राजा राममोहन रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा राममोहन रॉय
जन्म राजा राममोहन रॉय
२२ मे १७७२
राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)
इंग्लंड
मृत्यूचे कारण मेंदूज्वर
निवासस्थान 1814 - कलकत्ता
टोपणनावे

आधुनिक भारताचे जनक.

प्रबोधन काळाचे पितामह
प्रशिक्षणसंस्था वेदांत महाविद्यालय - १८२५
प्रसिद्ध कामे आत्मीय सभा, ब्राह्मो समाज, सतीप्रथेविरुद्ध चळवळ
मूळ गाव राधानगरी, जिल्हा - हुगळी (पश्चिम बंगाल)
ख्याती सती बंदी, एकेश्वरवाद
कार्यकाळ १७७२ - १८३३
धर्म ब्राह्मो समाज
अपत्ये राधाप्रसाद व रामप्रसाद


राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते.[१] त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियनअरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.

पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदु धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.

घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.

मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले.

ब्राह्मो समाज[संपादन]

राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.[२] ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.

राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

राजा राममोहन रॉय यांचे वर्तमानपत्र व साहित्य -[संपादन]

  • तुहफत-उल-मुवहिद्दीन
  • वेदांत ग्रंथ (वेदांत सार)
  • संवाद कौमुदी
  • मिरात उल अखबार
  • गौडिय व्याकरण
  • 1824 साली बंगाली या भाषेत इतिहास व भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तकांचे लिखाण.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "याद आए कवि नजरूल व राजा राम मोहन राय". दैनिक जागरण. 22 मे 2018. Archived from the original on 14 जानेवारी 2021. 14 जानेवारी 2021 रोजी पाहिले.
  2. ^ अनवर, शकील (२२ मे २०१८). "राममोहन रॉय और ब्रह्म समाज" (हिंदी भाषेत). १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.

http://www.aisiakshare.com/node/328