सावित्रीबाई फुले यांची काव्य रचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९ व्या शतकात जरी मनुचे प्रती राज्य म्हणून संबोधिले गेलेल्या पेशवाईचा अंत झाला असला तरी समाजावरील त्याचा पगडा कायम होता. या काळातील समाजाचे जीवन जुन्या परंपरेच्या ठराविक चाकोरीत बंदिस्त होते. अप्रत्यक्षरित्या समाजाचे नियमन आणि संचालन तथाकथित उच्चावर्णींयांकडेच असून बहुजन वर्गास ते मान्य होते. ‘शुद्रातिशुद्र’ व ‘स्त्री’ यांचे जीवन ‘जैसे थे’ म्हणजे दुय्यम, हीन आणि दास पातळीवरच कायम होते. सार्वत्रिक शिक्षणाचा परिणाम सार्वत्रिक स्वरूपाचा नव्हता. स्त्री समस्या , स्त्रियांची खालावलेली परिस्थिती यांची जाहिरपणे चर्चा सुरू झाली असली तरी अनेक कारणांनी स्त्री मुक्ती आणि विकासासाठी कृतीशील पावले उचलली जात नव्हती. ‘स्त्री शिक्षणास’ प्रचंड विरोध असून प्रचंड भीती समाजमानसात रूजविण्यात आली होती. अशा या परिस्थितीत बहुजन वर्गातील एक कन्या स्वयंप्रेरणेने शिक्षित होते. सर्वच स्तरातील मानवांना शिक्षित करण्यासाठी कंबर कसते. स्त्रीमुक्ती आणि उद्धार या कार्यासाठी आपले आयुष्य खर्च करते. आपल्यां पतीच्या बहुजन वर्गाच्या उद्धार आणि ज्ञानप्रसार या कार्यात सहचारिणी म्हणून त्याच्या निधनानंतरही कार्यरत राहते. संसर्गजन्य रोगाची साथ पसरली असता स्वतः जातीने लक्ष देऊन अशा रूग्णांची सेवा करतानाच निधन पावते. भारताच्या इतिहासातील अशी ही स्त्री म्हणजे या राष्ट्राच्या पहिल्या स्त्री -शिक्षिका, भारतातील सत्रीमुक्तीच्या आद्य स्त्री-प्रणेत्या ‘सावित्रीबाई फुले’ यांचे कार्य खरेच अतुलनीय आहे. समाजधुरीण म्हणून सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तीत्व आणि कार्य आज इतिहासात सर्वश्रुत असले तरी मराठी साहित्याला आद्य काव्यरचनेचे अभिजात लेणेही त्यांनी बहाल केले आहे.

निसर्ग आणि कविमनाची जडणघडण : साहित्यिक ज्या वातावरणात विकसित होतो, त्या वातावरणाचा परिणाम त्याच्या सर्जनशील, संवेदनशील मनावर होत असतो.

‘‘बारा बलुती बारा अलुती कितीक जाती जमाती

शिवारात या सुखे नांदती

पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी

विहिरीवर फळेफुले गोजिरी

गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपांखरे

ऐसा निसर्ग तिथे वावरे’’

नायगाव या निसर्गरम्य खेडेगावात जन्माला आलेल्या आणि नऊ वर्षापर्यंतचे जीवन येथेच जगलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या निसर्गविषयक कविता आणि त्यांच्या रचनेतील नैसर्गिक प्रतिमा पाहता त्यांच्या कविमनावर निसर्गाचा सखोल परिणाम लक्षात येतो. निर्सगाच्या सर्जनाप्रमाणेच त्यांचे सहज, सोपे, सुलभ काव्य प्रसवते आणि बहरत जाते. त्यांच्या प्रबोधनात्मक, सामाजिक कार्याप्रमाणे त्यांचे साहित्यिक कार्य मराठी जगताला फार मोलाचे आहे.

मराठी साहित्य जगतात महदंबा, मुक्ताई, जनाबाई, बहिणाबाई, वेण्णा- आक्का यासारख्या अनेक संत स्त्रियांनी अभंगाची रचना केली. गवळणी, विरहणी, जात्यावरच्या‍ ओव्यां इ.रचना केल्या. पुढे स्त्री्लेखनाची काव्यपरंपरा ही शिवकालाच्या उत्तरार्धात खंडीत झाल्याचे आढळते. लावणीची शृंगारीकता, राजकारण याचा डोल तिने स्वींकारला नाही. शिवाय सामाजिक बंधनात तिचे अस्तित्व जखडून गेले. स्त्रीलेखनाची ही काव्यपरंपरा १९व्या‍ शतकात सावित्रीबाई फुले यांच्यात काव्यरचनेने पुन्हा प्रवाहित झाली. अर्थात स्त्रीवादी जाणीवा, प्रबोधन यांचा समावेश या काव्यात आहे. पण भक्तीची नव्हे तर आधुनिकतेची ही रचना असल्यासचे आढळते.

समग्र काव्यरचनेचा आढावा:[संपादन]

सावित्रीबाई फुले यांच्या‍ समग्र काव्यारचनेचा आढावा घेता सध्या उपलब्ध असणाऱ्या त्यांच्या साहित्यात दोन काव्यसंग्रह आढळतात. यापैकी १) ‘काव्ययफुले’ हा ४१ स्फुट कवितांनी सिद्ध आहे. तर २) ‘बावन्नकशी सुबोधरत्नाकर’ हा दीर्घ काव्यरचनेचा काव्यसंग्रह जोतीरावांचे काव्यमय चरित्रच आहे. इतिहासकारांना वा सावित्रीबाई फुले यांचा साहित्यिंक पैलू उजेडात आणणाऱ्या डॉ.मा.गो.माळी यांना यापलिकडे अन्य कोणतीही काव्यरचना सापडली नाही.

१)काव्यफुले :[संपादन]

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सन १८५४ मध्ये करण्यात आले. मिशनरी छापाचे’ मदतीने प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाला सावित्रीबाई फुले यांनी १२ ओळींची प्रास्ताविका जोडली आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, मी शब्दांची सुमने काव्यात माळीत असून ती आनंद निर्माण करणारी आहेतच. शिवाय याच्या आस्वा‍दाने वाचकाच्या‍ अंतरी शांतरसाची निर्मिती होईल. सोबतच,अर्पणिका या काव्या्तून त्यांच्या प्रसन्नच, उदार अशा अंतकरणाचे दर्शन घडते. सद्गदित हृदयाने, तृप्त भावनेनेत्या्ही ‘सुमाला’ म्हाणजे काव्यसंग्रह ‘सुजन हितकरांना’ अर्पण करतात.

‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातील रचनांच्या आधारे वर्गीकरण :-[संपादन]
अ) निसर्गविषयक :- १)पिवळा चाफा, २) जाईचे फुल, ३) जाईची कळी,४)गुलाबाचे फुल, ५) फुलपाखरू आणि फुलाची कळी, ६) मानव सृष्टी, ७) मातीची ओवी.[संपादन]
आ) सामाजिक :- १) शिकणेसाठी जागे व्हा , २) मनु म्हणे, ३) ब्रम्हवंती शेती, ४) शूद्रांचे दुखणे, ५) इंग्रजी माऊली, ६) शूद्र शब्दांचा अर्थ, ७) बळीस्तोत्र, ८) शूद्रांचे परावलंबन, ९)तयास मानव म्हणावे का? १०) अज्ञान ११) सावित्री व जोतीबा संवाद.[संपादन]
इ) प्रार्थनापर :- १) प्रास्ताविका, २) अर्पणिका, ३) शिवप्रार्थना, ४)शिवस्तोत्र,५) स्वागतपर पद्य, ६) ईशस्तवन.[संपादन]
ई) आत्म‍पर :- १) जोतिबांना नमस्काद, २) जोतीबांचा बोध, ३)आमची आऊ, ४) माझी जन्म भूमी, ५) संसाराची वाट.[संपादन]
उ)काव्यविषयक कविता :- १) द्रष्टा कवी, २) खुळे काव्य.[संपादन]
ऊ)बोधपर कविता :- १) तेच संत, २) श्रेष्ठ धन, ३) बाळास उपदेश, ४) नवस,५) बोलकी बाहुली, ६) इंग्रजी शिका, ७) सामुदायिक संवाद.[संपादन]
ए) ऐतिहासिक कविता :- १)छत्रपती शिवाजी, २)राणी छत्रपती ताराबाई.[संपादन]

काव्योफुले’ हा कविता संग्रह सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिभेचा पहिला आविष्कात असून त्याचे स्वरूप जनप्रवर्तनक्षम आहे.

२)बावन्नरकशी सुबोध रत्नाकर  :[संपादन]

दीर्घकाव्याचे स्व‍रूप धारण केलेला हा काव्यसंग्रह महात्मा फुले यांच्या निधनानंतर सन १८९१ रोजी अमरावती येथे प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर ‘वरूडचेशास्त्री बाबा चौधरी, महाजन व मोशींचे शास्त्री गोविंदस्वाडमी काळे यांनी करजगावचे सत्यशोधक समाजाचे स्वा्मी लक्ष्मण शास्त्री यांचे घरी प्रकाशित केला’, असा मजकूर आहे. या काव्याच्या अंती,‘मिती शुक्ल पक्ष १८९३, रात्री २ वाजून २० मिनिटानी ही पोथी लिहून पुरी केली’ अशी नोंद असून त्याच्या खाली सावित्री जोतिबा फुले. द. खु. अशी सही आहे. यानुसार असा एक संकेत आढळतो की, हा काव्यसंग्रह त्यांनी एका सलग अवकाशात पूर्ण केला असावा.या काव्यासंग्रहाच्या नावाबद्दल डॉ.मा.गो. माळी असे मत नोंदवितात की,“यामध्ये बावन्न कडवी असल्याने ‘बावन्नकशी’असे नाव दिले असावे.” या काव्य रचनेचा हेतू जोतीरावांचा गौरव करणे, असे प्रथमदर्शनी जरी आढळत असले तरी सखोल चिंतनात असे जाणवते की याही रचनेची निर्मिती प्रबोधनासाठीच झाली आहे.५२ कडव्याच्या या काव्याचे सहा भागांत विभाजन असून त्यातील उपोद्घात या भागात काव्यारचनेसाठी निवडलेल्या वृत्ताची माहिती देतात. त्यांनी संपूर्ण रचनेसाठी भुजंगप्रत या वृत्ताची निवड केली आहे. त्यांची ही रचना वाचताना समर्थ रामदासांच्यां मनाच्या श्लोकांची आठवण येते. या काव्य संग्रहातील दुसऱ्या – सिद्धता या भागात दस्यु लोंकाच्या कार्याचा, शौर्याचा गौरव, आर्य संस्कृतीचा अनाचार,अत्याचार, शिवशाहीचा गौरव तर तिसऱ्या भागात पेशवाईचा अनागोंदी कारभार यांचा आलेख रेखाटला आहे. त्या नंतर आंग्लाई या भागात शिक्षण, सुधारणा याबाबत माहिती देऊन त्याच्या पुढील भागात जोतीरावांच्या कार्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती एका द्रष्ट्या तत्त्वचिंतनकाची आहे. यामध्ये कुठेही पूर्वग्रह वा अतिशयोक्ती आढळत नाही. पुढे उपसंहार या भागात त्यांनी काव्य-निर्मितीचा आशय स्पष्ट करतात.जरी हे काव्यक त्यांनी ‘मनी वृत्त आखून’ लिहिले असले तरी ते ‘भ्रतारास अर्पीण्यासाठी’ नसून खऱ्या अर्थी जनकल्याणसाठीच असल्याचे आढळते.

हे ही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]