महावीर जोंधळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महावीर रामचंद्र जोंधळे (जन्म : इ.स. १९४८) हे मराठी भाषेतील साहित्यकार, लेखक, पत्रकारसंपादक आहेत. त्यांनी सुमारे चाळीस वर्षे बेळगाव तरुण भारत, मनोहर, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, या वृत्तपत्रांत पत्रकारिता आणि स्तंभलेखन केले. सहज सोपी शब्दरचना आणि भावनिक आवाहन करणारी लालित्यपूर्ण लेखनशैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.[ संदर्भ हवा ]

जीवन[संपादन]

महावीर जोंधळे यांचा जन्म मराठवाड्यात पिंपळगावलिंगी (जिल्हा उस्मानाबाद) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. गावात शाळा नसल्याने त्यांना रोज सहा किलोमीटरवरील वाशी या तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करून शिकावे लागले. नंतरच्या शिक्षणासाठी त्यांना बार्शी, आष्टी, कुंथलगिरी असा प्रवास करावा लागला.[ संदर्भ हवा ] त्यानंतर ते नोकरीच्या शोधासाठी मुंबईत गेले. तेथे श्रीमती शांता शेळके, शिरीष पै, श्रेणिक अन्नदाते, सदानंद रेगे, दामू केंकरे यांचा आधार मिळाला. पुढे मुंबई सोडावी लागली.त्यानंतर ते औरंगाबादच्या अनंत भालेराव यांच्या दैनिक मराठवाडा या वृतपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झाले.[ संदर्भ हवा ] बालसाहित्य लेखनापूर्वी लघुकथा लेखनास त्यांनी प्रारंभ केला. मराठा, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, हंस, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची इत्यादी नियतकालिकांतून ते कथालेखन करीत असत. जवळपास शंभर कथा त्यांच्या नावावर आहेत.[ संदर्भ हवा ] लोकमत दैनिकांचे संपादक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनास वाहून घेतले. त्यासाठी देश-परदेश दौरे केले. जिनेव्हा, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, दुबई, आबूधाबी इत्यादी देशाच्या दौऱ्यांनंतर भारत आणि प्रगत राष्ट्र याविषयांवर अनेक व्याख्यामालांत, महाविद्यालयांत महावीर जोंधळे यांनी व्याख्याने दिली. त्यांवर आधारित तीन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्या पुस्तकांना पु.ल.देशपांडे, अनंत काणेकर यांच्या नावाचे पुरस्कार मिळाले आहेत.[ संदर्भ हवा ] . मराठीतील आघाडीचे ललित लेखक म्हणून मान्यता पावल्यानंतर जोंधळे यांची काही पुस्तके औरंगाबादचे मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाली. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तसेच इयत्ता बारावी, अकरावी, आठवी, पाचवी, चौथीच्या पाठ्यपुस्तकांत अनेक वर्षे त्यांच्या लेखनाचा समावेश केला गेला होता.[ संदर्भ हवा ] त्यांच्या लेखनावर पुणे विद्यापीठात प्रा.शांताराम चौधरी यांनी प्रबंध लिहून विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. त्या प्रबंधावरील आधारलेल्या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय अणुसंशोधन महामंडळाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले.[ संदर्भ हवा ]

ललित वाड़्मय प्रकारात महावीर जोंधळे यांची अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यातील निवडक लेखांवर इरकल नावाचा अभिवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील नामवंत शहरांतून सादर झाले.[ संदर्भ हवा ] भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शंभर शाळांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने गाजली. 'गाणी पाखराच्या ओठी' हा बालगीतांचा कार्यक्रम मुंबई दूरदर्शनने सादर केला, तर पुणे, मुंबई, नागपूर, रत्‍नागिरी इत्यादी आकाशवाणी केंद्रांनी बारा गाणी संगीतबद्ध करून प्रसारित केली. मराठी कवितेतील वृक्षराजीवरील 'झाडांच्या कविता'हा कार्यक्रम त्यांनी संपादित केला आणि राजीव मुळे यांच्या मदतीने रंगमंचावर सादर केला.[ संदर्भ हवा ]

महावीर जोंधळे यांनी पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठात अनेक व्याख्याने दिली.[ संदर्भ हवा ] . पुणे विद्यापीठासाठी महावीर जोंधळे यांनी 'लेखकांच्या जाऊ गावा' हा संशोधनपर प्रकल्प राबवला. पाच वर्ष पदव्युत्तर मराठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प होता. यांत कोकणातील चि.त्र्यं.खानोलकर, श्री.ना.पेंडसे, विनोबा भावे, र.वा.दिघे, वि.स.खांडेकर, शंकर रामाणे, बा.भ.बोरकर, जयवंत दळवी इत्यादी मान्यवर साहित्यिकांच्या व कवींच्या गावात जाऊन त्यांच्या लेखनकृतीतील समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला.[ संदर्भ हवा ]

महावीर जोंधळे यांनी कर्नाटकातील दोन, गोमंतकातील दोन, देशावरील एक (निमशिगावात) आणि कोकणातील दोन साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले.[ संदर्भ हवा ] १९९४ साली परभणी जिल्ह्यात झालेल्या दहाव्या आखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील निमशिरगावमध्ये १५ डिसेंबरला २०१९ रोजी २३वे ग्रामीण साहित्य संमेलन झाले याही संमेलनाच्या अध्यक्षपदी महावीर जोंधळे.[ संदर्भ हवा ]

पुस्तके[ संदर्भ हवा ][संपादन]

  • अर्कचित्र (ललित लेखसंग्रह)
  • अनंग आणि अभंग (कविता संग्रह)
  • आम्ही लटिकेना बोलू
  • उन्हं झेलणारी माणसं (व्यक्तिचित्रणे)
  • एकांताची भूमिती (ललित लेखसंग्रह)
  • कफनीला खिशे नसतात (कविता संग्रह)
  • करवंदी आभाळ (ललित लेखसंग्रह)
  • काळा चंद्र (ललित लेखसंग्रह, चित्रकारी-चंद्रमोहन कुलकर्णी)
  • किरणपाणी (किरणपाणी नावाच्या गावासंदर्भातील ललित मुक्तलेखसंग्रह, चित्राकृती - चंद्रमोहन कुलकर्णी)
  • जनगोत (कादंबरी)
  • झुंबर (कथासंग्रह)
  • तळभोवरा (ललित लेखसंग्रह)
  • तोल (कादंबरी)
  • त्रिकालसंध्या (एका शेतकऱ्याच्या मुलाचा प्रवास, आत्मचरित्र)
  • त्रिपुटी (कादंबरी)
  • निरंग जांभूळ (ललित लेखसंग्रह)
  • नीतिधुरंधर : बाळासाहेब पवार (चरित्रग्रंथ)
  • पर्ण (दिवाळी अंक २०१६, सल्लागार संपादक)
  • प्रहर (कविता संग्रह)
  • बाल-कुमार साहित्य आशय आणि लयतत्त्व (माहितीपर)
  • बालभारतीसाठी मुलांसाठी निवडक साहित्याचे चौदा खंड संपादित
  • बिगूल (कादंबरी)
  • मला माहीत असलेले शरद पवार (महावीर जोंधळे हे या पुस्तकाच्या अनेक लेखकांपैकी एक आहेत.)
  • माध्यम प्रदेश : तथ्य आणि पथ्य[१]
  • मूरलॅंड्स (कथासंग्रह)
  • रससिद्धांताचा प्रदेश (सामाजिक, सहलेखिका - इंदुमती जोंधळे)
  • लौकिक (माहितीपर, अनुभव कथन, राजकीय, सामाजिक)
  • वारी (कवितासंग्रह)
  • नाद अंतरिचा : श्रीलंका (ललित लेखसंग्रह) - मुंबई विद्यापीठ बी.ए. तृतीय वर्ष अभ्यासक्रमात
  • समुद्रसूक्त (ललित लेखसंग्रह)
  • समुद्रातले आकाश (कादंबरी)
  • सरड्याच्या पठारावर (कथासंग्रह)
  • साईखड्याचा खेळ (कविता संग्रह)
  • सातूचे पीठ (ललित)
  • सावळ्या चाहुलीचा झिम्मा (ललित लेखसंग्रह)
  • साहित्य : आशय आणि अविष्कार (समीक्षा)
  • साळुंकीची सावली (लेखसंग्रह)
  • स्वप्नभ्रांतीचा प्रदेश (कथासंग्रह)
  • हिरवे ढग (कथासंग्रह)
  • हिरव्या डहाळ्या आणि करवंदी आभाळ (ललित लेखसंग्रह)
  • गवतात उगवलेली अक्षरे (आत्मकथन)
  • अभंगवृक्ष (ललित)
  • चांगदेवाचा माळ (कथासंग्रह)
  • श्रीरंगरेषा (चित्र ललित)
  • तुकाराम एक अनुभव (झोंबाट)

बालसाहित्य - कथा/कविता संग्रह [ संदर्भ हवा ][संपादन]

  • अक्कलकाऱ्याची फुले
  • आणखी एक बिरबल
  • आसवं गाळणारी कासवं
  • एक पाय तळ्यात (कविता)
  • खंड्या आणि कावळा
  • खुळोबा रे खुळोबा
  • गाणारं घर
  • गोंधळ मांडिला
  • न संपणारं गाणं (लोकविलक्षण लोककथा)
  • नाक घासा नाक
  • पावसाचे पाय (कविता)
  • बाहुलीचे डोळे
  • मुंगळ्याच्या बेटावर
  • रामनाथीचा पाऊस
  • शिवाची वाडी
  • सातूचे पीठ
  • सारस पक्षी

पुरस्कार आणि सन्मान[ संदर्भ हवा ][संपादन]

  • अनंत काणेकर पुरस्कार
  • आणीबाणी लादल्याच्या निषेधात विज्ञान कथेचा राज्य पुरस्कार महाराष्ट्र सरकारला १९७७ साली परत.
  • काकासाहेब खाडिलकर पुरस्कार (तीन वेळा)
  • कृ.ब. निकुंब पुरस्कार
  • केशवसुत पुरस्कार (तीनवेळा)
  • ग.ह. पाटील पुरस्कार
  • ना.सी. फडके पुरस्कार
  • भा.रा. तांबे पुरस्कार
  • भा.रा. भागवत पुरस्कार
  • वा.गो. मायदेव पुरस्कार
  • शरद्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार
  • सानेगुरुजी पुरस्कार
  • कविवर्य नामदेव ढसाळ पुरस्कार (म.सा.प.)
  • पत्रकारितेतील लेखनाबद्दल रा.अ.कुंभोजकर सन्मान (म.सा.प.)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Marathi Books by महावीर जोंधळे mahAvIra joMdhaLe". www.rasik.com. Archived from the original on 2007-05-04. 2019-03-01 रोजी पाहिले.