मौन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मौन म्हणजे चूप राहणे, निःशब्द असणे किंवा न बोलणे आहे. साधारणतः, याचा अर्थ अश्या प्रकारे घेतला जातो.परंतु निःशब्दता व भारतीय लोकांत प्रचलित असलेले 'मौन' यात बराच फरक आहे. मुळात ही एक मनुष्यजीवनातील उच्चकोटीची मानसिक स्थिती आहे. संस्कृतमध्ये या शब्दाची व्याख्या 'मुनैर्भावः इति मौन'(मुनींच्या मनात असलेला भाव) अश्या प्रकारे केली गेली आहे.

निरनिराळे उद्देश[संपादन]

  • उत्युच्च आनंदाच्या स्थितीत मन घेऊन जाणे. (उन्मन होणे)
  • एक प्रकारचे मानसिक तप करणे.
  • मननशीलता किंवा सतत मनन करण्याची स्थिती.
  • आत्मसंयम व अंतःकरण शुद्धी.
  • मानसतप व मनाची स्थिरता. मनाच्या विचारांवर नियंत्रण
  • अंतर्मुखता

स्वरूप आणि कारणे[संपादन]

दुःख झाल्यास, भीतीमुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे, अ़ज्ञानापोटी, न बोलण्याचे ठरवून, प्रतिक्रिया देण्याची स्थिती टाळण्यासाठी, वाणीभंग झाल्यास, असमंजस व्यक्तींशी सामना झाला असल्यास, अपराधीपणा वाटल्यास, पापाशन, अति कर्तृत्त्ववान व्यक्तीच्या दर्शनाने, भांडण/वादावादीचा प्रसंग आल्यास, चिंतन करण्यासाठी, इत्यादी कारणांमुळे बहुधा मौन धारण करण्यात येते किंवा ती व्यक्ती मौन होते.[ संदर्भ हवा ]

मौनाचे गुण किंवा फायदे[संपादन]

एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे, मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे हे मौनाचे अनेक गुण व फायदे आहेत.(मौनं सर्वार्थ साधनम्)[ संदर्भ हवा ]

मौन आणि नियम व कायदे[संपादन]

आधुनिक काळातील बहूसंख्य लोकशाही कायदे हे व्यक्तीचा मौन रहाण्याचा धिकार न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा मान्य करतात. व्यक्ती बोलते ते सत्य बोलत आहे काय? हे पडताळण्याच्या काही चाचण्या अलीकडील काळात उपलब्ध झाल्या आहेत. त्या न्यायालयीन परवानगीने वापरल्या जातात. पण अशा चाचणीतील बोलणे न्यायालय कबुली जवाब अथवा पुरावा म्हणून स्वीकारत नाहीत.

विविध शासकीय तसेच अशासकीय कार्यालयांत, विशिष्ट अधिकारी व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना माहिती दिली जाऊ नये याकरीता नियमानुसार सक्ती केली जाते याचा परिणाम 'विशिष्ट विषयापुरते मौन' असा होतो.

मूकसंमती, मूकस्वीकृती : संस्कृती आणि कायदे[संपादन]

मौनातून जे वेगेवेगळे अर्थ अभिप्रेत होतात त्यांत तटस्थता, नकार आणि होकार हे परस्पर विरोधी अर्थसुद्धा परिस्थितिसापेक्ष ध्वनित होऊ शकतात. मौनाचा अर्थ प्रत्येक वेळी मूक संमती होत नाही, पण अशी स्थिती हितसंबंधी व्यक्तीकडून 'गृहीत धरण्या' करता संधी म्हणून वापरली जाऊ शकते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस कमीतकमी दुखवून सुस्प्ष्ट नकार व्यक्त करण्यावर भर दिला जाताना दिसतो. शिवाय संयम धरावा, पण अन्याय सहन करू नयेत असा सल्लाही समुपदेशक वेळोवेळी देताना दिसतात.

प्रीतिविवाह, तसेच पारंपरिक भारतीय विवाहपद्धतीत मुलींची मूकसंमती बऱ्याचदा ग्राह्य धरली गेल्याचे आढळून येते. (मौनम्‌ संमतीदर्शकम्). व्यवसाय करताना सुद्धा मार्केटिंग क्षेत्रातील लोक प्रत्यक्ष ऑर्डर्स न मागता अप्रत्यक्ष संमती मिळवण्याचा मार्ग अंगीकारतात. कॉंट्रॅक्ट अ‍ॅक्ट हा उपहारगृह, तसेच टॅक्सी आदि विविध सेवा व्यवसायांतील सेवा स्वीकारण्यासच अप्रत्यक्ष मूक संमती म्हणून मान्यता देतो. स्त्री संबधीत बऱ्याच कायदे विषयांत आणि खटल्यांत त्यांच्या मौनाचा परिस्थितीनुरूप होणाऱ्या अर्थास महत्त्व असते.

कॉपी राईट कायद्यात कॉपीराईट जाहीर न करता संबंधित कलाकृती लेखन अथवा छायाचित्राचा निर्माता मौन असेल तरी त्याचा कॉपीराईट आपोआप तयार होत असतो. मात्र कॉपीराईट वापरण्याचा अधिकार देणे मात्र सुस्पष्ट व्यक्त केले जाणे आवश्यक असते. तीच गोष्ट वारसाहक्क कायद्याच्या बाबतीत आहे. संबधित व्यक्तीने स्प्ष्ट निर्देश दिलेले नसल्यास संबधीत वारसदारांचे हक्क गृहीत धरले जातात.

योग, अध्यात्म आणि धर्म[संपादन]

काही परंपरा आध्यात्मिक आणि धार्मिक कारणास्तव तसेच, प्रार्थनेपूर्वी अथवा योगाभ्यासापूर्वी, तसेच विपश्यनेत मन शांत होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मौन पाळण्यासाठी मार्गदर्शन करतात. मृतात्म्यास शांती मिळावी व त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने आदरांजली अथवा श्रद्धांजली वाहण्याकरता काही क्षणांकरीता सामुदायिक मौन पाळण्याची प्रथा सार्वजनिक कार्यक्रमांतून पाळली जाताना दिसते.

जैन लोक मार्गशीर्षातल्या एकादशीला मौनी एकादशीचे व्रत करतात.[१] तर माघ महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या व्रत केले जाते.[२]

कधी मौन रहावे[संपादन]

ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे | मौन स्वीकारावे हेचि भले | - ज्ञानेश्वर


वरील उद्धरणाचा[ संदर्भ हवा ]चिंतन/विचार न करता बोलण्यापेक्षा मौन स्वीकारणेच उत्तम आहे.


दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसांत बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात.[ संदर्भ हवा ]

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः । बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्‌ ॥-- पंचतंत्र ४.४८

अर्थ-स्वतःच्या मुखातील दोषामुळे(बोलण्यामुळे), शुक(पोपट) व मैनेस बंधनात (पिंजऱ्यात) ठेवले जाते. तेथे बगळ्याला मात्र बंधनात ठेवले जात नाही. (कारण तो बोलत नाही). मौनाने सर्व काही साधते.

  • स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा | विनिर्मितं छादनमज्ञताया: | विशेषतः सर्वविदां समाजे | विभूषणं मौनमपण्डितानाम्‌ ||- भर्तृहरेः सुभाषितसंग्रह--६८ [ संदर्भ हवा ]

शेवटच्या ओळीचा अर्थ : विशेषतः विद्वानांच्या समाजात मौन हे अपंडितांचे भूषण आहे.

  • उच्चारे मिथुनेचैव प्रस्रावे दन्तधावने। स्नाने भोजनकालेच षट्सु मौनं समाचरेत्।। ---हारीत नामक धर्मगंथ [१]

मनुष्याने कधी मौन धारण करावे याबाबत असे साधारणतः सांगितले जाते की - उच्चार करण्यापूर्वी (बोलण्यापूर्वी), मैथुन करतांना, शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), दात घासतांना, अंघोळ करतांना, जेवताना अशा सहा वेळी मौन धारण करावे.[३]

राजकीय मौन[संपादन]

महात्मा गांधी तसेच विनोबा भावे, अण्णा हजारे इत्यादी मंडळींनी त्यांच्या राजकीय आंदोलनाचा भाग म्हणून मौनव्रत पाळले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र टाइम्स संकेतस्थळावरील मौनं सर्वार्थ साधनम्‌ हा 28 Jul 2010, 0412 hrs IST तारखेचा लेख Archived 2016-03-13 at the Wayback Machine. दिनांक ८ नोव्हे २०११ दु. ४वाजून २० मि.वाजता जसा दिसला
  2. ^ हिंदी विकिपीडिया (हिंदी मजकूर)8 नवम्बर 2011 10:50 UTC ८ नोव्हे २०११ दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी जसा दिसला
  3. ^ तरुण भारत नागपूर.[मृत दुवा] दिनांक ०४ नोव्हें.२०११ रोजी पाहिले.