मन्नेरवारलु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मन्नेरवारलू महाराष्ट्र राज्यात राहणारा आदिवासी समाज आहे. मन्नेरवारलू जमातीचे उगमस्थान महाराष्ट्रातील किनवट येथे आहे. महाराष्ट्र स्थापनेच्या पूर्वी ही जमात हैदराबाद संस्थान मध्ये राहत होती, १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावरकिनवट हा भाग महाराष्ट्र मध्ये सामील झाला.

महाराष्ट्र मधील नांदेड, परभणी, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, यवतमाळ , गडचिरोली, नागपूर मध्ये ह्या जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताचे तेलंगणा राज्याच्या सीमारेषेजवळ ह्या जमातीचे वास्तव्य असल्याने ह्या जमातीचे लोक मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी भाषा बोलतात. मन्नेरवारलू जमातीच्या वस्तीला पोड असे म्हणतात, मन्नेरवारलू जमातीचे लोक देवीचे उपासक असतात. त्यांचे परंपरागत नृत्य दंडारी हे आहे. ह्या जमातीच्या वस्तीच्या मध्यभागी चावडी असते. चावडी म्हणजे मन्नेरवारलू पोड मधील सार्वजनिक सभागृह, तंटे मिटवण्याची जागा. मन्नेरवारलू जमातीच्या प्रमुखाला नाईक, महाजन, कारभारी आणि घंट्या म्हणतात. जमातीत बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. लग्न मामेबहिणीशी सुद्धा होते. परंतु आतेबहीणीशी होत नाही. ही जमात खूप आदिम आहे. आजही स्त्रिया अंगावर गोंदून घेतात. बाळंतपण घरी होते, मुलाचे नाव पाचवीला ठेवतात. ह्या जमातीत प्रेताला पुरतात. पुरुष मिशा ठेवतात. फडके बांधतात. स्त्रिया लुगडे घालतात. स्त्रिया पाटल्या, कोपरकड्या घालतात. वन्यप्राणीची शिकार करून हे लोक खातात. रानडुक्कर, खेकडे, मासोळी ह्यांचे आवडीचे खाद्य आहे. जंगलात जाऊन मोहाचे फुले आणून दारू काढून पितात. शेती करून उपजीविका भागवतात. महिलांचे शिक्षणाचे प्रमाण १० टक्के आहे. पुरुषाचे शिक्षणाचे प्रमाण ३० टक्के आहे. महाराष्ट्रात ही जमात दुर्मिळ होत चालली आहे. ह्या जमातीचे २ लाख लोक महाराष्ट्र मध्ये राहतात. ह्या जमातीच्या उपजमाती आहेत त्यांना मन्नेवार, मन्नेरवार, तेलगू मुनुर, मुन्नूरकापु आदी आहेत. ह्या सर्वांची आडनावे सारखी आहेत. व ह्यांचे उपजमाती मध्ये रोटी बेटी व्यवहार सुद्धा होते. या समाजातील श्रीमंत तुकारामजी मुपडे हे निज़ाम सरकारामध्ये सुरुवातीला मुखेड व नंतरच्या काळात नेरचे जहागिरदार होते. त्यांच्याकडे नेरसह बारा गावांची जहागिरी होती.