वज्रसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्णव्यवस्थेवर प्रखर आघात करणारे आद्य लेखन "वज्रसूची" हे मानले जाते. वज्रसूची या संस्कृत ग्रंथात जन्माधारित जातीच्या शुद्धता-अशुद्धतेच्या कल्पनेवर सजेतोड टीका आहे. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा खोटा आहे, हे तत्त्व स्पष्ट रीतीने मांडले आहे.

त्रिपिटक-सूची सन ९७३ ते ९८१ च्या दरम्यान चिनी भाषेत अनुवादित झाली. पण या ग्रंथानुसार वज्रसूचीचा लेखक अश्वघोष नसून धर्मकीर्ती आहे. वज्रसूची'चे संस्कृतमधून मराठीत तुकारामाची ब्राह्मण शिष्या बहिणाबाई हिने पहिले भाषांतर केले. अनुवाद शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनीही केला होता. अगदी अलीकडील अनुवाद डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांनी केला.

बौद्ध विचारवंत धर्मकीर्ती यांच्या 'वज्रसूची' या ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले.

वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी 'एक हिंदू' या टोपण नावाने ' जातिभेदविवेकसार ' ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती.

वज्रसूची आणि वज्रसूचीकोपनिषद[संपादन]

'वज्रसूची' या नावाच्या दोन कृती आहेत. बौद्ध पंडित आचार्य अश्वघोष (साधारणपणे इ.स. ७५ ते १५०) यांच्या नावावर असणारी 'वज्रसूची' आणि 'वज्रसूची' नावाचे एक उपनिष पण आहे. डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांनी दोन्ही ग्रंथांमधील फरकांची चांगल्याप्रकारे मांडणी केलेली आहे. [१]

सामवेदाच्या एकूण १०८ उपनिषदांपैकी ३६ वे 'वज्रसूचीकोपनिषद' आहे. यामध्ये ब्राम्हण असण्याचे खरे लक्षण कोणते हे सांगताना चैतन्य, परब्रम्ह याची मांडणी केली आहे. "तऱ्हि को वा ब्राम्हणो नाम?…" या उताऱ्यात ब्राम्हणत्वाची लक्षणे दिलेली आहेत. या दोन्ही ग्रंथांचा काळ आणि कर्ते यांबाबत विद्वानांमध्ये विभिन्न मते आहेत. 'वज्रसूची' ही कृती अश्वघोषाची असून ती उपनिषद या कृतीच्या पूर्वीची आहे. हे विश्वभारतीमधील संस्कृत आणि तिबेटी भाषेचे प्राध्यापक सुजीतकुमार मुखोपाध्याय यांनी पुढीलप्रमाणे संयुक्तिकपणे मांडले आहे.

'वज्रसूचीकोपनिषद' जर शंकराचार्यांचे असेल तर त्यांचा काळ इ. स. ८ वे शतक म्हणजेच अश्वघोषाच्या काळाच्या बऱ्याच नंतरचा आहे. आणि जरी हे उपनिषद शंकराचार्यांचे नाही असे मानले तरी ते उत्तरकालीनच ठरते. याला आधार म्हणून पुराणांचे उदाहरण दिले आहे. 'वज्रसूची' मधील दुसऱ्या श्लोकामध्ये वेद आणि स्मृती यांनाच प्रमाण मानले आहे. पुराणांना प्रमाण मानले नसून ग्रंथात प्रत्यक्ष पुराणातील कोणतेही उदाहरण किंवा आधार दिलेला नाही. याचा अर्थ ग्रंथ रचना झाली तेव्हा पुराणांची रचना झाली नव्हती किंवा अश्वघोषासारख्या विद्वानाने त्याची दखल घेण्याइतपत ती जुनी/प्रचलित नव्हती. कारण अश्वघोषरचित वज्रसूचीतील उदाहरणांपेक्षा कितीतरी अधिक सयुक्तिक अशी अनेक उदाहरणे ही पुराणांमध्ये आहेत. माहीत असल्यास अश्वघोष सारख्या विद्वानाने त्याचा वापर केला असता. याउलट वज्रसूचीकोपनिषदाच्या शेवटी मात्र 'इति श्रुतिस्मृति पुराणेतिहासानामाभिप्रायः' असा पुराणांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याचाच अर्थ या उपनिषदाची रचना होण्याच्या काळापर्यंत पुराणांना प्रमाण मानले जाऊ लागले होते. यामुळे 'वज्रसूची' हा ग्रंथ पुराणे आणि वज्रसूचीकोपनिषद यांच्याहून प्राचीन असावा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ कुळकर्णी-बोधी, रूपा (२००८), आचार्य अश्वघोषकृत वज्रसूची, पुणे : सुगावा प्रकाशन.