आनंदसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री आनंदसागर
मूळ नाव गोविंद अनंत कुलकर्णी
निर्वाण सन १९०७ (नांदुरा)
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा मराठी
कार्य मराठवाड्यात रामनामाचा प्रसार, अंबड व जालना येथे राममंदिरांची स्थापना
संबंधित तीर्थक्षेत्रे जालना, गोंदवले

श्रीआनंदसागर (गोविंद अनंत कुलकर्णी) (निर्वाणः सन १९०७)

हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या आज्ञेने त्यांनी मराठवाड्यात रामनामाचा प्रसार केला.


श्रीआनंदसागर यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील मठपिंपळगाव (तालुका अंबड). वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. लहानपणापासून त्यांना दासबोधवाचनाची अत्यंत आवड होती. त्यातील सद्गुरूचे माहात्म्य वाचून त्यांना सद्गुरूभेटीची तळमळ लागली. अशात श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची मूर्ती त्यांच्या मनःचक्षूंमोर उभी राहून त्यांनी आनंदसागर यांना 'मला येऊन भेट' असा संकेत दिला. इंदूर येथे त्यांची भेट झाल्यावर श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी आनंदसागर व त्यांच्या मातोश्रींना अनुग्रह दिला.

श्रीसद्गुरूआज्ञेने त्यांनी उज्जैन येथे कठोर साधना केली. रामनामाचा साडेतीन कोटी जप त्यांनी साडेचार वर्षांत पूर्ण केला. त्यांची उच्च आध्यात्मिक अवस्था पाहून श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांचे 'आनंदसागर' असे नाव ठेवले. श्रीमहाराजांच्या आज्ञेने आनंदसागरांनी सन १८९३ साली स्वतःच्या अंबड गावी व सन १८९६ साली जालना येथे राममंदिराची स्थापना केली. त्यांची इच्छा श्रीब्रह्मानंदांप्रमाणे आजन्म ब्रह्मचारी रहावे अशी होती. पण सद्गुरूंच्या इच्छेमुळे त्यांना गृहस्थाश्रम स्विकारावा लागला. सन १९०७ साली त्यांनी नांदुरा येथे देह ठेवला.