सदस्य:साहेबराव नरसाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अहमदनगरचा संरक्षक - दिल्लीगेट[संपादन]

-साहेबराव नरसाळे

  • तो १९५७ सालचा प्रसंग असावा. नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक दिल्लीगेटवर बुलडोझर, ट्रॅक्टर, अधिकारी आणि संरक्षणाचा लवाजमा घेऊन दाखल झाले. ज्या दिल्लीगेटने अनेक युद्धांमध्ये अहमदनगरकरांचे संरक्षण केले, अनेक दु:खद घटना पचविल्या, त्याच या दिल्लीगेटवर नगरपालिकेचे अधिकारी पुन्हा चाल करून आले होते. दिल्लीगेट ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त करायची होती. ही माहिती महान इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांना समजली. ते रात्री पुण्याहून काही सहका-यांसह थेट नगरमध्ये दाखल झाले आणि नगरपालिकेच्या बुलडोझरला आडवे आले. त्यांनी अधिका-यांची समजूत काढली. ही ऐतिहासिक वास्तू अहमदनगरकरांचा अभिमान आहे. तो असा जमीनदोस्त करू नये. पोतदार यांचे म्हणणे अधिका-यांना पटले. ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त करण्याचा नगरी कावा पोतदार यांनी हानून पाडला आणि दिल्लीगेट जिवंत राहिली. आजही ही ऐतिहासिक वास्तू ताठ मानेने उभी आहे, ती पोतदार यांच्यामुळेच!
  • दिल्लीगेट ही ऐतिहासिक वास्तू कोणी बांधली, कधी बांधली आणि का बांधली, असे अनेक प्रश्न घेऊन आजचा अहमदनगरकर या दिल्लीच्या कमानीतून रोज ये-जा करतो. याच प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
  • आपल्या सर्वांना माहितीच आहे, की अहमदनगर शहराची स्थापना निजाम अहमदशहा बहिरी याने १४९० मध्ये केली. १६०० मध्ये मोगलांनी अहमदनगर शहर जिंकले. त्यानंतर निजामशाहीची राजधानी परांडा (जि. उस्मानाबाद), जुन्नर (जि. पुणे), पेमगिरी (संगमनेर), दौलताबाद (जि. औरंगाबाद) अशा विविध ठिकाणी फिरती राहिली. १६१७ मध्ये पुन्हा मलिक अंबर याने अहमदनगर शहर मोगलांच्या तांब्यातून सोडवले. निजामशाही पुन्हा अहमदगरमध्ये अस्तित्वात आली. पण फार काळ टिकली नाही. पुढील दहा वर्षांत पुन्हा अहमदनगरची निजामशाही संपुष्टात आली आणि शहर मोगलांच्या ताब्यात गेले. (असे असले तरीही शहाजीराजे यांनी निजामशाही जिवंत ठेवण्यासाठी मोगलांशी १६३६ पर्यंत निकराचा लढा दिला. पण ते यशस्वी ठरले नाहीत आणि १६३६ मध्ये निजामशाहीचा पूर्ण पाडाव झाला. पुढे १७२४ पर्यंत मोगलांनी अहमदनगरवर अधिराज्य गाजविले.)
  • अहमदनगर शहर निजामाच्या ताब्यातून सोडविल्यानंतर मोगल सम्राट शहाजहान याने अहमदनगरची जबाबदारी सर्जेखान उजबेक या आपल्या विश्वासू सरदारावर सोपविली होती. सततचे युद्ध आणि या युद्धापासून अहमदनगरचे संरक्षण करण्यासाठी सर्जेखान उजबेक याने तीन हजार घोडेस्वार, पाच हजार पायदळ, पागा आणि फौजफाटा घेऊन १६३० मध्ये दाखल झाला. त्याने प्रथम अहमदनगर शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. शहराभोवती मजबूत आणि भक्कम तटबंदी उभी केली. या तटबंदीची लांबी तीन मैल, ६ फूट रुंदी आणि १२ फूट उंची होती. सुरुवातील ही तटबंदी दगड मातीची होती. नंतर त्यात बदल करून ती अधिक मजबूत करण्यात आली. या तटबंदीच्या कामात तळाला दगड आणि वर माती होती. शहरात प्रवेश करण्यासाठी ठिकठिकाणी मोठे गेट तयार करण्यात आले होते. त्यातीलच एक दरवाजा दिल्लीगेट होय.
  • अहमदनगरच्या उत्तरेला दिल्ली हे महत्त्वाचे आणि मोगलांचे सत्ताकेंद्र होते. त्यामुळे या गेटला दिल्लीगेट असे नाव देण्यात आले असावे. या गेटच्या आतमध्ये अहमदनगरकर सुरक्षित होते. गेटच्या बाहेर काही सैनिकी छावण्या असत. दिल्लीगेटची रचनाच शत्रूंचे आक्रमण रोखण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. दिल्लीगेटच्या भिंतीमध्ये चोरवाटा होत्या. त्याचे अवशेष आजही तेथे दिसतात. दिल्लीगेटच्या तटबंदीवरून टेहळणी करण्याची सुविधा होती. या तटबंदीस ठिकठिकाणी ‘जंग्या’ ठेवलेल्या होत्या. दिल्लीगेटच्या भिंतीवरील सैनिक बाहेरून आलेल्या शत्रूंवर आतून तिरप्या छिद्रातून म्हणजे जंग्यांतून मारा करू शकेल, अशी ती व्यवस्था होती. छोट्या तोफांनी मारा करण्यासाठी या जंग्या वापरल्या जात. ते दिल्लीगेटचे निरीक्षण केले असता, आजही दिसते.
  • इतिहासातील शूर सरदार, राजे, महाराजे यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा दिल्लीगेट अनेक रोमांचित, ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. मोगलकाळातील अनेक रक्तपाताचे प्रसंगही याच गेटने पचविले. याच दिल्लीगेटमधून २५ डिसेंबर १८८३ रोजी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची अंत्ययात्रा ब्रिटिशांनी गुपचूपपणे नेल्याची नोंद ब्रिटिशांच्या डायरीत आढळते.
  • स्वातंत्र्योत्तर काळात अनेकदा हा ऐतिहासिक दिल्लीगेट पाडण्याची कटकारस्थाने शिजली. पण इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी नागरिक यांच्या जनरेट्यामुळे ते शक्य झाले नाही. ‘मी आहे निजामशाहीचा वारसदार,’ असे उत्तर देऊन मूळचे पुण्याचे असलेले पोतदार यांनी हा दिल्लीगेटचा ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवला. त्यांच्या या बाणेदार भूमिकेमुळेच आज आपण दिल्लीगेट अभिमानाने मिरवतो आहोत. [१]