भीमराव गस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. भीमराव गस्ती (जन्म : यमनापूर-बेळगांव, इ.स. १९५०; - कोल्हापूर, ८ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.

शिक्षण[संपादन]

बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी यमनापूर गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील `डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली.

न्यायासाठी झगडा आणि त्यातून सुरू झालेले समाजकार्य[संपादन]

हैदराबाद येथे नोकरीदरम्यान घेतलेल्या सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. गस्ती हे अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष होते.
भीमराव गस्तींनी निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरू केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली; शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५/३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या अनेक मुली शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झाल्या. त्यांनी देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी बेळगावमधील यमनापूर येथे 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.

डॉ. भीमराव गस्ती यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आक्रोश
  • बेरड (आत्मचरित्र) : या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारासह सात अन्य पुरस्कार मिळाले.
  • सांजवारा

डॉ. भीमराव गस्ती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
  • कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
  • गोदावरी गौरव पुरस्कार, २००४
  • पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
  • बापूसाहेब विंधे वाङ्मय पुरस्कार (रत्‍नागिरी) मे १९८९.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
  • मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
  • मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
  • रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
  • समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.
  • ९व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
Dr. Bhimrao Gasti