"शंकर पुरुषोत्तम आघारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर (जन्म : मालवण, १८ नोव्हेंबर, इ.स. १८८४...
(काही फरक नाही)

२२:११, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर (जन्म : मालवण, १८ नोव्हेंबर, इ.स. १८८४; मृत्यू : पुणे, इ.स. १९६०) हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ होते.

वडिलांच्या बदल्यांमुळे आघारकरांचेे शालेय शिक्षण ५-६ ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विषय घेऊन ते बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९०७ साली ते मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात वनस्पतीशास्त्र शिकवत. पुढे ते एम.ए. झाले.

वनस्पती आणि प्राणी यांची गोडी

आघाराकरांना वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने गोळा करण्याची आवड होती. सह्याद्रीच्या डोंगरात फिरत असताना त्यांनी गोड्या पाण्यात राहणार्‍या जलपुष्प प्राण्यांमधल्या एका नवीन जातीचा शोध लावला. हे त्यांचे संशोधन नेचर मासिकात छापून आले होते.

त्यानंतर शालेय शिक्षकाची मिळू घातलेली नोकरी नाकारून ते कोलकात्याच्या इंडियन म्यूझियममध्ये गेले. म्यूझियममधील सिलेंटराटा विषयाच्या प्राध्यापकांनी त्यांना स्पंज जातीच्या प्राण्यांचे नमुने गोळा करायचे आणि टिकवायचे शिक्षण दिले.

नवीन जातीच्या इंगळीचा शोध

सह्याद्रीतून फिरताना आघारकरांना एका नव्याच इंगळीचा शोध लागला. इंगळीच्या या जातीला ‘क्रिप्टो हिपटास आघारकारी’ असे नाव दिले गेले.

आघारकरांनी दोन वर्षेे जर्मनीत संशोधन केले व पीएचडी मिळवली. युरोप इंग्लंड व नेपाळमधील दुर्मीळ वनस्पती त्यांनी त्या वेळी गोळा केल्या. हावरा येथील दुर्मीळ वनस्पतींचे नमुने लंडन येथे हलविले जाणार आहेत हे समजल्यावर त्यांनी त्याला विरोध करून ते हलवू दिले नाहीत.

आघारकरांच्या प्रयत्‍नाने दोन भारतीय विद्यार्थ्यांना लंडनमध्ये जाऊन अभ्यास करण्याच्या शिष्यवृत्त्या मिळू लागल्या. आघारकरांच्या विद्यार्थ्यांनी भात, ज्यूट, आंबा, केळी अशा पिकांवर संशोधन केले.

१९२४ सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे आघारकर अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने वाळलेल्या वनस्पतींची (हरबेरियम) जागोजागी कायमची प्रदर्शने सुरू झाली.

आघारकर हे योजना आयोगाच्या मृदसंधारण आणि वनीकरण समितीचे अध्यक्ष होते. १९४६ साली कोलकात्याहून निवृत्त झाल्यावर ते पुण्याला आले आणि त्यांनी विज्ञानवर्धिनी संस्थेची स्थापना केली. तेथे वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधन चालते.

ही संस्था आता आघारकर संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते.