भांडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भांड्यांचे प्रकार व त्यांची उदाहरणे[संपादन]

  • अन्नपदार्थ साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, #शकुंतला भांडे, सतेले
  • आंघोळीची भांडी : घंगाळे, तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी
  • खाद्यपदार्थ साठवायची भांडी : बरणी, डबा, डबी
  • जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा,ग्लास , चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी
  • पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ
  • पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू - मराठीतला आठाचा आकडा आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांसमोर ठेवून जोडले आणि वर काठ लावले तर दिसेल तसे दिसणारे धातूचे भांडे. कधी कधी छोट्या कमंडलूलाही गडू म्हणतात., ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी
  • पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : कळशी, कावड, घागर
  • पाणी साठवायची भांडी : कळशी, घागर, पीप, बंब, बादली
  • पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी, कर्पूर पात्र (पंचारती)-कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात.
  • बागकामाची भांडी : झारी
  • बांधकामाची भांडी : घमेले
  • भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन : शिंके/शिंकाळी
  • स्वयंपाकाला लागणारी भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किटली, किसणी, कुकर, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, नॉनस्टिक तवा, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र (श्रीखंडयंत्र), बोगणे, बुधला, तेला-तुपाची बुधली, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सालकाढणी(णे)
  • संडासात वापरायची भांडी : टमरेल

दैनंदिन जीवनात अशा वेगवेगळ्या कार्यांसाठी विविध प्रकारची भांडीही वापरली जातात. अशी विविध प्रकारची भांडी ही वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली असतात. त्यामध्ये कांशाची भांडी, चांदीची भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी, मातीची भांडी, लोखंडाची भांडी, सोन्याची भांडी, स्टीलची भांडी असे अनेक प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो. जसे की-

सोन्याची भांडी :-

सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.

चांदीची भांडी :-

चांदी हा एक शीतल धातू आहे. हा शरीराला आंतरिक थंडावा देतो. शरीर शांत ठेवतो. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.

कांशाची भांडी :

कांशाच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांशाच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांशाच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्त्वे नष्ट होतात.

तांब्याची भांडी :

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्ह संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.

पितळेची भांडी :

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्त्वे नष्ट होतात.

लोखंडाची भांडी :

लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडुरोग नाहीसा करते, शरीराला सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, काविळीला दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये, कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दूध पिणे चांगले असते.

स्टेनलेस स्टीलची भांडी :

स्टेनलेस स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत, कारण त्यांवर गरम किंवा आम्ल, कशाचीही रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे ही भांडी वापरल्याने कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने शरीराला कोणताच फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.

ॲल्युमिनिअमची भांडी :

ॲल्युमिनिअमच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीमला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. ॲल्युमिनिउमच्या कुकरमध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्वे नष्ट होतात.

मातीची भांडी :

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात की ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्वे मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.

पाणी पिण्याच्या भांड्यांविषयी “भावप्रकाश ग्रंथा”मध्ये लिहिले आहे…

जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
(भावप्रकाश, पूर्वखंडः4)

अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि ओंजळीतून पाणी पिऊ नये. [१][permanent dead link]