लोंगेवालाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोंगेवालाची लढाई
भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध ह्या युद्धाचा भाग
लोंगेवालाच्या लढाईत भारतीय वायुदलाने वापरलेले विमान
लोंगेवालाच्या लढाईत भारतीय वायुदलाने वापरलेले विमान
दिनांक डिसेंबर ५ - डिसेंबर ६, १९७१
स्थान लोंगेवाला, राजस्थान, भारत
परिणती भारताचा विजय
युद्धमान पक्ष
भारत भारत पाकिस्तान पाकिस्तान
सेनापती
मेजर कुलदीपसिंग चांदपुरी
विंग कमांडर एम.एस. बावा
ब्रिगेडियर तारीक मीर
सैन्यबळ
१२० सैनिक
४ हॉकर हंटर विमाने
२००० + सैनिक ६५ रणगाडे
३ विमानवेधी बंदुका
१३८ चिलखती गाड्या
बळी आणि नुकसान
२ ठार
जीपवरील तोफ
२०० + ठार
५० रणगाडे
इतिहासातील एकाच लढाईत सर्वाधिक पकडलेले रणगाडे

लोंगेवालाची लढाई १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेनापाकिस्तानी सेनेमध्ये राजस्थान सीमेवर झालेली लढाई होती. या लढाईत भारताच्या केवळ १२० सैनिकांनी पाकिस्तानच्या २,००० पेक्षा जास्त सैनिक असलेल्या मोठ्या ब्रिगेडचा आणि सुमारे ६५ रणगाड्यांचा सामना करून कडवी झुंज दिली व सकाळपर्यंत पाकिस्तानी सेनेला झुंजवत ठेवले. सकाळी भारतीय हवाईदलाने आकाशातून हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केले व लढाई जिंकली.

पार्श्वभूमी[संपादन]

१९७१ च्या शेवटी भारतीय लष्कराने आपली मोठी ताकद बांगलादेश आघाडीवर लावून जर पश्चिमेकडून पाकिस्तानने हल्ला केला तर त्या आघाडीवर पाकिस्तानला रोखून धरण्यापुरती कुमक ठेवलेली होती. नोव्हेंबर १९७१ च्या शेवटी भारतीय लष्कराने बांगलादेशच्या सीमेवर आक्रमक हल्ले चढवले व बांगलादेशच्या मुक्तीबाहिनीने देखील त्यांच्या देशांतर्गत उठाव केला. पाकिस्तानला संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नाही अशी जाणीव झाली व १९७१ च्या युद्धाला तोंड फुटले. बांगलादेशमधून केला जाणारा बचाव कुचका ठरणार होता याची पाकिस्तानला कल्पना होती म्हणून भारताला पश्विम सीमेवरून परास्त करून भारताला शरणागती पत्करायला लावायचे व नंतरच्या तहात पाकिस्तानची एकता अखंड ठेवण्यासाठी भाग पाडायचे अशी पाकिस्तानी आक्रमणाची ढोबळ आखणी होती. सरसेनापती याह्याखान यांच्या व्यक्तव्याप्रमाणे डिफेन्स ऑफ ईस्ट पाकिस्तान लाईज इन द वेस्ट (पूर्व पाकिस्तानचा बचाव पश्विम पाकिस्तानात आहे) यात हा व्यूह प्रतिबिंबित झाला होता.

पश्चिम क्षेत्र

खानच्या धोरणामुळे असे समजले गेले होते की भारताबरोबरचा खुल्या संघर्ष आंतरराष्ट्रीय दबावामुळे फार काळ टिकू शकणार नाही आणि पूर्वी पाकिस्तानाचा बचाव करणे शक्य नाही, युद्ध-प्रयत्नांवर एक वाताघातीचे साधन म्हणून शक्य तितके भारतीय क्षेत्राचे मोठे क्षेत्र म्हणून कब्जा करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी, जनरल टिक्का खानने भारतामध्ये एक आक्रमणाचा प्रस्ताव मांडला होता आणि पीएएफने "अधिलिखित अग्रक्रमाने या हल्ल्याला जास्तीत जास्त मदत देणे हे होते". आक्रमकांसाठी प्रारंभिक योजना म्हणजे कमीत कमी पीएफच्या हवाई वर्चस्वा द्वारे ज्याच्या आधारावर खानाच्या फौजा अतिवेगवान पद्धतीने भारतीय क्षेत्रात खोलवर शिरून मोक्याच्या जागा काबीज करतील. खानच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी, पीएएफने 3 डिसेंबरच्या संध्याकाळी युद्धापूर्व आक्रमणे घडवून आणली ज्यामुळे औपचारिक धुसफूस सुरू झाली. पश्चिम क्षेत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय सीमारेषाच्या जवळ रहीम यार खान हे गाव, खानच्या सैन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संवाद केंद्र स्थापन केले आणि हे खानाच्या फौजेसाठी रासादीचे सिंध - पंजाब रेल्वे मार्गावरील एक अतिसंवेदनशील केंद्र ठरले. रहिम यार खान भारतीय फौजेच्या भक्ष्यस्थानी पडल्यास सिंध आणि पंजाब प्रांतामधील रस्ते आणि रेल्वे सेवा ठप्प होऊन इंधन आणि दारूगोळ्याअभावी जो कराचीला पाठवण्यात येतो खानाच्या फौजांची कुचंबना होईल.

भारतीय युद्धकाव्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे १२व्या भारतीय तुकडीने सरकारी तला मार्गे इस्लाम गडच्या दिशेने आक्रमण करून नंतर बघ्ला मार्गे रहीम यार खान काबीज करणे असे ठरले. ह्यामुळे फक्त पंजाब प्रांतातील पाकिस्तानी बचाव अस्थिर होईल असे नाही तर जम्मू आणि काश्मीर प्रांतातील बचावसुद्धा अस्थिर होईल जेणेकरून साखरगड क्षेत्रामध्ये भारतीय आक्रमण करून तिथे अडकलेल्या पाकिस्तानी फौजांचा समाचार घेणे शक्य होईल असे ठरले.

पाकिस्तान जो पंजाब प्रांतास युद्धाचे मुख्य केंद्र समजत असे त्यांचे अतिशय उत्तम गुप्तहेर जाळे ह्या क्षेत्रात होते. त्यांनी स्वतःच्या तुलनेने कमी संख्याबळ असलेल्या सैन्यास पाठबळ म्हणून किशन गड मार्गे रामगडच्या पश्चिमेस असलेल्या विभागीय मुख्यालयाला आक्रमण करण्याचे ठरविले. पाकिस्तानी गुप्तहेरांनी स्थानिक नागरिकाच्या वेशात युद्ध क्षेत्रात घुसखोरी केली आणि माहिती पाठविणे सुरू केले. परंतु ह्या हेरांना लोंगे वाला ठाण्याची जी पूर्वी BSF ठाणी होती आणि आता पंजाब रेगीमेंतच्या कंपनीच्या अधिपत्याखाली होती तिची माहिती पुढे पाठवता आली नाही. लोंगे वाला हे पुढील मोठा भू प्रदेश आणि भारतीय फौजांना पश्चिम क्षेत्रात गुंतवून ठेवणाच्या दृष्टीने मोक्याचे ठिकाण बनले.

लोंगेवालाची चौकी[संपादन]

लोंगेवालाची चौकी ही राजस्थानातील जेसलमेर जिल्ह्यातील रामगढ येथून ३० किमी पश्विमेला आहे. रामगढ हे जेसलमेरहून साधारणपणे ६५ किमी वर पश्चिमेला स्थित आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान या चौकीची जवाबदारी २३ व्या पंजाब रेजिमेंट कडे होती. ज्याचे नेतृत्व मेजर कुलदीपसिंग चांदपुरीकडे होते. या चौकीवर १२० सैनिक एक जीपवरील तोफ तैनात होती तसेच मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची ऊंटावरील तुकडी देखील होती ज्याचे नेतृत्व कॅप्टन भैरवसिंगकडे होते. बाकिची रेजमेंट १७ किमी उत्तरेकडे साढेवाला या चौकीवर होती. १९६५ च्या युद्धात या चौकीवर मोठा हल्ला झाला होता म्हणून तेथे जास्तीची सेना तैनात केली गेली होती. लोंगेवालाची चौकी वाळूच्या एका टेकाडावर स्थित होती.त्यामुळे येथील सैनिकांना साहजिकच उंचावर असण्याचा फायदा मिळणार होता. पाकिस्तानने युद्ध सुरू व्हायच्या आधीच पेरलेल्या अनेक हेरांकरवी चौकीबद्दल बरीच माहिती काढली होती. चौकीवर केवळ १२०च सैनिक असल्याने पाकिस्तानने ही चौकी ताब्यात घेउन मग पुढे रामगढ, जेसलमेर पादाक्रांत करायचे असे प्लान केले. पटापट चौक्या पादाक्रांत करता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणगाडे व पायदळ सैनिक मोहिमेत वापरले जाणार होते.

लढाई[संपादन]

डिसेंबर ४ला युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तानने भारतीय ठाण्यांवर हवाईहल्ले आरंभले. युद्ध सुरू झाल्याची सुचना मिळताच मेजर चांदपुरीने लेफ्टनंट धरम वीर भानला आंतरराष्ट्रीय सीमेनजीक टेहळणीसाठी पाठवले. ५ तारखेच्या पहाटे पाकिस्तानी तोफखान्याने लोंगेवाला व परिसर दणाणून सोडला. तोफखान्याच्या या भडिमाराचा आसरा घेत पाकने मोठी शिबंदी व रणगाड्याची तैनात भारतीय सीमेलगत करून ठेवली. त्याच रात्री या लश्कराने लोंगेवालाच्या दिशेने कूच केले. धरमवीर यांनी लगेचच रणगाडे व पायदळ सैनिकांचा मोठा जथ्था लोंगेवालाच्या दिशेने येत आहे असे चांदपुरीला कळवले. चांदपुरीने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून चौकीवर अजून कुमक पाठवावी यासाठी विनंती केली. परंतु इतकी कुमक तडकाफडकी पाठवणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी चांदपुरीला यशस्वी माघार घेणे अथवा चौकीवर टिच्चून राहून आक्रमण थोपवण्यासाठी सांगितले व दोनपैकी काय करायचे याचा निर्णय चांदपुरीवर सोडला. चांदपुरीने चौकीवर राहून आक्रमण थोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने चौकीवरील सैनिकांना परिस्थिती सांगितली व आपला निर्णय सांगितला. त्यावेळी जर कुणाला चौकी सोडून जायचे असेल तर आत्ताच जावे, नंतर लढाईदरम्यान कोणी पळून जात असेल तर त्याला जागीच गोळी घालण्यात येईल असा इशाराही दिला. यानंतर एकमुखाने सर्वांनी येणारे आक्रमण थोपवण्याचा विडा उचलला व सर्वांनीच रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार केला. शत्रूला थोपवण्याबरोबरच शत्रूला उधवस्त करण्यासाठी चांदपुरीने भारतीय वायुसेनेकडून हवाईसंरक्षणाची मागणी केली. रणगाड्याविरुद्ध हवाईहल्ले परिणामकारक ठरले असते परंतु हवाईतळावर केवळ हॉकर हंटर विमाने होती व त्यात रात्रीच्या अंधारात उड्डाण करून आक्रमण करणे शक्य नव्हते म्हणून विंगकमांडर बावा यांनी सूर्योदय झाल्या झाल्या हवाईहल्ला चढवण्यात येईल असे सांगितले. इकडे लोंगेवालाजवळ पोचलेले पाकिस्तानी रणगाडे भारतीय सैन्याने पेरलेल्या रणगाडाविरोधी सुरूंगांची चाहूल लागल्याने अलीकडेच थबकले पण त्यांनी लांबूनच हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर पाकिस्तानी सेनापतीने शिपायांना चौकी असलेले टेकाड चढून चौकीवर एल्गार करण्यास पाठवले. चौकीखालील उतारावरून चालून येत असलेल्या शत्रूला टिपणे भारतीय सैनिकांना सोपे होते व असे अनेक हल्ले त्यांनी परतवून लावले. इकडे उंचावर खंदक खणून त्यात बसलेल्या भारतीय सैनिकांचा वेध घेणे रणगाड्यांना किंवा उखळी तोफांना अशक्य ठरले. खालून डागलेले तोफगोळे अलीकडेच पडत किंवा खंदकांवरून पलिकडे जात होते. भाजून काढणाऱ्या तोफगोळ्यांचा व गोळ्यांच्या वर्षावात भारतीयांनी जबरदस्त निर्धार दाखवला व चौकीवर ताबा मिळवू पाहणाऱ्या सैनिकांचा वेध घेत ताबा कायम ठेवला. रणगाड्यांच्या भडिमारात खंदकांमागे उभी असलेली भारतीय जीप व त्यावरील तोफ निकामी झाली परंतु त्यापलीकडे पाकिस्तानी रणगाडे फारसे नुकसान करू शकले नाहीत. येथे डाळ शिजत नाही हे पाहून पाकिस्तानी रणगाड्यांनी उत्तररात्री मोर्चा बदलला. काहींनी लोंगेवालाला वळसा घालून रामगडच्या दिशेने कूच केले तर काही किशनगड कडे निघाले. एकत्रित रणगाड्यांच्या आक्रमणाचा पाकिस्तानी बेत लोंगेवाला चौकीने पार धूळीस मिळवला. पहाटेच्या अरुणोदयाबरोबरच विंगकमांडर बावा आणि त्यांचे ४ हंटर विमानांचे पथक लोंगेवाला जवळ येउन ठेपले. त्यांच्याबरोबर एक एचएएल कृषक प्रकारचेही विमान होते. याचे काम हंटरांना रणगाडे टिपून देणे आणि दिशा दाखवणे होते. पाकिस्तानी सेनापतीने लोंगेवाला केवळ काही तासातच पडण्याचा कयास बांधलेला होता व पाकिस्तानी वायुसेनेकडून या हल्ल्यासाठी मदत मागितलेली नव्हती. यामुळे भारतीय वैमानिकांना मोकळे रान मिळाले. अचूक वेध घेत आपल्याकडील अग्निबाण आणि मोठ्या बंदूकांनी त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली व २२ रणगाडे पूर्णपणे उद्ध्वस्त केले व इतर असंख्य रणगाडे व इतर वाहने निकामी करून टाकली.

पाकिस्तानी सेनेला या हवाई हल्याचा सामाना करणे अवघड गेले. इतका वेळ चालून येत असलेली पाकिस्तानी सेना आता बचावाचे साधन पाहू लागले. परंतु उघड्या वाळवंटात त्यांना कुठेच काही संरक्षण मिळाले नाही. अजून काही वेळातच भारतीय गोटातील चिलखती दलही लोंगेवालाला येउन मिळाले व त्यांनी किशनगढकडे गेलेल्या रणगाड्यांचा समाचार घेतला. हवाई हल्ले चुकवण्यासाठी पाकिस्तानी रणगाडे स्वतः भोवती गिरक्या घेउन हल्ले चुकवू लागले. काहींना त्यात यश आले परंतु काही अधिक नुकसान टाळण्या शहाणपणा आहे हे लक्षात घेउन पाकिस्तानी सैन्याने लोंगेवाला भागातून माघार घेण्यास सुरुवात केली. परंतु तोवर बराच उशीर झाला होता. २२ रणगाडे पुर्णपणे निकामी झाले होते तर पन्नासहून अधिक भारतीय सेनेच्या ताब्यात पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही युद्धात इतकी मोठी रणगाड्यांची हानी कुठेच झालेली नाही.

१२० भारतीय सैनिक आणि पाच विमाने विरुद्ध २,८०० पाकिस्तानी सैनिक व चिलखती गाड्यां समवेत ६५ रणगाडे अशा सैन्यांमध्ये झालेल्या या लढाईत भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले तर एक जीप आणि त्यावरील तोफ निकामी झाली. पाकिस्तानने २००पेक्षा अधिक सैनिक गमावले, सुमारे ५० रणगाडे त्यांच्या हातातून गेले आणि अनेक इतर वाहने व रसद भारतीय सैन्याच्या हातात पडली.

कारणमीमांसा[संपादन]

भारतीय बाजूने लोंगेवालाला एवढे मोठे पाकिस्तानी आक्रमण होत आहे हे कळण्यास बराच वेळ लागला. भारतीय हेरखात्याचे अपयश यात अधोरेखित झाले. भारताकडे केवळ हॉकर हंटर विमाने होती. त्यांनी या युद्धात मोठी कामगीरी बजावली परंतु रात्रीच्या युद्धात ते एकदमच कुचकामी होते. म्हणूनच भारतीय सैनिकांनी सकाळपर्यंत दाखवलेली जिद्द स्पृहणीय आहे.

पाकिस्तानने लोंगेवालाचे युद्ध अतिशय खराब पद्धतीने हाताळले. मोठ्या प्रमाणावर सैन्य व रणगाडे नेउन पण पराभव पत्करावा लागला. एवढ्या मोठ्या रणगाड्यांच्या हालचालिला युद्धतंत्राप्रमाणे हवाई संरक्षण देण्याचे गरजेचे असते ते दिले गेले नाही. भारतीय हवाई हल्ला झाल्यावरही प्रतिआक्रमणात पाकिस्तानी हवाई दलाने तत्परता दाखवली नाही व परिणामी पराभव अटळ होता.

रूपांतर: चित्रपटांतील[संपादन]

या लढाईवर जे. पी. दत्ता यांनी बॉर्डर या युद्धपटाची निर्मिती केली. यात सनी देओल याने प्रमुख भूमिका केली आहे.