मराठी साहित्य संमेलन, सासवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

८७वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे. फ.मुं. शिंदे संमेलनाध्यक्ष असतील. अध्यपदाचे बाकीचे तिघे उमेदवार, संजय सोनवणी, प्रभा गणोरकर आणि अरुण गोडबोले हे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी एकूण १०७० लोकांना मताधिकार होता.

मतदार[संपादन]

१४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई), विदर्भ साहित्य संघ( नागपूर) या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद (हैद्राबाद), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ( भोपाळ), गोमंतक साहित्य सेवक मंडळ (पणजी) छत्तीसगड मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाङ्‌मय परिषद (बडोदे) या संलग्न संस्थेचे १२ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे एकूण (१४+९+७००+२५०+१२+८५=) १०७० मतदार होते.

या मतदारांमध्ये ७७%, म्हणजे ८२६ पुरुष मतदार होते, तर, महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ होत्या. मराठी साहित्य परिषद (हैद्राबाद) येथील मतदारात ५०% महिला मतदार होत्या. सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद)च्या होत्या. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतिपत्‍नी दोघेही मतदार होते. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार होते. या मतदारांत २९ कुलकर्णी होते तर २८ पाटील. स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५ मतदार होते. मुस्लिम समाजाला मतदारांत अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले होते. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २० ऑगस्ट २०१३रोजी निधन झाले आहे. अध्यक्षपदाची निवडणूकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरीष पै हे दोघेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे मतदार होते.

निवडणूक[संपादन]

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदानाची अंतिम मुदत मंगळवारी १५ ऑक्टोबर २०१३ रोजी संध्याकाळी ७ वाजता संपली. १०७० मतदारांपैकी ९०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८५ टक्के होती. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांपैकी विदर्भ आणि मराठवाडा येथून प्रत्येकी १६४ आणि १५९ लोकांनी मतदान केले. फ. मुं. शिंदे यांना ४६० मते मिळाली. साहित्यिका प्रभा गणोरकर यांना ३३१ तर अन्य दोन उमेदवार अरुण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे ६० आणि ३९मते मिळाली. १७ मते अवैध असल्याने बाद झाली.

फ.मुं. शिंदे या निवडणुकीत जिंकले.