शिवराम जानबा कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र - ??) हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरपूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक व संपादक म्हणून ओळखले जातात. [१] आंबेडकरांच्या अगोदरच्या काळात दलित चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे पुण्यातील भांबुर्डे गावचे वतनदार महार होते. जानबा कांबळेंनी आपला गावकीचा व्यवसाय सोडून पुण्यात युरोपियन लोकांकडे नोकरी धरली. त्यांनी त्यांचा मुलगा शिवराम यास त्याच्या इच्छेप्रमाणे शिकू दिले. शिवराम यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले. त्यांचे राहते घर पुण्याच्या लष्कर भागातल्या भीमपुरा १३७३/६ येथे होते. तेथूनच ते दलितोद्धाराचे काम करीत.

[१]

कारकीर्द[संपादन]

शिवराम जानबा कांबळे हयांनी सन १९०४मध्ये ´श्री शंकर प्रसादिकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज´ नावाची संस्था स्थापली आणि वाचनालयही उघडले. ही भारतातली पहिली दलित समाज संघटित करणारी संस्था होय. महात्मा फुले बाबा पदमनजी यांच्या लेखांतून प्रेरणा घेऊन शिवराम जानबा कांबळे यांनी आपल्या जीवन कार्याला प्रारंभ केला. वेद हे ईश्वरनिर्मित नाहीत या लोकहितवादींच्या बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनाचा आणि अस्पृश्यतेस हिंदू धर्माचा कोणताही आधार नाही, या गोपाळ बाबा वलंगकर यांच्या मतांचा आधार घेऊन शिवराम जानबा कांबळे यांनी आपल्या लेखांतून त्यांनी विचार मांडले कोल्हापुरच्या मराठा दीनबंधू मध्ये प्रकाशित केलेल्या पहिल्याच पत्रात त्यांनी निर्भयपणे व परखडपणे आपल्या मातांची स्पष्टता सर्वांना जाणून दिली. जो मनुष्य महाराचा स्पर्श योग्य मानत नाही, याची सावली त्याज्य मानतो, तोच मनुष्य ख्रिस्ती झाल्यास स्पर्शास पात्र होतो. अहो आमचे दुःख आमचे हिंदू ब्राह्मण बंधू हो, तुम्हाला कळत कसे नाही?

त्यांनी जहाल गटास ' नवीन दांडगा टवाळ पक्ष ' म्हणून त्यावर टीका केली.

चळवळीतील सहभाग[संपादन]

शिवराम कांबळे यांनी सासवड येथे इ.स. १९०३ मध्ये ५१ गावांतील महार लोकांची सभा बोलावली होती. या सभेत महारांना शिक्षण मिळावे आणि महार बटालियनचे पुनर्गठन[ दुजोरा हवा] करून लष्करात तसेच पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात यांसाठी सरकारदरबारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. शिवराम कांबळे यांनी इ.स.१९०८-१९१० या काळात सोमवंशीय मित्र [२]) नावाचे मासिक चालवले. जुन्या अंधश्रद्धा व रुढी यांना कवटाळून राष्ट्र उद्धाराच्या मुळावर घाव घालू नये अशा शब्दांमध्ये त्यांनी तत्कालीन सुशिक्षित पदवीधर व तथाकथित विचारवंत व अस्पृश्य उद्धाराच्या चळवळीकडे उपेक्षेने पाहणाऱ्या लोकांना फटकारले. अहम् केंद्रीय वृत्तीवर देखील त्यांनी टीका केली. हिंदू समाजाची पुनर्बांधणी करायची असेल तर उच्चवर्णीयांनी पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील सासवड गावातील ५१गावंच्या महारांची सभा आयोजित करून १५८८ लोकांच्या स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचा अर्ज त्यांनी सरकारला सादर केला. मात्र शिवराम कांबळे यांच्या प्रयत्नांना या काळात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र यावेळी गोपाळ गणेश आगरकर यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले व अस्पृश्य समाजाच्या मागण्या कशा रास्त आहेत याकडे सवर्णांचे व सरकारचे लक्ष वेधून घेतले. शिवराम कांबळे यांनी सन १९१०मध्ये आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पार्लमेंटला अर्ज सादर केला. त्यांनी घरातील लोकांना न्याय व हक्क व संरक्षण देऊन जपानचे उदाहरण देऊन ब्रिटिश सरकारला आवाहन केले की सरकारने संधी दिली तर महार जमात मागे राहू शकत नाहीत. आम्ही कोणत्याही बाबतीत इतर सैनिकांपेक्षा तिळमात्र कमी नाही या निवेदनाचा परिणाम होऊन सरकारने महारानाही पलटणीत प्रवेश दिला [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b c http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4702230009673326454 शिवराम जानबा कांबळे - पुणे पर्वती सत्याग्रहाचा संक्षिप्त इतिहास: लेखक : हरिश्चंद्र नारायण नवलकर], सुगावा प्रकाशन, एकूण पाने १९४ ISBN10: 8184182274 ग्रंथ दुवा बुकगंगा डॉट कॉम संस्थळावर दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ रोजी जसा मिळवला.
  2. ^ डॉ. आंबेडकर पूर्व समाजसुधारक : शिवराम जानबा कांबळे; लेखक प्रा. सी. एच. निकुंभे पायल पब्लिकेशन एकूण पृष्ठे ४८