गिरिजाबाई केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरिजाबाई केळकर (सप्टेंबर, इ.स. १८८६ - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८०) या मराठी लेखिका होत्या. यांचे पूर्वाश्रमीचे नाव दौपदी श्रीनिवास बर्वे असून त्यांचे वडील श्रीनिवास सखाराम बर्वे हे गुजरातमध्ये स्थायिक होते. गिरिजाबाईंचा जन्म त्यांच्या आजोळी मुंबई गिरगावातील आंग्ऱ्याच्या वाडीत झाला. त्यांचे आजोबा भूजच्या संस्थानिकांचे निवृत्त दिवाण विनायक नारायण भागवत हे होते. गुजराती पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांना सहावीसाठी बर्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत घातले. त्या शाळेत असताना गिरिजाबाईंनी शेजारच्या आजीबाईंना वाचून दाखविण्याच्या निमित्ताने त्यांनी हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप या पोथ्या वाचल्या. पुढे १५व्या वर्षी लग्न झाल्यानंतर गिरिजाबाई पुण्यात आल्या.

लेखन[संपादन]

वाचनाच्या आवडीतून गिरिजाबाई केळकरांनी मराठी भाषा उत्तम अवगत केली. दर शुक्रवारी हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्या स्त्रियांना घरी बोलावून वाचायला शिकवत असत. मासिकां-वर्तमानपत्रांमधील गमतीदार मजकूर त्या त्यांना वाचून दाखवत. गिरिजाबाई केसरी वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन करीत. नंतर त्यांनी लेखनही करायला सुरुवात केली. पतीला न सांगताच त्यांनी एक लेख ज्ञानप्रकाशला पाठवलला. तो संपादकांना पसंत पडून छापून आल्यावर त्यांनी नियमितपणे लेख पाठवायला सुरुवात केली. हे सर्व लेखन निनावी असे. त्याचबरोबर त्यांचे लेख ’आनंद’ या मासिकातही छापून येऊ लागले. ज्ञानप्रकाशमधील लेखांचे ’गृहिणीभूषण’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला ’आनंद’चे संपादक वासुदेवराव आपटे यांची प्रस्तावना होती.

आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाल्यावर गिरिजाबाई केळकरांनी ’पुरुषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले, आणि त्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार झाल्या.[ संदर्भ हवा ] हे नाटक खाडिलकरांच्या ‘बायकांचे बंड’ या १९०७ मध्ये रंगभूमीवर आलेल्या लोकप्रिय संगीत नाटकाला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून लिहिले होते.

भारत नाटक कंपनीच्या य.ना. टिपणीस यांनी ‘पुरुषांचे बंड’ हे नाटक रंगमंचावर आणले. हेही नाटक निनावी लिहिले असल्याने नाटक पहायला येणारे प्रेक्षक नाट्यलेखकाचा शोध घेत, पण अनेक वर्षे त्यांना हा पत्ता लागू शकला नाही. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर आले व १९१३ साली त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला श्री.कृ. कोल्हटकरांची प्रस्तावना आहे.

सामाजिक कार्य[संपादन]

पुणे सोडून पुढे जळगावला गेल्यावरही गिरिजाबाईंचे शुक्रवारच्या हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरूच राहिले. त्या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच गेली आणि १९१९मध्ये त्याचे रूपांतर ’भगिनी मंडळ’ नावाच्या संस्थेत झाले. ही खानदेशातील स्त्रियांची पहिली संस्था होय.

गिरिजाबाई केळकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आयेषा (नाटक)
  • गृहिणीभूषण भाग १ व २ (ललित लेख)
  • द्रौपदीची थाळी (आत्मचरित्र)
  • पुरुषांचे बंड (नाटक)
  • मंदोदरी (नाटक)
  • राजकुंवर (नाटक)
  • वरपरीक्षा (नाटक)
  • समाजचित्रे भाग १ व २ (वैचारिक लेखांचा संग्रह)
  • संसार सोपान (वैचारिक)
  • सावित्री (नाटक)
  • स्त्रियांचा वर्ग (स्त्रियोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचे मराठी भाषांतर)
  • हीच मुलीची आई (नाटक)

सन्मान[संपादन]

मराठीतील पहिल्या नाटककार गिरिजाबाईंना, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल इ.स. १९२८मध्ये मुंबईत भरलेल्या २३व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला.