माधव विद्या मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधव विद्या मंदिर ही सेवाभारती संचलित महाराष्ट्राच्या इचलकरंजी शहरातील शाळा आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा प्रकल्प आहे. ही शाळा गणेशनगर भागात आहे. विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी म्हणून हिची ओळख आहे. इचलकरंजी परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ही ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील तसेच सामान्य यंत्रमाग कामगारांची मुले आहेत. या मुलांना वेगवेगळे अनुभव मिळावेत यासाठी सर्व शिक्षक आणि संचालक सतत प्रयत्न करत असतात.

वर्ग आणि विद्यार्थी संख्या[संपादन]

ही मुलामुलींची एकत्रित शाळा आहे. येथे बालवाडीपासून इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग आहेत. मागील वर्षी शाळेला इयत्ता ८ वी पर्यंतची परवानगी मिळाली आहे. शाळा कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालू आहे. शाळेत प्रवेश घेताना कोणत्याही स्वरूपात देणगी घेतली जात नाही. शाळेत सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन २०१७-१८ या काळात सुमारे १५ शिक्षक - शिक्षिका अखंड ज्ञानदानाचे काम करत आहेत.

मुख्याध्यापक[संपादन]

कु. स्वाती कुरणे या सन २०१७-१८ या काळात मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत. सौ. अस्मिता ठिकणे या सन २०१७-१८ या काळात विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत.

सोयीसुविधा[संपादन]

शाळेत मुलांसाठी ग्रंथालय असून सुमारे २५०० पुस्तके विद्यार्थ्यांसाठी तसेच सुमारे ५०० पुस्तके शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. सन २०१७-१८ या वर्षी आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी या संस्थेने शाळा वाचनासाठी दत्तक घेतली आहे. ५० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. विज्ञान या विषयाची गोडी वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शाळेत खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. रोजचा १ तास मुलांनी मैदानावर खेळावे यासाठी शिक्षक व संचालक प्रयत्नशील असतात.


उपक्रम[संपादन]

ही शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेतील मुले स्पर्धा परीक्षा व इतर अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना शिक्षक वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. काही वेगळे उपक्रम शाळेत राबविले जातात. ते खालीलप्रमाणे आहेत.

१. विद्यारंभ संस्कार -

 शाळेत इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परिसरातील श्री गणेश मंदिरात नेऊन विद्यारंभ संस्कार केला जातो.

२. पाऊस -

 पावसाळ्यात मुलांसाठी पावसात भिजणे हा उपक्रम घेतला जातो.

३. होतकरू विद्यार्थ्यांना मदत -

  एखादा गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळा त्यांना मदत मिळवून देते.

४.ओंकार मंत्र -

  वर्गात प्रत्येक तासाची सुरुवात ओंकार मंत्राने होते, त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

५. दीपावली -

   दीपावलीच्या उत्सवात मुले मातीचे किल्ले करतात तसेच त्यांच्याकडून आकाशकंदील देखिल बनवून घेतले जातात. या सगळ्यातून सहकार्य व एकत्रित काम करण्याची वृत्ती वाढते.

६. होळी -

   मुले शालेय परिसरातील कचरा गोळा करून त्याची होळी करतात. या होळीत स्वतःमध्ये असणारे वाईट गुण कागदावर लिहून तो कागद जाळला जातो.

७. शालेय शिबीर -

    एक दिवसीय निवासी शिबीर म्हणजे एक चैतन्य. अनेक गोष्टींचा समावेश म्हणजे मातृहस्ते भोजन, सूर्यनमस्कार, व्यायाम, प्रभातफेरी, विविध खेळ, कथाकथन, चित्रकला, 
    मातीकाम यात असतो. यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.

८. लखोटा -

    खराब झालेल्या झेरॉक्स कागदांपासून विद्यार्थी लखोटे तयार करतात.

९. पर्यावरण संरक्षण उपक्रम -

   यामध्ये मुले शाळेत असलेल्या झाडांची काळजी घेतात. त्यांना पाणी घालतात. शाळेची व झाडांच्या आसपास असलेल्या जागेची स्वच्छता करतात. पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात.

तर अशी ही अल्पावधीतच गगनाला गवसणी घालणारी शाळा म्हणजे माधव विद्या मंदिर या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी असे म्हणत असतो की

      पसरून पंख इवले
      घेऊ झेप आकाशी
            घडवू भविष्य आपुले
            जपू स्वप्न उराशी......