बाबुराव रामिष्टे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माथाडी कामगारांचे झुंजार नेते व अखिल भारतीय माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस बाबुराव रामिष्टे (जन्म : इ.स. १९४०; निधन : २६ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे रहिवासी होते. म्हसकरवाडी, पोस्ट धामणी, तालुका पाटण हे रामिष्टे यांचे जन्मगाव, तर काळगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण पाटण येथेच झाले होते. पुढे उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. तेथे माथाडी कामगार म्हणून काम करत त्यांनी रात्रशाळेत अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते माथाडी कामगारांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात. त्यांनी माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्‍नांवर चळवळी केल्या. माथाडी कामगारांसाठी घरे आणि अन्य प्रश्‍नांवर लढा दिला. त्यासाठी त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले होते.

आंतरराष्ट्रीय बंदर लाभलेले मुंबई शहरातील घाऊक बाजारातील उलाढालीत माथाडी कामगारांचा फार मोलाचा वाटा असतो. या कष्टकरी वर्गाला संघटित करून त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारे कामगारनेते बाबुराव रामिष्टे यांनी तब्बल ४० वर्षे हे माथाडी कामगार संघटनेचे काम केले.

माथाडी कामगारांत मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यांचे प्रमाण ​अधिक. या कामगारांनी एका वेळेस किती किलोचे पोते अथवा वजन उचलावे, दिवसांतून एकूण किती वजन पेलावे, नगामागे किती किमान मोबदला मिळावा, भार वाहताना दुर्दैवी अपघात घडला तर त्याची भरपाई व साह्य किती असावे आणि कोणी द्यावे, आरोग्यविषयक सुविधा कोणत्या मिळाव्या अशा अनेक मुद्द्यांवर एकतर दुर्लक्ष होते किंवा बाजारपेठेला त्याचे महत्त्वच वाटत नव्हते. १९७० च्या दशकात मजुरीच्या प्रश्नावरून अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू झालेल्या माथाडी कामगार युनियनने कालपरत्वे अशा अनेक मुद्द्यांवर आंदोलने छेडली. बाबुराव रामिष्टेही या आंदोलनांत अग्रभागी असत. ते उत्कृष्ट संघटक होते. संघटनेच्या प्रभावामुळेच महाराष्ट्र सरकारला माथाडी बोर्ड स्थापन करावे लागले. मजुरी, नुकसानभरपाई, आरोग्यसाह्य या मुद्दयांवर घाऊक व्यापाऱ्यांना बोर्डाशी वाटाघाटी कराव्या लागल्या आणि त्यामुळे माथाडींना काही प्रमाणात सुरक्षितता लाभली.

बाबुराव रामिष्टे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यु​नियन स्थापनेत अधिक रस दाखवला. माथाडी कामगारांना त्यांच्या मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. दीर्घ काळ चाललेल्या या लढ्याला यश येऊन त्यांना काही वर्षांपूर्वी नवी मुंबई, चेंबूर, कोकणनगर, वडाळा येथे भूखंडही मिळाले. मात्र त्यांवर प्रत्यक्ष निवासी वसाहती उभ्या राहिलेल्या रामिष्टे पाहू शकले नाहीत.