"वालधुनी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वालधुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. औद्योगिकीक...
(काही फरक नाही)

२२:५७, २ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

वालधुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या नादात नैसर्गिक साधनांची मानवाने कशी धुळदाण उडवली, याचे ठळक उदाहरण म्हणजे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहणारी वालधुनी नदी. सह्याद्रीच्या फूटहिल्समधून उगम पावलेली वालधुनी नदी ही एकेकाळी जीवनदायी नदी होती. १९२३ मध्ये ब्रिटिशांनी याच नदीवर जीआयपी (ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वे) टॅंक बांधला. याच टॅंकमधून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे.

इतिहास

सुमारे हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १०३० मध्ये या भागात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा तत्कालीन शिलाहार राज्यकर्त्यांनी कृत्रिमरीत्या या नदीचे पात्र खोदले असे काही अभ्यासकांचे मत आहे. अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे १९७० च्या दशकापर्यंत वालधुनी नदी बाराही महिने दुथडी भरून वाहत होती. मात्र कृत्रिम असो वा नैसर्गिक, एकेकाळी या परिसरातील जमीन सुजलाम् सुफलाम् करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या वालधुनी नदीचे सध्या एका मोठ्या सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे.

योजना

मृतप्राय ठरलेल्या या नदीला जीवनदान देण्याच्या अनेक सरकारी योजना आखण्यात आल्या, पण त्या आजवर दुर्दैवाने कागदावरच राहिल्या आहेत. सध्या या नदीच्या पात्रातून वाहते ते या परिसरात सारे नेमनियम धाब्यावर बसवून सुरू असणार्‍या लहान-मोठ्या कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी. एकेकाळी या परिसरातील जीवन फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या या नदीमुळे पात्रालगतच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आसपासचे कारखाने रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडतात की नाही यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नियंत्रण ठेवते. परंतु औद्यागिक सांडपाण्यापेक्षा प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी वालधुनीच्या पात्रात नियमित सोडले जाणे यावर आळा बसणे अतिशय जरुरीचे आहे.

वालधुनी प्राधिकरण

ठाणे जिल्ह्यातून वाहणार्‍या या वालधुनी नदीच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करणे स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने हा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा असे पत्र कल्याणचे मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले होते. .मुंबईतील मिठी नदीच्या २००५ सालच्या महापुरानंतर तेथे ज्या प्रकारे प्राधिकरण करण्यात आले त्याच धर्तीवर वालधुनी नदी प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार स्थापलेल्या वालधुनी नदी विकास प्राधिकरण समिती आणि उपसमितीने २०११ साली एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार या कामी ६५० कोटींचा खर्च अपेक्षित होता.

इतर

वालधुनीप्रमाणेच अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यात नेरळ-माथेरान डोंगरपट्ट्यातून वाहणारे अनेक शुद्ध पाण्याचे झरेही (नालेही) या आंधळ्या औद्योगिकीकरणामुळे कुचकामी ठरून निव्वळ गटार म्हणून उरले आहेत.