द हिस्टरी ऑफ डुइंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द हिस्टरी ऑफ डुइंग कर्तेपणाचा इतिहास या पुस्तकामध्ये [१] राधाकुमार या स्त्रीवादी लेखिकेने स्त्री चळवळीचा विकास कसा होत गेला, स्त्री चळवळीचे टप्पे कोणकोणते होते. स्त्रीवादी सिद्धांतने कशा प्रकारे उभी राहत गेली एकूणच स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी संघटना यांचा सखोल ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकामधून समोर येतो.स्त्री चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज राधाकुमार बारा प्रकरणामधून मांडत जातात. सुरुवातीलाच त्या वसाहत काळातील स्त्रियांचा सार्वजनिक अवकाश कशा प्रकारे सुधारणावादी विचार प्रवाहांच्या माध्यमातून उभा राहिला याचे विवेचन विस्तारित स्वरूपात देतात. यामध्ये 'शिक्षण' हा घटक कसा प्रभावी ठरला ते अनेक स्त्रियांच्या अभ्यासामधून मांडत जातात. उदा. पंडिता रमाबाई यांचा जीवनपट मांडून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेला धर्मांतराच्या प्रक्रियेने हादरे बसविले याचे स्पष्टीकरण राधाकुमार देत जातात.

वसाहतकाळ[संपादन]

स्वातंत्र्य लढ्यातून महात्मा गांधीनी स्त्रियांना अधिकाधिक अवकाश कसा उपलब्ध करून दिला. त्यातही काही मर्यादा असल्या तरी त्यामधून राजकीय पटला वरती स्त्रिया स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकल्या हे सरोजिनी नायडू ,अरुणा असफ अली इ. स्त्रियांच्या जीवनपटावरून अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न राधाकुमार करतात. याच काळामध्ये स्त्री संघटन ही स्वतंत्र रित्या उभा राहत होते. स्त्री चळवळ स्वतंत्र रित्या उभा राहत असताना व्यवहारिक आणि सैद्धान्तिक पातळीवरील आपले संमिश्र स्वरूपाचे योगदान ही ऐतिहासिक दृष्ट्या उभे करताना दिसून येतात. खाजगी /सार्वजनिक द्वेताची चर्चा,समानतेच्या हक्काची चर्चा एका बाजूला सैद्धान्तिक स्तरावरून सुरू असतानाच दैनंदिन स्वरूपातील प्रश्नांची सोडवणूक ही वसाहत काळामधील स्त्रियांच्या चळवळी कशा करतात ते दारूबंदीची चळवळ,मिठाच्या सत्याग्रहात असणारा समावेश,क्रांतिकारक बनून ब्रिटीश विरोधात लढाई करणे असो या सर्व प्रक्रियेतून राधाकुमार मांडत जातात.

स्वांतत्र्या नंतर[संपादन]

स्वातंत्र्या नंतर हिंदू कोड बिलाच्या चर्चे मधून स्त्रीवादी चळवळीने हिंदू पर्सनल लॉ विषयी आपली मोहीम उभारली. यातूनच विवाह संबधा मधील कायदे निर्मितीच्या मोहिमा ही निर्माण झाल्या. याच टप्प्यावर स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्व,स्त्री -पुरुष विभेद्नामधील भेद अधिक धारदारपणे अधोरेखित होत गेले. तसेच जन आंदोलनाच्या चळवळी मधून ही स्त्रियांना स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरज निर्माण झाली. बोधगया चळवळ ,तीभागा चळवळ यामध्ये प्रत्यक्ष सहभागी स्त्रियांना पितृसत्ताक व्यवस्थेची दुय्यमत्वाची रचना अधिक उमजण्यास मदत झाली.

संदर्भ[संपादन]