोव्हेंबर, इ.स. १९३०[१] मृत्यू- २९ मे, इ.स. २०११) यांनी चारुता सागर या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली.[२] सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ जवळचे मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. तिथेच त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोगवा हा मराठी चित्रपट, चारुता सागर यांच्या दर्शन या कथेवर आधारलेला आहे.[३] डॉ. चंद्रकांत पोकळे यांनी चारुता सागर यांच्या 'नागीण', 'कुठे वाच्यता नसावी', 'म्हस', 'न लिहिलेले पत्र', 'पुंगी', 'पूल', 'वाट', 'दर्शन', 'नदीपार', 'रैतूना', 'मामाचा वाडा' आदी कथांचे कन्नड भाषेत भाषांतर केलेले आहे.[४]

सुरुवातीला चारुता सागर यांनी लष्करात काम केले होते. काही दिवसांनी त्यांनी लष्करातली नोकरी सोडली आणि बिहार-बंगालमध्ये भ्रमंती केली. बंगालमध्ये फिरत असताना त्यांनी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या सर्व कादंबऱ्या वाचून काढल्या. चटर्जींच्या एका कादंबरीत एका पात्राचे नाव चारुता सागर असे आहे. ते नाव त्यांना आवडल्यामुळे त्याच नावाने त्यांनी आपले लेखन सुरू केले.[५]

चारुता सागर लेखक कसे झाले?[संपादन]

बाराव्या वर्षी आईच्या दुःखद निधनामुळे व्यथित झालेले चारुता सागर घराबाहेर पडले. कधी साधू, तर कधी बैरागी, तर कधी निव्वळ लंगोटीधारी संन्यासी बनून ते रामेश्वर, हरिद्वार, काशी असे वयाच्या २६व्या वर्षापर्यंत अखंड भटकत राहिले. गावाजवळ परतल्यावर लोणारवाडीजवळ कोंबड्या-बकऱ्यांमागे हिंडणारी मुले त्यांनी पाहिली आणि स्वयंप्रेरणेने शाळा काढली. तेथे त्यांनी एक लोणाऱ्याचा पोर-कृष्णा भेटला. त्याच्या अंगावर महिनोन्‌‍महिने एकच सदरा होता. धुतला तर फाटेल या भीतीपोटी तो कधी धुतलाच जात नसे. कृष्णा आणि अशा काही मुलांसाठी चारुता सागर यांनी शाळा काढली. पण सरकारने ही शाळा बेकायदा ठरवून ताब्यात घेतली, आणि चारुता सागर यांना गाव सोडावे लागले. लोणारवाडीच्या कृष्णावर लिहिलेली ‘न लिहिलेले पत्र’ ही चारुता सागर यांनी लिहिलेली पहिली कथा. ती साप्ताहिक ‘स्वराज्य’मध्ये प्रकाशित झाली, आणि चारुता सागर लेखक बनले.

चारुता सागर यांच्या कथा ‘सत्यकथा’मध्ये प्रकाशित व्हायच्या. त्या वाचण्यासाठी जी.ए. कुलकर्णी सत्येकथेचा ताजा अंक आणणाऱ्या पोस्टमनची वाट पहात.

त्यांची ‘मामाचा वाडा’ ही कथा त्यांच्या आजोळच्या सावर्डेगावच्या वाड्याच्या आठवणींशी जोडली गेली आहे. याच वाड्यात चारुतांचे बालपण गेले. तिथे अनेक आज्या, मावश्या यांच्या कडेवर हा लेखक मोठा झाला.

कौटुंबिक माहिती[संपादन]

चारुता सागर यांच्या पत्‍नीचे नाव मीरा, मुलींची नंदिनी, सुचेता व पौर्णिमा आणि मुलांची संदीप आणि राजेंद्र..

लेखन[संपादन]

  • नदीपार (कथासंग्रह)
  • नागीण (कथासंग्रह) - या कथासंग्रहात सोळा कथा आहेत.
  • मामाचा वाडा (कथासंग्रह) - या कथासंग्रहात चौदा कथा आहेत.

चारुता सागर यांच्यावरील पुस्तके[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • इ.स. १९७१ साली चारुता सागर यांच्या नागींण या कथेला कॅप्टन गो.गं. लिमये पुरस्काराने गौरवण्यात आले.[६]
  • इ.स. १९७७ साली चारुता सागर यांना सर्वोत्कृष्ट लघुकथाकाराचा पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संजय वझरेकर (२१ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ४ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "चारुता सागर यांच्या कथासंग्रहांचे २९ला प्रकाशन". Archived from the original on ११ फेब्रुवारी २०१४. २७ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "प्रसिद्ध कथाकार चारुता सागर यांचे निधन". २७ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "चारुता सागर यांचे साहित्य कन्नडमध्ये". २७ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ म.द. हातकणंगलेकर. "अनोखा कथा'सागर'!". Archived from the original on ११ फेब्रुवारी २०१४. २७ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "ज्येष्ठ साहित्यिक चारुता सागर यांचं निधन". २७ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]