"श्रीकृष्ण नरसिंह गुत्तीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकृष्ण नरसिंह गुत्तीकर (जन्म : ८ डिसेंबर १९३४; मृत्यू : पुणे, २९...
(काही फरक नाही)

२२:३८, २ जून २०१७ ची आवृत्ती

श्रीकृष्ण नरसिंह गुत्तीकर (जन्म : ८ डिसेंबर १९३४; मृत्यू : पुणे, २९ मे. २०१७) हे एक माजी विषाणुशास्त्रज्ञ होते.

वडील स्टेशनमास्तर असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या निमित्ताने गुत्तीकरांचे भारतातील विविध भागांत भ्रमण झाले. मात्र त्यांचे शालेय शिक्षण कुर्डुवाडीत झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना त्यांचे शिक्षण बीएस्र्‌सीच्या दुसर्‍या वर्षी सोडावे लागले. घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी त्यांनी मिळेल ती नोकरी स्वीकारली. मात्र त्यांची विज्ञानजिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या काळी पुण्यातील विषाणुशास्त्र संस्थेत अमेरिकन संचालक होते व तेथे संपूर्ण लोकशाहीचे वातावरण होते. यामुळे पदवी नसूनही, गुत्तीकर यांची विज्ञानजिज्ञासा पाहून त्यांना त्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. विषाणुशास्त्र संस्थेत त्यांनी कधी माकडांचा, कधी कीटकांचा अभ्यास करून विषाणूंवर संशोधन केले. मात्र पदवीचा अडसर असल्यामुळे त्यांच्या एकट्याच्या नावे शोधनिबंध प्रकाशित होऊ शकत नव्हते; पण त्यांनी केलेल्या संशोधनाचे श्रेय त्यांनाच देण्यासाठी संस्थेनेच, प्रबंधांमध्ये सहलेखक म्हणून त्यांचे नाव देण्यास सुरुवात केली. पदवी नसली तरी विज्ञानातील त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना संस्थेत मान मिळत होता. त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी या संस्थेत गुत्तीकरांनी ३८ वर्षे नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

विज्ञानप्रसाराचे कार्य

निवृत्तीनंतर एस.एन. गुत्तीकरांनी स्वतःल पूर्णवेळ लोकविज्ञान चळवळीच्या कामाला वाहून घेतले. ते दर वर्षी विज्ञान आणि वैज्ञानिकांविषयी माहिती देणारी दिनदर्शिका प्रसिद्ध करत. हे काम त्यांनी २७ वर्षे केले. दिनदर्शिका निव्वळ विक्रीसाठीच प्रसिद्ध करून विक्रेत्यांच्या हवाली करायची असे न करता, ती दिनदर्शिका शाळांमध्ये, विज्ञानाशी संबंधित लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी ते नेहमी झटत. यातूनच त्यांनी राज्यभरात अनेक माणसे जोडली व त्यांचा आदर्श ठेवत, त्यातील अनेकांनी पुढे विज्ञानकार्याला वाहून घेतले आहे. गावागावांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने ते विज्ञान दिन, विज्ञान जत्रा, विज्ञान मेळावे आदींचे आयोजन करीत. चळवळीस वाहून घेण्याच्या स्वभावामुळेच डॉ. अनंत फडके, अरुण देशपांडे, सुधीर बेडेकर, दत्ता देसाई यांच्यासारखे विज्ञानवादी सहकारी आणि विद्यार्थी त्यांच्याशी जोडले गेले.