सदस्य चर्चा:चैतन्य सावळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत चैतन्य सावळे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन चैतन्य सावळे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,००० लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १५:५४, १५ जुलै २०१६ (IST)[reply]

छत्रपती प्रताप सिंह महाराज व चित्पावनी कारस्थाने[संपादन]

या लेखात तत्कालीन ब्राम्हणी कारस्थानामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर ओढवलेली परिस्थिती प्रबोधनकारांनी कथन केली आहे. दिनांक २९ एप्रिल १९२२ रोजी सातारा येथे श्री शिवजयंतीच्या प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले हे व्याख्यान ‘विजयी मराठा’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

भगिनीबांधवहो, आज पण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहो. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र आणि स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मराठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतक-यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षाही सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात अशा मंगल प्रसंगी `शिवरायास आठवावे’ या विषयानुरुप शिवचरित्राबद्दल मी काही विवेचन करावे, अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाही उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारीत बसून मी साता-याकडे येऊ लागताच माझा तो बेत बदलला.

शिवरायास आठवता आठवता सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतचक्षुसमोर भराभर फिरू लागला; आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्य द्रोही राजधानीत मी येऊन दाखल होताच, शिवाजीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसू लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला साता-याचा अभिमान असणे योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची –हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साता-यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीने या साता-यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हलवणारा, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकाप उडविणा-या हिंदवी स्वराज्याचे रक्त या साता-याच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायाचे गुणगायन करण्यापेक्षा, आमचे हिंदवी स्वराज्य का नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साता-यात पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधाराने विचार केला, तर सध्याच्या स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकिता येतील.

स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणे सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याचे कामी किंचितसुद्धा शरमली नाही, त्यांचा खराखुरा इतिहास उजेडात आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचे पीक मनमुराद आलेले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाही. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण का गमावले, याचा नीट विचार केल्यास सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राम्हणेतर संघाने किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हाच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणे म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्याने आहेत; कारस्थानी वेदांत आहे; ठगांची ठगी आहे; स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे. शिवरायास आठवावे; गोष्ट खरी! परंतु आज शिवछत्रपतींचे स्मरण होताच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या -हासाचे पृथक्करण करण्याकडे आपली स्मरणशक्ती वळते, त्याला इलाज काय? तेव्हा आपण आता छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे करवीरकर शाहू छत्रपती होते. १८१८ साली रावबाजीचे व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचे उच्चाटण पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले. यापूर्वी याच अजिंक्यता-याच्या किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यांनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेत ठेवलेले होते.

सिंहासनाधिष्ठित होताच, महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राम्हणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न हाती घेतला. थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्राम्हणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनी सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राम्हणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राम्हणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरे सहन होणार? ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीने कमरा कसल्या. त्यावेळी या कंपूचे पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढे झालेले त्यावेळचे `लोकमान्य’ म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होत. इंग्रजांकडून मिळणा-या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमाने स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागेपुढे पाहिले नाही तो चांडाळ, छत्रपतीच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल? असले हे लोकमान्य नातू शेंडी झटकून पुढे सरसावताच त्यांच्या पाठीमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ हाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा – अर इचिभन! हत बी भाऊ लेल्या?) असले हे अस्सल ब्राम्हण वीर प्रतापसिंह छत्रपतीची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राम्हण, एकरकमी चित्पावन, अस्सल राष्ट्रीय. तेव्हा आपल्या पक्षाला `सार्वजनिकत्व’ आणण्यासाठी बाळाजीपंतांना एखाद्या फुल्याची गुंजाळाची किंवा औट्याची फारच जरूर भासू लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राम्हणेतर प्यादे हस्तगत झाले. ते कोणते म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले.

खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्राच्या जाळ्यात सापडताच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचे स्वरूप तेव्हाच आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्री नातूकंपूने इंग्रजांच्या हातून छत्रपतीच्या सिंहासनाचे परस्पर पावणेतेरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यानी एकदोन शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले. नातूंनी विचार केला, की हा मरगट्टा छत्रपति ब्राह्मणेतरात धार्मिक आणि सामाजिक जागृती करून आम्हा भूदेवांचे वर्चस्व कढीपेक्षाही पातळ करणार काय? थांब लेका! तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितो, मग पहातो तुझ्या ब्राम्हणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना `स्वराज्यद्रोही’ ठरविण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्त कटाच्या फासात अडकवून जिवंत गाडण्याची नातुशाही या दोन्ही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातूकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तो थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकात आपल्या कारस्थानाची वेसण `खूप शर्तीने’ घातली. अर्थात् सर जेम्स कारनाकपासून तो थेट रेसिंडेट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूत्राच्या हालचालीप्रमाणे `लेफ्ट राइट’ `लेफ्ट राइट’ करू लागली.

या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणास जाळून टाकण्यासारखा आहे. पंरतु तो प्रत्यक्ष घडवीत असताना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर यापैकी एकाचेही अंतःकरण चुकूनसुद्धा कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात ते हे असे असते. अनुयायांची गोष्ट काय विचारावी? जेथे खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्य सद्सद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळताना इतरांना कशाची भीती? प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राम्हणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेताच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचे सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीही कल्पना भासू नये काय, की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळे श्रीशिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरात घुसवीत आहोत? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना `स्वराज्यद्रोही छत्रपति’ म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहीत. या वरून एवढेच सिद्ध होते की, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. आम्हाला जर स्वराज्य मिळवावयाचेच असेल, आमचे उद्याचे स्वराज्य चिरंजीव व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहाच्या वेळी भिक्षुकशाहीने या साता-यात रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याच स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातू संप्रदायाचा आपणास प्रथम बीमोड केला पाहिजे. नव्हे, असे केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाही.

बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, राजहत्या, स्वराज्यहत्या, आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसते बरबटलेले आहे. अर्थात जोपर्यंत हा नातू, किबे केळकर अँड को. चा संप्रदाय महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरेखुरे स्वराज्य लाभणार नाही. या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या पदरात पडणारे स्वराज्य म्हणजे ब्राम्हणभोजनातल्या खरकट्या पत्रावळी हे खूब ध्यानात ठेवा. छत्रपति प्रतापसिंहाने ब्राम्हणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठी खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळातलाच काटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आता वळू. हरप्रयत्नाने घरभेद करून फोडलेल्या अप्पासाहेब भोसल्याला ता. २४ मार्च १८३९ रोजी नातूने रेसिदंट ओवन्सच्या चरणांवर नेऊन घातले व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कटसेना भराभर जमा केली. कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन, हा राजा इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे, आम्ही सर्व पुरावा आपल्याला देतो, माबाप कंपनी सरकारची आम्हाला पूर्ण मदत असावी, असा मंत्र फुंकून रेसिदंट ओवन्सला नातू कंपूने आपले तोंड बनविले. राजकीय बाब ओवन्सच्या मार्फत अशी पेटवून दिली, तो इकडे (अ) धर्ममार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध, कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमाबद्दल फिर्यादीच्या अर्जाची भेंडोळी रवाना करण्यासाठी आपली ब्राम्हणसेना जय्यत उभी केली. आज ज्याप्रमाणे ब्राम्हणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचारांच्या खोट्यानाट्या फिर्यादीची दंगल उडालेली हे, त्याचप्रमाणे चिंतामणरावांच्या ब्राम्हणसैन्याने आपला शंखध्वनीचा संप्रदाय मोठ्या नेटाने चालू केला.

हे राष्ट्रीय ब्राम्हण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहीत. निरनिराळ्या वेळी कंपनी सरकारच्या मोठमोठ्या अधिका-यांच्या छावण्यांपुढे हजारो ब्राम्हणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्याची सुरुवात केली. चिंतामणरावाने तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध नीळकंठ शास्त्री थत्ते यांच्या अर्ध्वयुत्वाखाली ब्राम्हणेतरांना, विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना `शूद्राधम चांडाळ’ ठरविणारे (अ)धार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली. छत्रपतीकडून होणा-या ब्राम्हणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरविण्याच्या कामगिरीने त्यावेळच्या ब्राम्हण स्वयंसेवकांनी अद्भूत `राष्ट्रीय’ कामगिरी बजावली. विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी या कृतघ्न ब्राम्हणांच्या बापजाद्यांची जानवेशेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपति हा `हिंदूच नव्हे, हा हिंदु धर्माचा वैरी आहे,‘ अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकराने शहरोशहरी व खेडोखेडी सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यात बिलकूल कमतरता केली नाही! इतके झाले तरी नातूकंपूच्या मार्गात एक मोठा काटा अजून शिल्लकच होता, आणि तो मात्र कसल्याही लाचलुचपतीला बळी न पडण्याइतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल, तर ज्याला आद्य छत्रपति शिवाजी महाराज `बाळाजी माझा प्राण आहे’ असे म्हणत असत, त्या बाळप्रभू चिटणिसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय. बळवंतराव जर आपल्या चिटणीशीवर चुकूनमाकून कायम राहता, तर त्याच्या चिटणीशी लेखणीच्या घोड्यांनी नातूकंपूच्या घरादारांवर गाढवांचे नांगर फिरविले असते! परंतु चित्पावनी काव्याची पोच जबरदस्त!

बळवंतरावांचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकडा होणार नाही, ही त्याची पुरी खात्री होती. चिटणीशी लेखणीपुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यांपुढे होता. म्हणून हा चिटणीशी कांटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणिसाला एकाकी अचानक पकडून बिनचौकशीचे पुण्याच्या तुरुंगात फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध `अन्याय’ `अन्याय’ म्हणून कोलाहल करणा-या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारात घेण्यासारखे आहे. चिटणीसाचा काटा अशा रीतीने उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक झाला. छत्रपतीच्या राजवाड्यातील अनेक प्रामाणिक नोकरांना पकडून, लाच देऊन, मारहाण करून नानाप्रकारचे खोटे दस्तऐवज पुरावे तयार केले, व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या देवविल्या. काही नातूच्या कारस्थानास बळी पडले व काही स्वामिनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात खितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सह्या शिक्के बनविण्याचे राष्ट्रीय कार्य हाती घेतले. प्रतापसिंह छत्रपति हा ब्राम्हणांचा भयंकर छळ करतो, या नाटकाची उठावणी चिंतामणरावाने आपलेकडे घेतली होती आणि या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवरसुद्धा गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रे बळजबरीने लिहून घेण्यास कमी केले नाही.

राजकारणाच्या बाबतीत छत्रपतीच्या गळ्यात कंपनीसरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकविण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूंनी आपल्या हाती ठेवले होते. या कामी बनावट राजद्रोही पत्रे, खलिते, अर्ज्या या निर्माण करण्याच्या कामी हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ अप्पा शिंदकर या दोघा ब्राम्हणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पनकतेची कसोशी करीत होता. अखेर नातू कंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झाले. गोव्याच्या पोर्जुगीज सरकारकडे प्रतापसिंहाने गुप्त संधान बांधून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हुसकून देण्याच्या बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गव्हर्नराची `वेदोक्त’ खात्री पटली. ब्राम्हणांच्या छळाविषयी कंपनीसरकारने जरी कानावर हात ठेविले – कारण धार्मिक, सामाजिक बाबतीत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच – तरी पण छत्रपतीविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामी चिंतामणरावांचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच काही फुकट गेला नाही. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्या वेळी घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळे, आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडूनफंदफितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळे महाराजांच्या आत्मविश्वाने कच खाल्यास त्यात नवल ते काय? तथापि, काय वाटेल ते होवो आपण जर कोणाचे वाईट करीत नाही, सत्य मार्गाने जात आहोत आणि कंपनी सरकारशी कोणत्याही प्रकारे दुजाभावाने वागत नाही, तर माझे कोण काय वाकडे करणार? अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी नातुकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला.

चिटणिसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे त्यांचा धीर बराच खचला. सरतेशेवटी दैवावर हवाला ठेवून सत्यासाठी येतील ती संकटे निमूटपणे सहन करण्याचे त्यांनी ठरविले. ता. २२ ऑगस्ट १८३९ रोजी मुंबईचे गव्हरनर सर जेम्स कारनॅक आपल्या लवाजम्यानिशी नातूकंपूने शिजवून ठेवलेली गुप्त कटाची हांडी फोडण्यासाठी साता-यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जाताच दुपारी तीन वाजता ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांचे झालेले संभाषण सारांशाने असे होते. –

सर जेम्स :- तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्त कट चालविलेला आहे, आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशी आहे.

महाराज :- काय? आपल्याविरुद्ध मी गुप्त कट केला आहे? अगदी बनावट गोष्ट! आपण या बाबतीत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी.

सर जेम्स :- त्यात काय चौकशी करायची. ख-या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. याउपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरूर नाही. आता आपल्या एकच मार्ग मोकळा आहे, आणि तो हाच की, मी सांगतो या जबानीपत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही.

महाराज :- आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबाला दाखवून त्यांची खात्री पटवून देईन. माझ्यावरील किटाळाचा समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा हीच माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशी दुजाभावाने मी कधीही वागलो नाही. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहिरात उडी घ्यायलाही कमी करणार नाही. परंतु माझ्या कल्पनेतही कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे, त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुलीजबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!

सर जेम्स :- महाराज, मी काय म्हणतो ते मुकाट्याने करा. त्यात तुमचा फायदा आहे. नाहीतर तुमचे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा.

महाराज :- मी राज्याची कधीच अपेक्षा केलेली नाही. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता आहे. परंतु बिनचौकशीने घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल, तर माझे राज्याधिकार आताच घ्या, मी खुशाल भीक मागून आपले पोट भरीन. माझ्या चिटणिसाप्रमाणे मला उचलून तुरुंगात टाकावयाचे असेल, तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन, आता मी आपल्या बंगल्यावरच आहे. मी येथून घरी परतच जात नाही, म्हणजे झाले!

सर जेम्स :- असे करू नका. मी सांगतो याप्रमाणे या कागदावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हा. नाहीतर मला निराळीच तजवीज करावी लागेल,

महाराज :- तुम्हाला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊ काय? ही गोष्ट प्राणांतीही होणार नाही. प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचे स्पष्टीकरण करताना त्यावेळी पार्लमेंटपुढे व्याख्यान देताना मेजर जनरल रॉबर्टसननी जे उद्गार काढले तेच मी आपणास सांगतो. ते म्हणाले, The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome, and is, in my opinion, in itselt a sufficient refutation of all that has been urged against him. (भावार्थ – प्राचीन रोमन साम्राज्याचा नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेसे वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफीतच त्यांच्याविरुद्ध रचलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे.) महाराजांविषयी भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करताना रॉबर्टसननी काढलेले उद्गार चालू घटकेलासुद्धा विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यपुराणांच्या चालू धामधुमीत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा. The Rajah had many reekless and influential enemies, and particulary that he had incurred the enmity of the Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also, that there are no persons so unscrupulous as Brahmins when they have a Brahmanical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that, in such a cause the end hollows the means…… I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tribe as the nost numerous, virulent and influential. I may state that, upon political grounds, there exists mush jealousy and ill will on the part of that race to his Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys, results from the political overthrow of the Brahmin power. (भावार्थ – राजाचे आणि ब्राम्हण लोकांचे भयंकर हाडवैर होते. विशेषतः त्याचे मूळ धर्मविषयक तंट्यांत असल्यामुळे तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाखडीत असे. मी असे स्पष्ट म्हणतो की, या भटांना एकादी भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागेपुढे पाहत नाहीत; कारण त्यांना पक्के माहित असते की हेतू साध्य झाला की साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी होते कसली?...... राजाच्या दुष्मानांत ब्राम्हणांचा नंबर अगदी पहिला. शिवाय ते बरेच असून जितके ते राक्षसी व दुष्ट आहेत. तितकेच वजनदारही आहेत.

राजकारणाच्या बाबतीतसुद्धा ब्राम्हणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीने तर ब्राम्हण लोकांच्या डोळ्यात तो रात्रंदिवस सलत असतो. याचे कारण काय, तर पेशव्यांची ब्राम्हणी राज्यसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडीबहुत राज्यसत्ता जिवंत राहिली, हेच) सन १८४० सालचे हे उद्गार चालू घटकेलासुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपति यांच्या झगड्यात किती सापेक्ष रीतीने सिद्ध होत आहेत, याचा आपणच नीट विचार करा. या हिंदुस्थानात मराठ्यांचे किंवा एखाद्या ब्राह्मणेतरांचे एकही राज्य कोठे शिल्लक राहू नये, जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी, ब्राम्हणेतरांवर ब्राम्हणांची सनातन कुरघोडी असावी, यासाठी या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते, हे जर आपण जरा लक्षपूर्वक विचारत घ्याल, तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राम्हणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी असे जे मी म्हणतो, त्याचा तुम्हाला तेव्हाच उलगडा होईल. तागडीच्या जोरावर सबंध हिंदुस्थानभर तंगड्या पसरणा-या कंपनी सरकारालासुद्धा छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचे संस्थान शिल्लक ठेवणे जिवावरच आले होते. तशात स्वदेशातलेच ब्राम्हण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत, तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर पावणे तेरा या न्यायाने नातूकंपूने शिजविलेल्या बनावट राजद्रोहाच्या हांडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला ते हवेच होते.

म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नातू कंपूने कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातकंपूला परस्पर मिठ्या मारण्यात व्यभिचारी राजकारणाचे बेमालूम डावपेच दोघेही खेळले, हाच इतिहासाचा पुरावा आहे. असो. कंपनीसरकार आपले काही ऐकत नाही, न्यायाचा प्रश्नसुद्धा ते विचारात घेत नाही, उलट हरामखोर ब्राम्हणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा परिस्थितीत केवळ सत्यावर भरवसा ठेवू, परमेश्वरी इच्छेच्या हातात आपल्या दैवाचा झोला सोडून, प्रतापसिंहाने निःशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरविले. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढे छत्रपतीचे सैन्यबळ जरी काहीच नव्हते, तरी छत्रपतीच्या तक्तासाठी रक्ताचा थेंब न् थेंब खर्ची घालणारे मावळे-मराठे व ब्राम्हणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाहीत, याची जाणीव कंपनी सरकारला होती. नातूनेसुद्धा छत्रपतीचे उच्चाटन करण्यासाठी इंग्रजी सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानात फुंकला होता. आणि त्याप्रमाणे तोफखाना, घोडेस्वार यांसह ग्रेनेडिअरची पंचविसावी पलटण ३१ ऑगस्ट १८३९ रोजी पुण्याहून निघून ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता साता-यास येऊन थडकली, ग्रामण्याच्या तंत्रमंत्राने, राजकारणाच्या कागदी बुजगावण्याने किंवा, मुंबईच्या गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीने प्रतापसिंहाचा प्रताप जेव्हा केसभरसुद्धा डळमळला नाही, तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिंमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातूकंपूने ठरविला. या बेताची कुणकुण महाराजांना लागताच, त्यांनी या जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनी विचार केला की, जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू? ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे; सांगलीकर, नातू, किब्यासारख्या राज्यद्रोही हरामखोरांना जहागिरीचा मलीदा चारून माझ्याविरुद्ध उठविलेले आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला. तर त्यात काय आश्चर्य? ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले, यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवाईत करविली, आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातातली सर्व शस्त्रे काढून घेतली.

बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निःशस्त्र केले. राजवाड्यातल्या पटांगणातल्या सर्व तोफातील दारू काढून त्या पाण्याने धुऊन रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा जाहिरनामा पुकारला. प्रजाजनांना आपल्या गळ्याची शपथ घालून महाराजांनी असे विनविले की आज रोजी कंपनीसरकारच्या गो-या सोजिरांनी जरी तुमची घरेदारे लुटली, तरी कोणीही आपला हात वर करता कामा नये. बांधवहो, निःशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी शंभर वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साता-यात आणि तीही अशा काळात की हुं म्हणताच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटात रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखविली, हे ऐकून अंतःकरणात कौतुकाचा व अभिमानाच दर्या खळबळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्याचे नसून कारस्थानी भटाचेच असले पाहिजे. ता. ४ सप्टेंबर १८३९ ची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातूच्या कारस्थानामुळे, सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री मुर्दा पडणार, या कल्पनेने अस्तास जाणारा सूर्यनारायण रक्ताची अश्रु टपटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पासाहेब भोसला, आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपंत नातू या दोघांच्या अधिपत्याखाली गो-या सोजिरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओव्हन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भरा-या मारू लागली. पण साता-यात त्यावेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह! शुद्ध स्मशानशांतता! प्रतिकाराची उलट सलामी छत्रपती देतील, ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद्द छत्रपती भोजनेत्तर आपल्या महालात खुशाल झोपी गेले.

निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी कधीही बिचकत नाही, याचे प्रत्यंतर येथे दिसले. शनिवार वाड्यावर झेंडे फडकविणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राम्हण वीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजिरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढे, पाठीमागे रेसिडेंट ओव्हन्स आणि चार पाच गोरे सोजीर, अशी ही चांडाळ चौकडी, आज आपण ज्या राजवाडयासमोर जमलेले आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राण हरण करण्याकरिता यमदूताप्रमाणे आत घुसली. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिले नाही, त्यांनी झनान्यातील राजस्त्रियांच्या अब्रूकडे पाहिले नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतीच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी `हे आमचे दादा’ असे बोच करून दाखविताच त्यावेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कर्नल ओव्हन्स झटदिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि `तुम हमारे साथ चलो’ असे म्हणून तो त्यांना खेचू लागला. सत्याग्रही छत्रपति काहीही प्रतिकार न करिता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशी उघड्याबोडक्या स्थिती उचलबांगडी झालेली पाहून झनानखान्यात हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरा धावपळ करू लागली. एकच आकांत उडाला. सर्व लोक निःशस्त्र, त्यातच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच काही उपाय चालेना. महाराजांच्या दंडाला धरून ओव्हन्सने त्यांना राजवाड्याबाहेर आणले, आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबले. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारण फिटले. परशुरामाचा वर पूर्ण झाला. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत भिक्षुकशाहीच्या तिरडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.

आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदपणा कचकाऊन फळफळला. एक मिनिटाच्या आत सोजिरांच्या पहा-याखाली सत्याग्रही छत्रपतीची पालखी चालू लागली. प्रजाजन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ, तरीसुद्धा सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला. आपला छत्रपति असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे धबधबे वाहू लागले. पण करतात काय? महाराजांची सत्याग्रहाची शपथ अक्षरशः पाळणे जरूर होते. इतक्यात कोणी एकाने धावत धावत येऊन, आपल्या घरातील एक शाल आणून महाराजंच्या अंगावर घातली. सातारच्या ब्राहणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि क्रिस्टॉल नावाच्या सोजिराच्या आधिपत्याखाली पालखी साता-याच्या हद्दपार झाली. इतक्यात आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापती बाळासाहेब भोसल्यांना काही सोजिरांनी पकडून धावत धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व ते सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेकून दिले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, ``खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीही ताकद झाली नाही, त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्य तक्ताची मी अवहेलना करू काय? मी जरी निःशस्त्र असलो तरी अशाही स्थिती मी पाच पन्नासांना लोळवायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवा.’’ इंग्रजांच्या लोकविश्रुत पॉलिसीप्रमाणे छत्रपतींचा हद्दपारीचा शेवटला मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हते. पहिल्या दिवशी क्रिस्टॉल कंपूने आठ मैलाची मजल मारून निंबगावात मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई म्हशी बांधण्याच्या गोठ्यात, जेथे शेण आणि मूत्र सर्वत्र पसरलेले आहे, उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेंचा सुळसुळाट आहे, अशा जागेत छत्रपतींना आणून बसविले. बांधवहो! या वेळची छत्रपतींच्या मनःस्थितीची आपणच कल्पना करावी हे बरे. दुस-या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या सौभाग्यवती गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले. गाई म्हशीच्य गोठ्यात हिंदूंचा बादशहा हरामखोर ब्राम्हणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही! पण कल्पना कशाला? इतिहास काही मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूणहत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या बेचाळीस बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणे शक्य नाही.

आपला प्रियकर बाप, साता-याचा छत्रपति, हिंदी स्वराज्याचा हिंदू बादशहा गाई म्हशीच्या गोठ्यात वस्त्रांशिवाय बसलेला पाहून गोजराबाईने एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधवहो! यापुढील प्रकार अत्यंत भयंकर. गोजराबाई आठ महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वै-याच्या कैदत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसले औषध आणि कसला उपचार! दैवाची खैर, म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हालताच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीच्या बरोबर बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक. चिटणीसाला जसा अचानक उचकून फेकून दिला, तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिजे. नाही तर हा छत्रपति त्याच्या साहाय्याने एकादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करायचा! म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हनसाहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वारंट सोडले. वारंटातील मजकूर असा होता की, साता-यात तुम्हाला लाखो रुपयांचे देणे आहे ते फेडल्याशिवाय तुम्हाला साता-याबाहेर जाता येत नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुस-या मुक्कामावर वारंटाची टोळी येताच सेनापतीने आपल्या व सेवकांच्या अंगावरील उरलेले काही दागदागिने देऊन त्या शिपायांचा काही तरी समजूत करून (कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना ख-या गोष्टी माहीत होत्या.) त्यांना साता-यास परत रवाना केले. मुक्काम दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेत बाळासाहेब सेनापतीला आमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले. म्हणून औषधोपचारासाठी वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनी क्रिस्टॉल साहेबाची नानाप्रकारे विनवणी केली.

ओव्हन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा ओडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टाल त्या वेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली. मात्र बाळासाहेबाला त्याने का स्वतंत्र मेण्यात चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्टच राहूद्या पण विचा-याच्या नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाही. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबांची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहतात तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला घाण सुटलेली! बाळासाहेबांचा मृत्यू होताच त्यांच्या पतिपरायण पत्नीने एक दोन दिवसांतच प्राणत्याग केला. अशा रीतीने बाळाजीपंत नाते आपल्या ब्राम्हण कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्यांच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडल्या. बनारसला छत्रपति ह्यांना तुरुंगात ठेवले आणि अशा रीतीने सध्याच्या राष्ट्री पक्षांचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर, वगैरे भू-देवांचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले. बाळाजीपंत नातू याने कंपनी सरकारकडून जहागि-या मिळविल्या, अप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळविली, नौबदीचे अधिकार मिळविले, बाळा जोशी नावाच्या एका हलकट वाईकर ब्राम्हणाला त्याच्या `राष्ट्रीय’ खटपटीबद्दल जहागिरी बक्षिस दिली, आणि नातूचे परात्पर गुरु रेसिडेंट ओव्हन्स साहेब यांना मुंबई सरकारच्या शिफारसीवरून वार्षिक चारशे पौंडांचा जादा मलीदा सुरू झाला. सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व-घाताच्या रक्तांनी माखलेल्या अप्पासाहेब भोसल्याने १८ नोव्हेंबर १८३९ रोजी पणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्रौ दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राम्हणांनी कस्सून मेहनत घेतली.

बांधवहो! स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी पणास फारच थोडक्यात सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपाने बाहेर काढणार आहे; त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेकडो ब्राह्मण वीर महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थाने आपल्या दृष्टीला पडतील. हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविलेले आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूने अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचविण्याकरिता हिंदवी स्वराज्याचे पहिले डेप्युटेशन विलायतेस घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत सोळा वर्षे विलायतेत झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, की ज्या दादजी नरस प्रभूने आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याच्या भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेत जाण्याचा प्रसंग यावा हा योगायोग विलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापूजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकातच पहावयाला मिळेल, इतके सांगून मी पुरे करितो. [विजयी मराठा, पुणे, जून १९२२] टीप *१ – लुसिअड हे एक कामिअन्स नामक कवीने, हिंदुस्थानातील पोर्तुगिजांची सत्ता, या विषयावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले महाकाव्य आहे. हे प्रथम १५७१ मध्ये प्रसिद्ध झाले. टीप *२ – ``Committing a literary suicide in their own manuscripts.’’ - Isasc Disraeli टीप *३ – शनवार वाड्याची स्थापना कशी झाली याबद्दल एक आख्यायिका आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे एकदा त्या वाड्याच्या मैदानावरून जात असता तेथे त्यांना एक ससा एका कुत्र्याची पारध करीत असताना दृष्टीस पडला. त्यावरून `आपल्या वाड्याला हीच जागा पसंत’ असे श्रीमंतांनी ठरवून त्या ठिकाणी शनवारचा टोलेजंग वाडा बांधला. परंतु प्रस्तुतच्या देशपरिस्थितीचा सूक्ष्मदृष्टीने विचार केला असता कुत्र्यांच्या मागे ससेच लागलेले दिसत आहेत. टीप *४ – A song for our banner? The watchword recall which gave the Republic her station : ``United we stand – Divided we fall!’’ It made and preserved us a nation! The union of lakes, the union of land, the union of states, none can sever the unioun of hearts – the unioin of hands. And the Flag of our union for ever! हे वर्णन सार्थ आहे!

G. P. Morris टीप *५ – श्लोक – क्वचिद्वीणा वाद्यं क्वचिदपि च हा हेति रुदितम् । क्वचिद्विद्वद्गोष्ठी क्वचिदपि च सुरामत्तकलहः ।। क्वचिद्रम्या रामा क्वचिदपि जराजर्जरतनुः। न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ।।१।।

टीप *६ – मूळ इंग्रजी कविता अशी आहे. When Briton firsr, a Heaven’s command Arose from out the azure main, This was the charter of her land, And guardian angels sung the strain, Rule Birtania! Britaia rule the waves! Britons never shall be slaves.

टीप *७ – कर्नल हेन्री पॅट्रीकच्या व्याख्यानातील एक उतारा वाचकांकरिता येथे नमूद करितो. ``Is life so dear, or peace so sweet, as to be purchased at the price of chains and slavery? Forbid it, Almighty God! I know not what course others may take, but as for me five me LIBERTY or death!-’’

prabodhankar.org/node/251/page/0/8 चैतन्य सावळे (चर्चा) ०८:३३, १ ऑगस्ट २०१६ (IST)[reply]