टी.व्ही. अनुपमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टी.व्ही. अनुपमा (१७ ऑक्टोबर, इ.स. १९८६ - ) या केरळ राज्याच्या खाद्य सुरक्षा अधिकारी आहेत. या २०१४ पासून या पदावर आहेत. तेव्हापासून कीटनाशके आणि कीटनाशकयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गटांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडून १५ महिन्यांत केरळमधला ७० टक्के भाजीपाला कीटनाशकमुक्त केला.[ संदर्भ हवा ]

कुटुंबीय[संपादन]

अनुपमा या मूळच्या केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातल्या पोन्नानी गावच्या. वडील-केके बालसुब्रह्मण्यम (निधन - २००२); आई-गुरुवायुर देवस्थानात इंजिनिअर असलेल्या टी.व्ही. रमणी.

शिक्षण[संपादन]

  • एस.एस.सी. - विजयमाता काॅन्व्हेन्ट स्कूल (इ.स. २००२) गुणवत्ता यादीत १३वा क्रमांक.
  • १२वी - सेन्ट क्लेअर्स हाय स्कूल (२००४) गुणवत्ता यादीत ३रा क्रमांक.
  • बी.ई. (आॅनर्स) - बिर्ला टेक्निकल इन्स्टिट्यूट (पिलानी-राजस्थान)च्या गोवा कॅंपसमधून; ९२ टक्के मार्क.
  • आयएएस - भूगोल आणि मल्याळी साहित्य हे विषय घेऊन; गुणवत्ता यादीत ४था क्रमांक.

त्रिवेंद्रम येथे नोकरीत दाखल होण्यासाठी अनुपमा पोचल्या. त्यांचे सामान ट्रकमधून उतरवले जात होते. केवळ एक वाॅशिंग मशीन उतरवायचे बाकी असताना ट्क खाली करणाऱ्या हमालांच्या सीटू (CITU) संघटनेचा नेता बी. मुरली तेथे आला आणि म्हणाला की, 'कुणीही सामान उतरवले तरी, केरळच्या प्रचलित 'नोक्कू कूली' प्रथेप्रमाणे सामान खाली करण्याचे संपूर्ण भाडे मिळण्याचा हक्क त्याचा आहे. इतर कोणालाही पैसे देऊ नयेत.' अनुपमाबाईंनी विरोध केला, वादही घातला आणि त्या नेत्याला पैसे देण्यास नकार दिला. बी. मुरलीने धमक्या द्यायला सुरुवात केल्याबरोबर अनुपमाबाईंनी पोलीस बोलावले आणि त्याला अटक करवली. नोकरीची सुरुवात अशी वादळी झाली.

खाद्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना टी.व्ही अनुपमा यांनी केरळमधल्या शक्तिशाली पेस्टिसाईड लाॅबीशी झुंज घेतली. हळद, तांबडे तिखट, धणे पूड आणि अशा कित्येक मसाल्याच्या पदार्थांचे नमुने बाजारातून गोळा केले, दूषित मसाले विकणाऱ्यांवर पुन्हापुन्हा छापे घालून त्यांनी फक्त १५ महिन्यांत ७५० खटले कोर्टात दाखल केले, आणि कित्येक उत्पादकांना नेस्तनाबूत केले. केरळमधल्या तयार मसाले बनविणाऱ्या जगप्रसिद्ध निरापार कंपनीवर टी.व्ही. अनुपमा यांनी ३४ खटले दाखल केले. पैकी सहा खटल्यात त्या कंपनीला सोळा लाख रुपयांचा दंड केला.

मसाल्याचे हे नमुने गोळा करताना त्यांच्या लक्षात आले की केरळात येणारी सत्तर टक्के भाजी तमिळनाडू आणि कर्नाटकातून येते, आणि या सर्व भाज्यांवर कीटनाशकांचा मोठा थर असतो. हे समजल्यावर केरळी लोकांना धक्काच बसला. ही सर्व आयात बंद केल्यानंतर आता केरळात मोठ्या प्रमाणात भाज्या पिकवल्या जाऊ लागल्या आहेत.

निरापार कंपनीने, केरळ सरकारमधील अधिकाऱ्यांकडे व मंत्र्यांकडे अनुपमाबाईंची हकालपट्टी व्हावी अशी मागणी नोव्हेंबर २०१५ मध्ये केली आहे.