संजीव चतुर्वेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजीव चतुर्वेदी (२१ डिसेंबर, इ.स. १९७४ - ) हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून त्यांना खोट्या आरोपांत गुंतवण्यात आले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्समध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध दुखाऊन त्यांचा भ्रष्टाचार उघड केला.[ संदर्भ हवा ]

शेवटी संजीव चतुर्वेदी यांना दक्षता अधिकाऱ्याच्या पदावरून हटवून एम्सच्या संस्थेत उपसचिव करण्यात आले.

संजीव चतुर्वेदी यांची कारकीर्द[संपादन]

  • सन १९९५ मध्ये अलाहाबादच्या मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी मधून बी.टेक. ही पदवी मिळवली.
  • इ.स. २००२ मध्ये आय.एफ.एस झाले.
  • संजीव चतुर्वेदी यांची पहिली नियुक्ती कुरुक्षेत्र येथे मिळाली. तेथे त्यांनी हांसी-बुटाना कालवा बनवणाऱ्या भ्रष्ट ठेकेदारांवर पोलीस केस केली.
  • पुढील पाच वर्षात चतुर्वेदींच्या १२ बदल्या झाल्या.
  • २००७-०८ या काळात चतुर्वेदींनी झज्जर गावातील एका औषधी-वनस्पतीं उद्यानाच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणला. या घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांबरोबर आमदार आणि मंत्री यांचाही सहभाग होता.
  • २००९ साली त्यांनी हरियाणामधील झज्जर आणि हिसार या वनक्षेत्रातील घोटाळे शोधून काढले.
  • त्याच वर्षी संजीव चतुर्वेदी यांच्यावर एका कनिष्ठ अधिकाऱ्याला वाईट वागणूक दिल्याचा आरोप ठेवला गेला. पण थोड्याच काळात त्यांची या आरोपातून सुटका झाली.
  • या कालखंडात त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर ४ वेळा खोट्या पोलीस फिर्यादी दाखल झाल्या. चारही वेळेला राष्ट्रपतींनी चौकशी करून त्यांना सर्व आरोपातून मुक्त करून परत कामावर घ्यायला लावले.
  • २०१० साली चतुर्वेदींनी हरियाणा सरकारच्या जुलमाला कटाळून अन्य राज्यात बदली मागितली.
  • २०१२ मध्ये त्यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्समध्ये) उपनिदेशकपदावर नेमणूक झाली.
  • त्या कामाव्यतिरिक्त चतुर्वेदींवर AIIMSच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याचे कामही सोपविण्यात आले.
  • १२वी बदली बदली दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्समध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून झाली. तेथे त्यांनी फक्त दोन वर्षांच्या कार्यकालात भ्रष्टाचाराचे १८०हून अधिक घोटाळे उघडकीस आणले. बेकायदेशीरपणे परदेश दौरे करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. त्यातील ७८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात झाली आहे. त्याशिवाय, त्यांनी उघडकीस आणलेल्या ८७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर २० प्रकरणांची चौकशी सीबीआय करते आहे.
  • २०१४ साली आरोग्यसचिवांनी प्रामाणिक अधिकारी म्हणून चतुर्वेदींचा पदक देऊन सन्मान केला.
  • भारतात दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार आल्यानंतर चतुर्वेदींना दक्षता अधिकाऱ्याच्या कामापासून मुक्त करण्यात आले. यावर अजूनही जनतेमध्ये आणि लोकसभेमध्ये चर्चा-वादविवाद सुरू आहेत.


(अपूर्ण)

पुरस्कार[संपादन]

संजीव चतुर्वेदी यांना २०१५ सालच्या मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.