बजाजी निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.

या बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.[ संदर्भ हवा ] त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते.

या बजाजीराव निंबाळकरांचे निधन १६८२मध्ये झाले. त्यांची समाधी फलटण गावी आहे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे. [१]

फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जाई. महाराजांच्या काळात बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तिथले जहागीरदार होते.

फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -

“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्ताप झाला. बजाजीराव ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिसर हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसांनी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”

मात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिंदू म्हणूनच केला जातो.

समकालीन पुरावे[संपादन]

१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, प्रथम त्याचा संदर्भ पाहू या - शिवभारत – अध्याय १३- श्लोक १० घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायकः | तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायकः ||

या मधे कवींद्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारतामध्ये येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे. तेव्हा शिवाजीवर फतहखानाचे संकट आले होते. कवींद्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कवींद्र परमानंद हे शिवाजीचे निकटवर्ती होते. तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.

२)निंबाळकर घराण्याची इ.स.१८२२मध्ये लिहिली गेलेली एक छोटी कैफियत बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली.तिच्यात असा एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी इ.स.१६५१मध्ये बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली. इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच असून, त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.

३) बजाजीराजे निंबाळकर अफजलखान स्वारीच्या वेळी सन १६५९मध्ये फलटण परिसरात होते.त्यांना अफजलखान याने पकडले व त्यांची सुंता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली, त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थीने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेऊन अफजलखानाने त्यांना सोडले.

ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली दिले आहे. -

” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान (अफजलखान) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस (नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले

साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे म्हसवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ” ( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )

जर इ.स १६५९मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुंता करायची धमकी देतो. तर ह्यावरून सिद्ध होते की – १६५९ च्या आधी बजाजी निंबाळकर यांची सुंता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.

पुराव्यासाठी रणजित देसाई यांनी आपल्या श्रीमान योगी पुस्तकात बजाजी यांना मुसलमान केल्याचा उल्लेख केला आहे.

|| लेखन सीमा ||

संदर्भ : http://vitthalraje.blogspot.in/2011/05/blog-post.html http://www.orkut.co.in/Interstitial?u=http://raigad.wordpress.com/&t=AJJNJUnJvPfSyx9SLACy8z_eKcT6_5t3-hVF6BHPOhTLLepkcou6qJpV89btnA5JBcIcq4CgFTjFWubyjMexdr4Egu0z4qwcLwAAAAAAAAAA

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "माळशिरसमधील 'त्या' दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या". Archived from the original on 2021-03-06. ८ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)