सुमित्रा भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुचित्रा भट्टाचार्य (१० जानेवारी, इ.स. १९५९:भागलपूर, बिहार, भारत - १२ मे, इ.स. २०१५:धाकुरिया, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या एक बंगाली कादंबरीकार होत्या. लहान वयापासूनच त्या लेखन करीत होत्या.

शिक्षण[संपादन]

सुचित्रा भट्टाचार्य यांनी कोलकाताच्या जोगमाया देवी कॉलेजातून पदवी घेतली. त्यानंतर लगेचच त्यांचे लग्न झाले.

कारकीर्द[संपादन]

लग्नानंतर एक दोन वर्षांतच त्यांनी परत लिखाणाला आरंभ केला. १९७८ ते १९७९ या काळात त्यांनी लघुकथा लेखन केले आणि १९८५ च्या आसपास त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या. दहा वर्षाच्या आत, आणि विशेषतः काचेर दीवाल या कादंबरीनंतर त्यांची गणना बंगालच्या प्रमुख लेखकांमध्ये होऊ लागली.

सुचित्रा भट्टाचार्य यांच्या लेखनाचे विषय मध्यम वर्गीयांचे जीवन आणि त्यात होऊ घातलेले बदल हे असत. या बदलांमुळे समाजाची मानसिकता कसकशी बदलत जाते, आणि तिच्यावर जगतीकरणाचा कसा प्रभाव पडत गेला हे त्यांच्या लेखनामधून दृग्गोचर होत असे. त्यांनी स्त्रियांच्या समस्यांवर लिहिले असले तरी त्या स्त्रीवादी लेखिका नव्हत्या.

सुचित्रा यांची वैचारिक स्पष्टता पोथीनिष्ठ नसून समाजनिष्ठच होती. म्हणून तर १९८० नंतरच्या आधुनिक बंगाली स्त्रियांचे प्रश्न त्या सहजपणे मांडू शकल्या. याच सहजपणामुळे त्यांच्या चार कथा/ कादंबऱ्यांवर निघालेले चित्रपटही लोकप्रिय झाले.

'दहन' ही त्यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीवर ऋतुपर्ण घोषने त्याच नावाचा चित्रपट बनवला.

सुचित्रा भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या[संपादन]

  • अन्यो बसंतो
  • अलौकिक सुख
  • आमी रायकिशोरी
  • आलोछाया
  • इच्छेर गाछ
  • उडो मेघ
  • काचेर दीवाल
  • काछेर मानुष
  • छेडा तार
  • जलछबी
  • दहन
  • नील घुरनी
  • परवश
  • पलवर पथ नेई
  • रंगीन पृथ्वी
  • हेमंतेर पाखी

आणि इतर

अनुवाद[संपादन]

सुचित्रा यांनी १९७९ पासून लिहिलेल्या २४ पैकी एकाही पुस्तकाचा मराठी अनुवाद झालेला नाही. चार-पाच इंग्रजी आणि आठ हिंदी अनुवाद वगळता अन्य भाषांनीही या लेखिकेची उपेक्षाच केली आणि साहित्य अकादमी अथवा देशपातळीवर महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार न मिळताच त्यांचे निधन झाले.

सुचित्रा भट्टाचार्य यांना मिळालेले स्थानिक पुरस्कार[संपादन]

  • दिल्ली सरकारचा कथा पुरस्कार (१९९७)
  • कलकत्त्याचा ताराशंकर पुरस्कार (२०००)
  • दिनेशचंद्र स्मृती पुरस्कार (२०१५)
  • कल्याणी नगराचा द्विजेंद्रलाल पुरस्कार (२००१)
  • बंगलोर राज्याकडून नंजनगुडू तिरुमलंबा पुरस्कार(१९९६)
  • भारत निर्माण पुरस्कार (२००४)
  • कलकत्ता विद्यापीठाकडून भुवन मोहिनी पदक (२००४)
  • भागलपूरचा शरद्‌ पुरस्कार (२००२)
  • साहित्य सेतू पुरस्कार (२००४)
  • शैलजानंद स्मृती पुरस्कार (२००४)