रा.ग. जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रावसाहेब गणपतराव जाधव या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव (जन्म : बडोदा, ऑगस्ट २४, १९३२ - - पुणे, मे २७, २०१६) हे मराठीतील साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.

वडिलांच्या बदलीमुळे रा.ग. जाधव यांचे कुटुंब पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव वाई येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक झाले.

पत्‍नीच्या निधनानंतर १९९० च्या सुमारास प्रा. जाधव पुण्यामध्ये वास्तव्यास आले. सुरुवातीला काही काळ रमणबाग प्रशालेजवळील राजीव लॉज येथे राहिल्यानंतर ते सदाशिव पेठेतील अनपट बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले. २००४ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गच्चीवरील त्यांच्या छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीतील घराविषयी चर्चा झाली होती. पुणे महापालिकेने त्यांना घर देण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मिळविलेला पाच लाख रुपयांचा निधी आणि जाधव यांच्याजवळची रक्कम एकत्रित करून शनिवार पेठेमध्ये साधना ट्रस्टच्या नावाने जाधव यांच्यासाठी छोटीशी सदनिका घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दाभोलकर यांनी जाधव यांना साधना ट्रस्टमध्ये विश्वस्त करून घेतले. ग.प्र. प्रधान यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन केले.

व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोश २३ वर्षे.

विश्वकोश[संपादन]

मराठी विश्वकोश महामंडळामध्ये १९७० साली अभ्यागत संपादक म्हणून जाधव दाखल झाले. तब्बल २३ वर्षे अभ्यागत संपादकपदापासून ते महामंडळाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समिक्षक रा. ग. जाधव यांनी मराठी विश्वकोश निर्मितीस खऱ्या अर्थाने आकार दिला.

विश्वकोशातील १९८९ पर्यंतच्या कार्यकाळात रा.ग. जाधव यांनी तेराव्या खंडापर्यंत काम केले. या काळात त्यांनी या खंडांतून साहित्य विषयक महत्त्वाचे लेखही त्यांनी लिहिले. विश्वकोश आकर्षक होण्यासाठी विश्वकोशातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच परिभाषा खंडासह बारा खंड प्रकाशित झाले.

१९ जानेवारी २००१ रोजी जाधव यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी सतराव्या खंडापर्यंतचे लेखन-संपादनाचे काम केले.

लेखन प्रकार[संपादन]

समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन

दलित साहित्य समीक्षा[संपादन]

निळी पहाट निळी क्षितिजे आणि निळे पाणी या त्यांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले.

दलित साहित्यातील विद्रोह[संपादन]

दलित साहित्याने बुद्धसंदेशाकडे पाहिले पाहिजे, केवळ विद्रोहाचा उद्घोष करून भागणार नाही, हे जाधव यांचे म्हणणे आहे. विद्रोह समजून घेऊन मग त्याच्या पलीकडची दिशा जाधव यांनी दाखवली होती. विळखा पडला, म्हणून खचण्याऐवजी विळख्याची ओळख सांगोपाग करून घ्यायची आणि ‘विद्रोह’ काय आहे ते टिपायचे, असे त्यांचे म्हणणे होते.

बापू[संपादन]

‘बापू’ या कवितासंग्रहामध्ये जाधव यांच्या गांधीजींवरील ९१ कवितांचा समावेश आहे.

रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अश्वत्थाची सळसळ
  • आगळीवेगळी नाट्यरूपे
  • आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (संपादन)
  • आनंदाचा डोह
  • एकूण कविता
  • कला,साहित्य व संस्कृती
  • कविता आणि रसिकता
  • काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
  • काही नोंदी, काही निरीक्षणे
  • खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
  • चंदेरी चित्रहार
  • डोहकाळिम्यात डोकावताना
  • तृतीया
  • नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
  • निवडक समीक्षा
  • निवडक सानेगुरुजी (संपादन)
  • निळी पहाट
  • निळे पाणी
  • निळी क्षितिजे
  • पंचवटी
  • पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य
  • प्र.के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
  • प्रतिमा
  • बापू (कवितासंग्रह)
  • मराठीतील कथारूपे
  • मराठी वाङ्‌मय : स्वातंत्र्योत्तर संदर्भ
  • मराठी वाङ्मयाचा इतिहास (संपादन)
  • माझे चिंतन
  • मावळतीच्या कविता (कवितासंग्रह)
  • वागर्थ
  • वाङ्‌मयीन आकलन
  • वाङ्‌मयीन निबंध लेखन
  • वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य
  • वाङ्‌मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये
  • वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
  • विचारशिल्प
  • वियोगब्रह्म (कवितासंग्रह)
  • शास्त्रीजी
  • संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
  • समीक्षेतील अवतरणे
  • साठोत्तरी मराठी कविता आणि कवी
  • साधना साहित्य (साधना साप्ताहिकातील लेखांचा संपादित संग्रह, ८ खंड)
  • सांस्कृतिक मूल्यवेध
  • साहित्य : बदलते परिप्रेक्ष्य
  • साहित्य व सामाजिक संदर्भ
  • साहित्य संचित
  • साहित्याचे परिस्थितीविज्ञान

संपादन[संपादन]

  • आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)
  • निवडक साने गुरुजी
  • साधना साहित्य (८ खंड)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये १९५० ते २००० या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या चार खंडांचे जाधव यांनी संपादन केले.

रा.ग. जाधव यांच्यावरील पुस्तके[संपादन]

  • संमेलनाध्क्ष प्रा.रा.ग.जाधव (अरुण पारगांवकर)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • ‘निवडक समीक्षा’ या त्यांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये विंदा करंदीकर यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • औरंगाबाद येथील २००४ सालातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • राज्य सरकारने प्रा. रा.ग. जाधव यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे पाच लाख रुपये देऊ केले. ‘आता या वयात एवढय़ा पैशांचे काय करू’, असा प्रश्न जाधव यांनी विचारला होता. पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी माजी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेला एक लाख रुपयांचा धनादेश जाधव यांनी साधना ट्रस्टला देणगी दिला होता. हा संदर्भ ध्यानात घेऊन ‘आता हे पैसे तुमच्या उपचारांसाठी ठेवा’, अशी विनंती आमदार विजय काळे यांनी त्यांना केली..

निधन[संपादन]

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन २७ मे १९९४ला झाले. बरोबर त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनी डॉ. जाधव यांचेही देहावसान झाले.

संदर्भ[संपादन]

लोकसत्ता दि.२३ जून २०१३

बाह्य दुवे[संपादन]