सूफी अंबा प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूफी अंबा प्रसाद (इ.स. १८५८ - मृत्युदिनांक अज्ञात) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक, तसेच हेर, लेखक, वैद्य होते.

सूफी अंबा प्रसाद
१८५८-अज्ञात
टोपण नाव: सूफी,अमृतलाल
जन्म ठिकाण: मुरादाबाद(आता उत्तर प्रदेशात)
मृत्यु ठिकाण: शिराज,इराण
मुख्य स्मारके: शिराज,इराण
धर्म: हिंदू

जन्म[संपादन]

इ.स. १८५८ मध्ये मुरादाबादमध्ये (आता उत्तर प्रदेश मध्ये)झाला.मुळ नाव अंबा प्रसाद भटनागर. शिक्षण मुरादाबाद,बरेली आणि पंजाब इथे झाले. एम.ए उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरू केला पण वकिली केली नाही.

लिखाण आणि कार्य[संपादन]

  1. इ.स. १८९०, मुरादाबाद , 'जाम्युल इलूक' नावाचे उर्दू साप्ताहिक काढले
  2. इ.स. १९०६ मध्ये पंजाब मधील 'हिंदुस्थान' ह्या वृत्तपतत्रात अल्प काळ काम केले
  3. इ.स. १९०९ मधे 'बागी मसीह' ह्या पुस्तकाचे प्रकाशन; पण लगेचच त्यावर बंदी
  4. इ.स. १९०९ मधे 'पेशवा' नावाचे वृत्तपत्र काढले(बहुधा पंजाबात)
  5. इराणमध्ये 'बेहयात' नावाचे वृत्तपत्र काढले(तोपर्यंत 'सूफी' ह्या नावाने प्रसिद्धी पावले)
  6. नवा वसाहत कायदा (New Colony Bill) विरोधी आंदोलनात सरदार अजितसिंह यांच्या बरोबर सहभाग
  7. 'भारत माता बुक सोसायटी'चा कार्यभार सांभाळला
  8. पहिल्या महायुद्धातील भारतीय युद्धकैदी,जे तुर्कस्तान विरोधात इंग्रजी सेनेकडून लढले होते, त्यांच्या सेनेचे नेतृत्व (Indian Volunteer Corps). कदाचित, अफगाणिस्तान,इराण आणि इतर आखाती देशांची मदत घेऊन इंग्रजांवर सैनिकी आक्रमण करण्याचे जे प्रयत्न झाले,त्यात सहभाग

शिक्षा[संपादन]

  1. इ.स. १८९७ : राजद्रोही ठरवून दीड वर्षाचा कारावास,१८९९ मध्ये सुटका
  2. उत्तर प्रदेशातल्या अनेक इंग्रजी रेसिडेंटांची बिंगे फोडली. खोट्या आरोपांखाली ६ वर्षे कारावास,सर्व मालमत्ता जप्त
  3. इ.स. १९०६ मध्ये सुटका ,नेपाळला पुन्हा अटक आणि लाहोरला रवानगी आणि सुटका

व्यक्तिमत्त्व[संपादन]

  1. विनोदी पण मार्मिक लेखन
  2. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक
  3. शासनकर्त्यांवर कडक टीका
  4. एका हेरास लागणाऱ्या गुणांचा समुच्चय

जनसंपर्क[संपादन]

  1. 'अमृतलाल' ह्या नावाने ते संबोधले जायचे. बरेच लोक त्यांस 'भाईजी' म्हणत.
  2. हैदराबादच्या निझामाशी घनिष्ट संबंध - इ.स. १९०६ मधे सुटल्यावर निझामाने त्यांच्यासाठी एक चांगले घर बांधून ठेवले होते जिथे त्यांनी राहण्यास प्रांजळ नकार दिला
  3. पंजाबात त्यांचे गुण पारखून सरकारी गुप्तहेर खात्याने महिना १००० रुपये देऊ केले होते
  4. सरदार अजितसिंह ह्यांच्याबरोबर नेपाळला इ.स. १९०६ मधे प्रयाण.तेथे नेपाळचे गव्हर्नर श्री . जंगबहादूर ह्यांच्याशी परिचय
  5. इ.स. १९०९ मध्ये सरदार अजितसिंह समवेत इराणला प्रयाण
  6. इराण मध्ये सामान्य लोकांवर मोफत औषधोपचार, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आणि आदर
  7. 'गदर' संस्थेच्या अनेक क्रांतिकारकांशी संबंध

मृत्यु[संपादन]

प्रत्यक्ष मृत्यू कसा झाला याबद्दल जरी अनेक मते असली तरी सूफीजी हे इराण येथील 'शिराज' ह्या शहरात मरण पावले हे निश्चित आहे. देवबंदी संप्रदायाच्या एका तुकडीचे नेतृत्व करीत पर्शिया,बलुचिस्तान,पंजाब असे पुढे सरकण्याचा त्यांचा बेत होता. केदार नाथ सोधी,ॠषीकेश लेठा,अमीन चौधरी हे त्यांना येऊन मिळाले. 'गदर' संस्थेचे बरेच क्रांतिकारी हे उपासमार,अपुरी सामग्री इत्यादी समस्यांमुळे बलुचिस्तानपर्यंत येऊन सुद्धा परत शिराजपर्यंत माघारी गेले. इथेच इंग्रज फौजांनी वेढा घातला ज्यात सूफीजी गोळीबाराने प्रत्युतर देत होते . या नंतर अनेक मते वाचायला मिळतात :

  1. सूफीजी जायबंदी होवून मरण पावले
  2. त्यांना पकडून एका तुरुंगात डांबण्यात आले व दुसऱ्या दिवशी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले.पण दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांचा समाधिस्त मृत्यू झाला

वरील पैकी दुसरे मत अनेक ठिकाणी मांडले गेले आहे. इराणमध्ये(शिराज) मृत्यूपश्चात शोक आणि कबरीची स्थापना,उत्सव.

काही ठळक घटना[संपादन]

  1. सूफीजींना जन्मापासूनच उजवा हात नव्हता. मित्र विचारत तर ते म्हणत, "अरे मी राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यात इ.स. १८५७ मध्ये लढताना हात गमावून बसलो, इ.स. १८५८ मध्ये जन्म झाला तो हात तसाच राहिला !"
  2. सूफीजी हे वेषांतरात पटाईत होते. इ.स. १९०८ च्या सुमारास इंग्रज सरकारने सर्वत्र धरपकड चालू केली होती. तेव्हा सूफीजी आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर साधूचा वेष घेऊन गिरीभ्रमण करीत होते. वाटेत सुट-बूट घातलेला माणूस त्यांच्या सरळ पायी पडला आणि त्याने नम्रतेने विचारले 'महाराज,आपण कोठे राहता?'. त्यावर सूफीजी रागाने उत्तरले 'तुझ्या डोक्यात !'. तो माणूस पुन्हा नम्रपणे म्हणाला 'महाराज,आपण माझ्यावर रागावलात का ?'. त्यावर सूफीजी म्हणाले 'अरे मुर्खा,इतके साधू असताना तू मलाच का नमस्कार केलास?'. तो माणूस म्हणाला 'मी आपणासच साधू समजलो'. ह्यावर सूफीजींनी त्याला भोजनाची व्यवस्था करायला सांगितली. उत्तम भोजन झाल्यावर सूफीजींनी त्याला विचारले 'काय रे,आमची पाठ केव्हा सोडणार?'. तो माणूस गडबडला.सूफीजी त्याला म्हणाले 'चालबाजी सोड,आलाय हेरगिरी करायला ! तुझ्या बापाला जाऊन सांग की आम्ही विद्रोह करणार आहोत!'
  3. इ.स. १८९० मध्ये भोपाळ संस्थान खालसा करता यावे याकरिता तिथला इंग्रज रेसिडेंट हा भोपाळच्या नवाबाच्या अनेक खोट्या तक्रारी सरकार व लोकांकडे करीत असे. एके दिवशी त्या रेसिडेंटच्या घरी एक वेडसर माणूस नोकरीस आला. तो कामाच्या बदल्यात फक्त अन्न मागत असे. भांडी घासताना सगळी राख अंगाला फासून घेत असे व त्यामुळे इतर नोकरांकरिता तो एक करमणुकीचा विषय झाला होता.बाजारहाट हा त्याच्याच हाती दिला गेला होता कारण तो भाव-ताव करण्यात तरबेज होता. ह्याच सुमारास बंगालच्या 'अमृत बाजार पत्रिका' यात रेसिडेंटच्या विरोधात अनेक मजकूर छापून येवू लागले. रेसिडेंटला कळले की कोणी हेर ही सर्व माहिती पत्रास पाठवत आहे. त्याने त्वरित हेरास पकडून देणाऱ्या व्यक्तीस भरघोस बक्षीस जाहीर केले.पोलिसांनी जंग-जंग पछाडून सुद्धा त्या हेराचा मागमूस लागला नाही. शेवटी त्या रेसिडेंटास काढून टाकण्यात आले/बदली झाली. दिल्ली स्टेशनावर ह्या रेसिडेंटास एक विलायती सुटा-बुटातील अस्खलित इंग्रजी बोलणारा एक मनुष्य भेटला. त्यास बघून रेसिडेंट चक्रावून गेला - हा मनुष्य त्याच्या घरी भांडी घासणारा वेडसर मनुष्यच होता ! त्या मनुष्याने रेसिडेंटाकडे बक्षिसाची मागणी केली. ह्यावर रेसिडेंट म्हणाला ' मी तर तुला निघताना बिदागी दिली होती'. तो मनुष्य म्हणाला तुमच्यावर हेरगिरी करणाऱ्या मनुष्यास पकडून देण्याचे इनाम मला हवे आहे'.ह्यावर रेसिडेंट अधीर होवून म्हणाला 'तू त्यास पकडून देऊ शकतोस काय?'. त्यावर तो मनुष्य म्हणाला 'मीच तो हेर आहे !'. रेसिडेंट पार घाबरून गेला - त्याला वाटले की आता हा क्रांतिकारी आपल्याला गोळी घालणार. त्यास सोन्याचे घड्याळ असलेली साखळी देऊन 'सरकारी गुप्तहेर विभागात उच्चपदी तुला महिना १०००ची नोकरी मिळवून देतो'. त्यावर सूफीजी म्हणाले 'पैशाची हाव असती तर मी तुझ्या घरी भांडी घासायला आलो नसतो !' आणि ते तिथून निघून गेले.

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ Indo-German Conspiracy/Ghadar Conspiracy/German Plot

[१]

  1. ^ Indian revolutionaries: a comprehensive study, 1757-1961, Volume 1

[१]

  1. ^ [शहीद भगतसिंह : समग्र वाड्‌मय]