सरफोजी महाराज दुसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरफोजी महाराज दुसरे
इ.स. १७७७- मृत्यू: इ.स. १८३२ शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी (व्यंकोजी) राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांनी सत्ताग्रहण केले. ते दत्तकपुत्र होते. इ.स. १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे आदर करणारे होते. त्यांच्या राज्यकालात तंजावूरला विद्येच्या माहेरघराचा दर्जा प्राप्त झाला. वाचन आणि ज्ञानसंचयाच्या विलक्षण आवडीतून त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयासाठी त्यांनी परदेशातून विविध विषयांवरची सुमारे ४००० पुस्तके/ ग्रंथ खरेदी केली. अस म्हटलं जात की ही पुस्तके/ ग्रंथ त्यांनी स्वतः वाचले होते. या ग्रंथालयात नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, हत्ती-घोडे यांचे प्रशिक्षण, वेदान्त, ज्योतिष, व्याकरण, संगीत अशा अनेक विषयांवरील ग्रंथ आढळतात.

सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाई साठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी वैद्यक शास्त्रातील प्रगती करता धन्वंतरी महाल प्रयोगशाळेची स्थापना केली. यात ऍलोपथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यांकडून संशोधन चालत असे. या प्रयोगशाळेत अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची खुलासेवार वर्गवारी करण्यात आली. त्यांना चित्रकलेतही विशेष रस होता हे त्यांच्या दरबारातील तैलचित्रांवरून जाणवून येई. त्यांच्याकडे पुरातन दुर्मिळ नाण्यांचा संग्रह ही होता.

सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावूरचे राज्य खालसा केले.