रघुवंशीय राजांचे गुणवर्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रघुवंशम् हे महाकाव्य कविकुलगुरू कालिदास यांची कृती आहे. यात एकूण १९ सर्ग आहेत. यात कालिदासांनी इक्ष्वाकुवंशीय महाप्रतापी राजा दिलीपापासून अग्निवर्ण पर्यंत एकूण २७ राजांचा आदर्शमय वर्णन केलं आहे. वाल्मिकी रामायण आणि रघुवंशम् यांत जरा अंतर दिसतं. वाल्मिकी रामायणात राजा दिलीपापासून रामा पर्यंत १८ राजांची नावे आली आहेत आणि रघुवंशात ५ पिढ्या दिल्या आहेत. (राजा दिलीप, राजा रघु, राजा अज, राजा दशरथ आणि मर्यादापुरुषोत्तम् राजा राम.)

महाकवी कालिदास म्हणतात, रघुवंश म्हणजे जणू गुणांचा सागरच. या रघुचा वंश म्हणजे रघुचा अन्वय फार निराळा आहे. अशा प्रकारचं वर्णन अन्य कुठल्याही वंशाचे झालेले आढळणार नाही. आजन्मशुद्ध हे या वंशाचे पहिले विश्लेषण. आपण सर्वसामान्य माणसं कधी शुद्ध असतो कधी नसतो. आपली शुद्धता ही स्थलकालसापेक्ष असते. पण रघुवंशाचं मात्र तसं नाही. या राजांचं संपूर्ण जीवन शुद्ध आहे.आहे. आपल्या देहाची चादर या रघुवंशीय राजांनी कधीही मळू दिली नाही. अशा या रघुवंशीय राजांचे काही गुण अत्यंत श्रेष्ठ आहेत.

आफलोदय कर्मणाम् - हे राजे निरंतर कर्मयोगी आहेत. दोन दिवस कर्म केलेत आणि नंतर सोडून दिलेत असा हा वंश नाही. जे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले ते पूर्ण होईस्तोवर विश्रांती नाही.

आसमुद्र क्षितिषानाम् - रघुवंशीय राजांच्या राज्याच्या सीमा समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत. संपूर्ण पृथ्वी यांच्या अधिकारात आहे. अयोध्येचे घोडे, रथ स्वर्गापर्यंत जायचे ते इंद्राला मदत मागण्यासाठी नाहीत तर इंद्राला मदत करण्या साठी. एखाद्या पराक्रमी असुराने आक्रमण केले तर इंद्र या रघुवंशीयांकडे मदत मागायचा. मुळात अयोध्येत युद्ध नाही कारण ती अयोध्या आहे.

यथाविधि हुताग्निनाम् - या रघुवंशीय रोहनचे व्यक्तिगत जीवन अत्यंत श्रेष्ठ आणि वैचारिक आचारसंपन्न आहे.

यथाकामार्चीतार्थीनाम् - या राजांच्या दारीत्यांचा आलेला याचक कधीही विन्मुख गेला नाही. राजा रघु दर ३-४ वर्षांनी विश्वजीत नावाचा यज्ञ करायचे. रघुवंशीय राजांनी कधीही संपत्तीचा उपयोग स्वतःच्या सौख्या साठी केला नाही. दारी आलेला याचक नेहमी तृप्त होऊन परत गेला.

यथापराधदण्डानाम् - ज्याने अपराध केला त्याला दंड हा झालाच पाहिजे असा राजांचा आग्रह असे. ज्यांचे आदर्श इतके उच्च असतात त्या ठिकाणचा विचार करताना आपली बुद्धी पण शुद्ध असावी लागते. अनेक सुविधा उपलब्ध असतानाही त्यातील कशाचा स्वीकार करायचा, कशाचा स्वीकार करणे योग्य आहे याचा निरंतर विवेक या रघुवंशीय राजांना होता. अयोध्येत अगणित संपत्ती या राजांनी त्या संपत्तीचा उपयोग कधीच भोगासाठी केला नाही. केवळ समाजोत्थानासाठी केला.

सत्याय मितभाषणाय - या रघुवंशीय राजांना अगदी मोजुन मापून आणि मोजके बोलायची सवय होती. जेवढे आवश्यक आहे, प्रयोजन आहे तितकेच बोलणे आणि तेही सत्यच बोलणे हा त्यांचा सस्वभावगुण होता.

यशसे विजिगिषुणाम् - या राजांना युद्ध करून विजय मिळवायचा होता पण तो दुसऱ्यावर विजय मिळवून आनंद साजरा करण्यासाठी नाही तर कीर्ती संपादनासाठी. एखादा प्रदेश जिंकला कि तिथे लूट केली किंवा अत्याचार केले असे उद्योग रघुवंशीयांनी कधीच केला नाहीत.

शैशवेभ्यस्त विज्ञानाम् - विद्यार्थी दशेत असतानां गुरुगृही राहून अभ्यास करणे, नंतरच्या काळात देखील स्वाध्याय करत राहणे असे श्रेष्ठ विद्यार्थी जीवन या राजांनी जगलं आहे.

यौवने विषयैशीनाम् - यौवनात विषयांचा उपभोग घ्यावा असे नाही, तर कीर्ती संपादन करून आपण अजिंक्य राहावे. आपल्या राज्याची वृद्धी आणि भरभराट करावी.

वर्धक्ये मुनिवृत्तीनाम् - वार्धक्य आले कि आपलू सगळ्या गोष्टी आवरत्या घ्याव्यात आणि शांत व्हावे. तृप्त अंतःकरणाने एकेक गोष्ट नव्या पिढीकडे सोपवून आपण निवृत्ती घेऊन आत्मचिंतन करावे, परमेश्वराच्या सेवेत आपले उर्वरित आयुष्य घालवावे आणि आत्मतृप्त व्हावे.

अशा प्रकारे विविध सद्गुणांची उपासने एखाद्या राजाने नव्हे तर सर्वच रघुवंशीय राजांनी केली. ही सद्गुणांची आराधना या रघुवंशात पिढ्यानपिढ्या चालू आहे. या वंशातील प्रत्येक राजा सगुणसंपन्न आणि आपापल्या क्षेत्रात असामान्य आहे. अशा या रघुवंशाचा वर्णन करताना महाकवी कालिदास म्हणतात, कि या रघुवंशीय राजांचा गुणवैभव इतका श्रेष्ठ आहे कि त्यापुढे माझ्या वाणीचे वैभव फारच अल्प आहे.