सांख्यदर्शनानुसार त्रिविध अंतःकरणाचे महत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांख्य या शब्दाच्या अनेक व्याख्या सांगितल्या आहेत. सांख्य म्हणजे ‘बुद्धि’. त्यापासून सांख्यज्ञान म्हणजे बुद्धिगम्य ज्ञान असा ही अर्थ होऊ शकतो. भगवद्गीतेत सांख्य हा प्रयोग ज्ञानमार्ग याच अर्थाने आला आहे. महाभारतात सांख्य ज्ञानाचा उल्लेख आहे. तेथे म्हटले आहे की ‘सांख्यज्ञानं प्रवक्ष्यामि परिसंख्यन्दर्शनं।’ परिसंख्यान हा शब्द विवेकज्ञान नंतर फेकून देणे किंवा त्याग करणे या अर्थाने आला आहे. सांख्य दर्शन म्हणते की, पुरुषाने आपण प्रकृतिपेक्षा भिन्न आहोत हे ज्ञान प्राप्त करून प्रकृतीला दूर करावे, तिचा त्याग करावा. सांख्य दर्शनानुसार करणे एकूण तेरा प्रकारची आहेत. ‘क्रियते अनेन इति करणं’ अशी करण या शब्दाची व्याख्या करता येइल. करण हे करक म्हणजे क्रियेशी संबंध ठेवणारे असते. पाच ज्ञानेन्द्रिये, पाच कर्मेन्द्रिये आणि तीन अन्तःकरणे (मन, बुद्धि व अहंकार) अशी एकूण तेरा करणे आहेत.

अन्तःकरणाचे महत्त्व[संपादन]

सांख्य कारिकेतील ३५व्या कारिकेत अन्तःकरणाचे महत्त्व सांगितले आहे.

सान्तःकरणा बुद्धिः सर्व विषयमवगाहते यस्मात्।

तस्मात् त्रिविधं करणं द्वारि द्वाराणि शेषाणि।।

अर्थ – ज्या अर्थी बुद्धी अन्तःकरणासहसर्व विषयांत प्रवेश करते त्याअर्थी त्रिविध अन्तःकरण हे मुख्य आणि इतर करणे दुय्यम असली पाहिजेत. द्वारचा अर्थ दरवाजा आणि द्वारि(न्) म्हणजे घर (दरावाजा असलेल घर). घर आणि दार या दोहोंत घर प्रधान म्हणजे महत्त्वाचे असते. तसेच बाह्य इन्द्रिये ही द्वारे असून गौण असतात. आणि द्वारि (त्रिविध अन्तःकरणे) जास्त महत्त्वाची असतात असे या कारिकेत सांगितले आहे.

कर्ंमेद्रियांद्वारे आपण कार्य करतो. सांख्य दर्शनात त्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. ते असे –
प्रथम विषयांच्या संपर्कात ज्ञानेंद्रिये येतात. नंतर मन आणि अहंकार यांच्या मदतीने बुद्धीला त्याचे ज्ञान होते. बुद्धी कार्याची निश्चिती करते आणि तसा आदेश कर्मेंद्रियांना दिला जातो. आणि मगच कर्मेंद्रिये आदेशानुसार क्रिया करतात. या संपूर्ण प्रक्रियेत अन्तःकरण हे नियंत्रक असते. ज्ञान प्राप्त करून तदनुसार क्रिया करण्यापर्यंत सर्व प्रक्रियेचे नियमन करते. आजच्या भाषेत अन्तःकरण हे कण्ट्रोल सिस्टम सारखे असते. सिग्नल आत्मसात करून त्याचे ज्ञान प्राप्त करून मग कार्याची निश्चिती केली जाते. आणि मगच ते कार्य पूर्ण केले जाते. यात निश्चय करण्याचे कार्य त्रिविध अन्तःकरण करते. म्हणून हे त्रिविध अन्तःकरण, इतर सर्व करणांपेक्षा श्रेष्ठ आणि महत्त्वाचे आहे.