ब्रिटिशांचे वसाहतविषयक धोरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिटिशांनी वसाहतीचा केवळ आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला. भारतातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल इंग्लंडला नेण्यास व इंग्लंडमधील उद्योगांतून तयार झालेला पक्का माल भारतात आणून विकण्यास त्यांनी सुरुवात केली. इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर जकात नसल्याने व यंत्राच्या साहाय्याने तेथे मोठ्या प्रमाणात माल तयार होत असल्याने त्यांना भारतात या वस्तू स्वस्त भावाने विकणे शक्य झाले, त्यामुळे भारतातील हस्तोद्योगांना इंग्लंडमधील या मालाच्या किमतीबरोबर स्पर्धा करणे अशक्य झाले. परिणामी, अनेक हस्तोधोग बंद पडून भारतीय कारागिरावर बेकारीचे संकट ओढवले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ म्हणून हिंदुस्थानातील वसाहतीचा उपयोग करण्यास व त्याद्वारे प्रचंड संपत्ती इंग्लंडला नेण्यास सुरुवात झाली. याबरोबरच या काळात काही इंग्रज भांडवलदरानी चहा, नीळ, तंबाखू इत्यादीच्या उत्पादनात, तसेच रेल्वे -व्यवसायात प्रचंड प्रमाणावर भांडवल गुंतवणूक केली. ब्रिटिशांना या भांडवलावरील व्याजही मोठ्या प्रमाणावर मिळत होते. याशिवाय येथील अधिकाऱ्याच्या वेतनाचा, तद्वतच ब्रिटिशांना साम्राज्यविस्तारासाठी लागणाऱ्या सैन्याचा खर्चही भारतीय तिजोरीवर पडत होता. निरनिराळ्या मार्गांनी भरतीतील या वसाहतीचा आपल्या देशातील संपत्ती वाढवण्यासाठी उपयोग करण्याचे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारले. त्यासाठी त्यांनी आर्थिक शोषण करण्याच्या निरनिराळ्या मार्गाचा अवलंब केला. ब्रिटिशांचे हे स्वार्थी धोरण सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. पितामह दादाभाई नौरोजी यांनी आपल्या भाषणांतून व लिखाणांतून भारतातून दरसाल तीन कोटी पाउंड एवढी प्रचंड रक्कम कशा प्रकारे ब्रिटिश मायदेशी नेतात व भारताचे आर्थिक शोषण त्यांनी कशा पद्धतीने चालविलेले आहे, यावर प्रकाश टाकला. ब्रिटिशांच्या या वसाहतविषयक स्वार्थी धोरणाविरुद्ध असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यातून राष्ट्रवादाच्या विचाराला गती मिळाली. राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी एकत्रित येऊन संघटनात्मक मार्गाने ब्रिटिशांना विरोध करावा, असा एक विचार प्रकर्षाने पुढे येऊ लागला.