शिवार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माजलगाव तालुक्यात भरणारे एक दिवसाचे शिवार साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने मातीतल्या साहित्य-संस्कृतीचा जागर असतो.

इतिहास[संपादन]

सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर उद्घाटक म्हणून त्यावेळी सुप्रसिद्ध वक्ते-विचारवंत दिवंगत प्रा. राम शेवाळकर उपस्थित होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने 'शिवार' नावाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. त्या शिवार स्मरणिकेच्या निमित्ताने नंतर चर्चा सुरू असतानाच मसापचे पदाधिकारी माजी आमदार डी. के. देशमुख, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कवी प्रभाकर साळेगावकर व इतरांच्या चर्चेमधून प्रत्यक्ष शिवारात जाऊन साहित्य-संस्कृतीचा जागर घडवून आणण्याची अभिनव कल्पना समोर आली आण‌ि 'शिवार' साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.

संमेलनातले कार्यक्रम[संपादन]

शिवार साहित्य संमेलनात स्थानिक प्रतिभेला सामावून घेतानाच त्या-त्या गावातील कलावंतांनाही व्यासपीठ मिळवून दिले जाते. संमेलन फक्त एक दिवसाचे असले तरी आयोजकांची आत्मीयता आणि रसिकांचा मिळणारा प्रतिसाद बघून दरवर्षी थेट नांदेड, औरंगाबाद येथून अनेक प्रकाशक येतात ‌आणि पुस्तकांचे स्टॉल्स लावतात.

कुठलाही अभिनिवेष नसलेले हे संमेलन असल्यामुळे ते साधेपणाने साजरे होते. परंतु त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत आहे आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात न करताही स्थानिकांबरोबरच मान्यवर लेखकमंडळीही या संमेलनाबद्दल उत्सुकता दाखवतात. साधारणतः दरवर्षी २७ फेब्रुवारीच्या आसपासच्या रविवारी माजलगाव तालुक्यातीलच एखाद्या गावाला यजमानपद देऊन 'शिवार' साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते आणि मग गावकरी अगदी घरचे कार्य असल्यासारखे राबतात. सर्व व्यवस्था करतात. पाणी उपलब्ध आहे, अशा शेतात मंडप टाकला जातो. माजलगावहून मसापचे सर्व पदाधिकारी व कथा-कविता लिहिणारी सर्व साहित्यिक मंडळी सकाळी आठ-साडेआठपर्यंत संमेलनस्थळी येऊन पोहोचली की, संयोजक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरापासून ग्रंथदिंडी काढतात. या दिंडीत संमेलनाध्यक्ष, मसापचे पदाधिकारी, सरपंच, स्वागताध्यक्ष, उद्‌घाटक, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी होतात. ही सगळी मंडळी साहित्याविषयी आस्था असलेली असतात. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आली की सर्वांची न्याहारी होते. न्याहारीला कांदा-पिठले-भाकरी अशी व्यवस्था असते. मग उद्‍घाटनसत्र संपन्न होते. हे सत्र संपले की कथाकथन सत्र असते. त्या सत्रात प्रामुख्यामे शेतकरी-कष्टकरी यांच्या जीवनाचे वास्तव सांगणाऱ्या कथा असतात.

कवी संमेलन, समारोप आणि स्मरणिका[संपादन]

शिवार साहित्य संमेलनाच्याच दिवशी दुपारी एकच्या दरम्यान भोजनासाठी सर्व अतिथी व विद्यार्थी एकत्र बसतात. जेवण झाल्यावर अंदाजे तीनच्या दरम्यान कवी-संमेलनाला सुरुवात होते. सुमारे ऐंशी ते नव्वद कवी-कवयित्री आपल्या रचना शिवारच्या व्यासपीठावर सादर करतात. या सत्राला सर्वाधिक रसिकांची उपस्थिती असते. महत्त्वाचे म्हणजे या सत्रात सादर होणाऱ्या कविता बहुशः गाव-शिवाराशी नाते सांगणाऱ्या असतात. भौतिक विकासापेक्षा माणूस आणि मातीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या असतात. तर शेवटचे सत्र समारोपाचे असते. या सत्रात विविध सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर भूमिका घेऊन ती मांडली जाते. याच सत्रात पुढील वर्षीच्या ‌'शिवार' संमेलनस्थळाचीही घोषणा केली जाते. या संमेलनाची खासियत म्हणजे संमेलनानिमित्ताने प्रतिवर्षी स्मरणिकाही काढली जाते.

माजलगावच्या मराठवाडा साहित्य परिषदेने भरविलेली शिवार साहित्य संमेलने[संपादन]

  • १ले शिवार साहित्य संमेलन इ.स. २००९ मध्ये मंजरथ या गोदावरी नदीकाठी असलेल्या खेड्यात समीक्षक डॉ. कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर २रे ते ६वे वार्षिक शिवार संमेलन, अनुक्रमे पिंपळगाव, दिंद्रुड, सादोळ आणि लवूळ या खेड्यांच्या शिवारात भरत आले आहे. या संमेलनांचे अध्यक्षपद आतापर्यंत डी. के. देशमुख, वसंत बिवरे, प्रभाकर साळेगावकर, डॉ. वासुदेव मुळाटे, भा.य. वाघमारे या भूमिपुत्रांनी भूषवले आहे. विशेष म्हणजे थेट मातीशी नाते सांगणारे हे संमेलन असल्यामुळे या 'शिवार' संमेलनाला कवी फ.मुं. शिंदे, डॉ. दादा गोरे, प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, आसाराम लोमटे, कुंडलिकराव अतकरे, देविदास फुलारी आदी मान्यवरांनीही पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेतर्फे ५वे श‌िवार साहित्य संमेलन डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी २०१३ रोजी साधोळा येथे झाले.
  • ७वे शिवार साहित्य संमेलन १५ फेब्रुवारी २०१५ रोजी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील निगुड गावी झाले. संमेलनाध्यक्ष लेखक उमेश मोहिते होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासातील पहिले शिवार साहित्य संमेलन अजनुज (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावातील शिवारात १६-८-२०१७ रोजी झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खंडाळा आणि ज्ञानदीप क्रेडिट को-ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वनाथ पवार यांच्या शिवारात या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि कथाकथनकार रवींद्र कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे निघोजे (तालुका खेड-पुणे) येथे १०-१२-२०१७ रोजी एकदिवसीय शिवार साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष पोपटराव पवार होते.

हे सुद्धा पहा[संपादन]