सहस्रचंद्रदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहस्रचंद्रदर्शन हा एक धार्मिक तसेच सामाजिक समारंभ आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येऊन गेल्या की हा समारंभ करता येतो. या सहस्रचंद्रदर्शन समारंभाच्या दिवशी नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एक होमहवनादी धार्मिक विधी करण्यात येतो. त्याच दिवशी त्या १००० पौर्णिमा पाहिलेल्या वृद्ध व्यक्तीची बहुधा तुला करण्यात येते, आणि ज्या वस्तूने तुला केली गेली ती वस्तू उपस्थितांत वाटण्यात येते किंवा दान करण्यात येते.

१००० पौर्णिमा कशा मोजतात?[संपादन]

व्यक्तीच्या आयुष्यात या पौर्णिमा फक्त यायला हव्यात, त्या पौर्णिमांच्या दिवशी त्याने चंद्रदर्शन घ्यायलाच पाहिजे असे नाही.

एका वर्षात १२ पौर्णिमा येतात; ८० वर्षांच्या आयुष्यात (८० गुणिले १२=) ९६० येतात..

दर पाच वर्षांत दोन अधिक मास येतात. आणि त्या अधिकाच्या महिन्यात एक जास्तीची पौर्णिमा असते. ८० वर्षात (८० भागिले ५ गुणिले २=) ३२ अधिक मास म्हणजे तेवढ्याच जास्तीच्या पौर्णिमा येतात..

९६० + ३२ = ९९२.

१००० हा आकडा पूर्ण होण्यासाठी आणखी ८ महिने लागतात.

म्हणजे साधारणपणे व्यक्तीचे वय ८० वर्षे आणि आठ महिने झाले की त्यानंतर कधीही त्याच्या सहस्रचंद्रदर्शनाचा समारंभ करता येतो.