"जैतुनबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जैतुनबी ऊर्फ जयदास महाराज (जन्म : माळेगाव-बारामती, इ.स. १९३०; मृत्य...
(काही फरक नाही)

१२:०१, १७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

जैतुनबी ऊर्फ जयदास महाराज (जन्म : माळेगाव-बारामती, इ.स. १९३०; मृत्यू : पुणे, ७ जुलै, इ.स. २०१०) या एका वारकरी संत होत्या.

बालपण आणि वारकरी होण्याची सुरुवात

जैतुनबी ही गवंडी काम करणार्‍या मकबूलभाई सय्यद यांची मुलगी. बारामतीजवळचे माळेगाव हे त्यांचं मूळ गाव. मकबूलभाईंची भेट वारकरी संप्रदायाच्या गुण्याबुवांशी पडली. गुण्याबुवा जवळच्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडीला. गवंडीकाम करीत. एकाच व्यवसायातले असल्याने गुण्याबुवा आणि मकबूलभाई मित्र बनले आणि एकत्र मिळून गवंडीकाम करू लागले. त्‍यांच्या हरिभक्तीमुळे लोक गुण्याबुवांना हनुमानदास महाराज म्हणत. या माणसाला भजन-कीर्तन करण्याचा छंद होता. .दहा वर्षांची छोटी जैतुनबी त्यांच्याबरोबर भजनकीर्तनात रमू लागली, आणि वारकरे संप्रदायात सामील झाली, ती कायमची.

दीक्षा आणि वारीत सहभाग

मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या जैतुनबी यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. लहानपणी सापडलेल्या श्बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे त्यांना पांडुरंगाचा ध्यास लागला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हनुमानदास महाराज बैराग यांच्याकडे दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. सूफी परंपरा असूनही ज्ञानोबा-तुकारामांच्या पालखीबरोबर एकसष्ट वर्षे त्यांनी वारी केली. ६२व्या वारीच्या दरम्यान, पालख्या पुण्यात असताना त्या निधन पावल्या

भागवत संप्रदायाची शिकवण आचरण्यात आणणार्‍या जैतुनबी उत्तम कीर्तनकार होत्या. प्रसंगी सायकलवरून गावोगावी जाऊन त्यांनी कीर्तने केली. रसाळ वाणी आणि स्पष्ट विचार यामुळे त्यांच्या कीर्तनाला भाविकांची नेहमीच गर्दी असे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ात स्वतःची दिंडी घेऊन जैतुनबी नेमाने सहभागी होत. त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असत. पालखी मार्गावर कीर्तन, भजन करीत आपले विचार सामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले. महाराष्ट्रातील वारकर्‍यांना जैतुनबी यांच्याबद्दल कमालीचा आदर होता.

आळंदी आणि पंढरपूर येथे जैतुनबींचे मठ आहेत.

स्वातंत्रलढ्यात सहभाग

जैतुनबी या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्यात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता.

समाजकार्य आणि निधन

अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीशिक्षण यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. भागवत धर्माची पताका आयुष्यभर खांद्यावर फडकवत ठेवणार्‍या ऋषितुल्य जैतुनबी यांना पालखी सोहळा सुरू असतानाच इहलोकीची यात्रा संपवता आली. पालख्या पुणे मुक्कामी आल्यानंतर जैतुनबी यांचे रात्रीचे कीर्तन नित्याप्रमाणे यथासांग पार पडले. त्यानंतर त्यांना मृत्यू आला.