उदयसिंहराव गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उदयसिंहराव गायकवाड ( सुपात्रे (शाहूवाडी), ऑगस्ट २८, इ.स. १९३०; - कोल्हापूर, डिसेंबर २, इ.स. २०१४) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. श्रीमंतीनीदेवी (निधन : २ डिसेंबर २००७) हे त्यांच्या पत्‍नीचे नाव. माजी आमदार हर्षवर्धन देशमुख हे उदयसिंहराव यांचे जावई आहेत. त्यांची एक कन्या कागलकर-घाटगे यांच्या घरी दिली असून, अन्य दोन मुली पुण्यात आहेत. मानसिंग गायकवाड हे त्यांच्या मुलाचे नाव.

उदयसिंह गायकवाड कोल्हापूरचे पाच वेळा खासदारत होतेच पण, १९६२ ते १९८० या कालावधी ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. सुपात्रे सारख्यादुर्गम भागातून येऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग, ऊर्जा, सर्वसाधारण प्रशासन, आरोग्य, नागरीपुरवठा तसेच ग्रामीण व शहरी खात्याचे मंत्री म्हणून काम केले. केंद्र शासन आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून विविध शिष्टमंडळांचे सदस्य व नेतृत्वही त्यांनी सांभाळले. अमेरिका, इंग्लंड, पोलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्वीडन, ब्राझील, डेन्मार्क, फ्रान्स, इजिप्त, कुवेत, दुबई, क्यूबा, निकारावा आदी देशांत त्यानी भारताचे प्रतिनिधित्व केले.

खेळ-क्रीडा[संपादन]

कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष असलेल्या गायकवाड यांना विविध खेळांच्या विकासात विशेष रस होता. क्रिकेट, टेबल टेनिस, कुस्ती अशा खेळांत त्यांनी स्वतः अनेक पारितोषिके मिळवली. संसदेच्या क्रिकेट संघाच्या नियमित खेळाडूंना त्यांनी नेहमीच उत्तेजन दिले. शूटिंगमध्ये त्यांनी दोन भारतात व एक अमेरिकेत अशी तीन मेडले जिंकली होती.

विकासकार्य[संपादन]

गायकवाड यांचा लोकसंग्रह मोठा होता. कोल्हापूरच्या विमानतळाचा विकास आणि विमानसेवा, दूरदर्शन केंद्र, कागल येथे नवोदय विद्यालय व सामाजिक विकासाशी संलग्न असे अनेक प्रकल्प मिळवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, म्हणून त्यांनीच प्रथम संसदेत आवाज उठविला होता. सीमा चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली. शाहूवाडीसारख्या मागास तालुक्‍यातही त्यांनी साखर कारखाना आणला. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात चांदोली धरण व गेळवडे हे मध्यम प्रकल्प झाले. त्यातून पन्हाळाशाहूवाडी तालुक्‍यांतील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली.

लेखन[संपादन]

  • उदयसिंहराव गायकवाड यांचे शिकारीच्या अनुभवावरील "ट्रॉफीज‘ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
  • याशिवाय "कथा बारा अक्षरांची‘ ही त्यांची आत्मकथाही प्रसिद्ध झाली आहे.