सदस्य:कल्याणी कोतकर/धूळपाटी/ क१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नलिनी चोणकर ह्या अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म १२ जून, १९३८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता, तसंच त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांचे वडील कृष्णराव चोणकर हे बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक आणि नट म्हणून काम करणारे आणि बोलपटांमधून अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते.‘मीरामधुरा’ नाटकातील त्यांचे सहकलाकार विश्‍वनाथ बागुल यांच्याशी त्याचा विवाह झाला.

चित्रपटसृष्टीतील जीवन[संपादन]

नलिनी चोणकर यांनी १९५७ साली ‘घरचं झालं थोडं’ या विनोदी चित्रपटात राजा गोसावी या नटाबरोबर प्रथम काम केलं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा ठाकूर होते. अल्पावधीतच त्या मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावल्या. नलिनी यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटविला. तो ‘राणी रूपमती’, ‘साजिश’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे. त्यांनी साकारलेल्या नायिकांच्या भूमिकांमुळे ‘श्रावणकुमार’, ‘सिंहलदीप की सुंदरी’ हे हिंदी चित्रपटही खूप प्रसिद्ध झाले. १९५९ साली राजा नेने दिग्दर्शित ‘याला जीवन ऐसे नाव’ या विनोदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली. मधुसूदन कालेलकर निर्मित या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी, शरद तळवलकर या कलाकारांसमवेत नलिनी यांनीही अतिशय तन्मयतेने आपली भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्य लक्षात आल्यावर त्यांना हिंदीतील ‘मदन मंजिरी’, ‘मॉडेल गर्ल’, ‘पिया मिलन की आस’ या चित्रपटांतूनही भूमिका मिळाल्या. त्यांनी आपले वडील कृष्णराव चोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली १९६२ साली ‘नंदादीप’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा....’हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आजही प्रेक्षकांना भुरळ घालतं. त्यांनी केलेली ‘वाघ्यामुरळी’ या मराठी चित्रपटातील भूमिका लक्षवेधी ठरली होती. देवाच्या नावाने सोडलेल्या मुरळीचं दैन्य ,स्त्रीची मानसिक कुचंबणा त्यांनी त्यातल्या बारकाव्यांनिशी सक्षमपणे आपल्या अभिनयातून उलगडली. नलिनी गुजराती भाषा सहज बोलू शकत. त्यांनी आपल्या नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या बळावर गुजराथी चित्रपटसृष्टीदेखील गाजवली. ‘ढोल मारु’, ‘पाकीटमार’, ‘रानी रिक्षावाली’ या गुजराती चित्रपटांतील त्यांच्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘मत्स्यगंधा’, ‘प्रीतिसंगम’, ‘मीरामधुरा’, ‘बावनखणी’, ‘अठरावं वरीस धोक्याचं’ अशा दर्जेदार नाटकांमध्ये नलिनीनी काम केलं.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

चित्रपट निवृत्तीनंतरही नृत्य व अभिनयाशी असणारे त्यांचे दृढ नाते त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी १९८५ साली नृत्य आणि अभिनय याचे शिक्षण देणारी संस्था सुरू केली.अर्धांगवायूच्या आजाराने २६ जून २००५ रोजी त्याचं निधन झाले.

संदर्भ व नोंदी[संपादन]