जिंजीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर,छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.[ संदर्भ हवा ]

जिंजी[संपादन]

तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मद्रास - धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सुमारे 121 कि.मी .तसेच तिंडीवनम्‌ - तिरुवन्नामलई हमरस्त्यावर वसलेले आहे.या किल्ल्याला ट्रॉय ऑफ थदि  ईस्ट असे संबोधले जायचे. या गावाच्या पश्चिमेस सुमारे 1.5 कि.मी. वर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे 183 मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, स्‍नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे. राजाराम महाराज या किल्ल्यात असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने दिलेला वेढा इतिहास प्रसिद्धच आहे.[ संदर्भ हवा ] संताजी घोरपडे यांनी मोगलाई फौजांना रोखून धरल्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना रायगड ते जिंजी प्रवास करता आला. शिमोगा येधे मुघलांनी जेव्हा राजाराम महाराज यांच्या सैन्या वर हल्ला केला,तेव्हा संताजीचे धाकटे बंधू बर्हिजी ह्यांनी पाठीवर बसवून राजाराम महाराजांना जिंजीस पोहोचवले.