समीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समीक्षेचा अंतःस्वर हा प्रा. देवानंद सोनटक्के लिखित एक आस्वादातून समीक्षेच्या तत्त्वांचा शोध घेणारा समीक्षा ग्रंथ आहे. हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलाला आहे. ग्रंथात एकूण १७ लेख असून ते पूर्वी विविध चर्चासत्रांत वाचले गॆले आहे वा नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथात साहित्यविचार आणि उपयोजित समीक्षा असे दोन प्रकाराचे लेख आहेत.[१]

सोनटक्के यांची समीक्षेची भाषा बोजड आणि पंडिती नाही. त्यामुळे सामान्य वाचकाला ते या वाचनात गुंतवून ठेवतात. कितीतरी नव्या व माहीत नसलेल्या गोष्टी ते सहज समोर मांडतात. उदा. लोकसाहित्यात संज्ञाप्रवाह कसा आहे, त्याचा शोध मर्ढेकरांनी कसा घेतला, ग्रेस यांच्या कवितेत त्यांचे अंतर्मन कसे प्रकटते, आसाराम लोमटे यांची कथा आदिबंधाशी नाते कसे जोडते इत्यादी.

सोनटक्के आस्वाद मांडताना त्याची तात्त्विक चर्चा करतात पण ती बोजड होऊ देत नाही. उदा. मर्ढेकर संवेदनेसाठी प्रयोगशीलता वापरतात. करंदीकर वासनेसारख्या मानवी प्रवृत्तीलाच श्रेष्ठ मानतात. कोलटकरांची कविता अखिल विश्वाची काळजीवाहक आहे, तर ग्रेसची अमूर्त रंगचित्रासारखी आणि अरुण काळेंची तत्त्ववेत्त्याची आहे असे ते मांडत जातात.

समीक्षक द भि कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे सोनटक्के यांनी नवअभिरुचीच्या साहित्याचे स्वागत आणि गतअभिरुचीच्या साहित्याचे पुनर्मूल्यन केले आहे.

साहित्यविचार[संपादन]

या ग्रंथात कुसुमावती देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याविचारांची, वसंत आबाजी डहाके यांच्या समीक्षेच्या सांस्कृतिक दृष्टीची चर्चा करणारे तात्त्विक लेख आहेत .

उपयोजित समीक्षा[संपादन]

पुस्तकात मर्ढेकर, करंदीकर, अरुण कोलटकर,श्रीधर शनवारे, ग्रेस अरुण काळे, दीपक रंगारी यांच्या कविता आणि श्याम मनोहर (शीतयुद्ध सदानंद), ह. मो. मराठे (काळेशार पाणी) आसाराम लोमटे (इडा पीडा टळो) यांच्या साहित्यकृतींची आस्वादक समीक्षा केली आहे.

  • समीक्षेचा अंतःस्वर/ प्रा. देवानंद सोनटक्के/ पद्मगंधा प्रकाशन, पुणे/ पृ.२२४/

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ प्रा सुभाष कदम