विरामचिन्हे
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.
बोलली जाणारी कोणतीच भाषा अशुद्ध नसते. भाषा लेखनाला मात्र काही वैश्विक परिमाणे असतात. थोड्याशा सजगतेने वाचन केले तर ती लक्षात येतात. नियम पाठच करायला हवेत असे नाही.
आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असावे. कारण वाचणारा दुनियेच्या कुठल्याशा कोपऱ्यात असतो हे आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना थांबायचे कुठे,किती वेळ आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्यात यासाठीही ते आवश्यक वाटते.
भाषाभाषांत थोड्याफार फरकाने नियम सारखेच असतात. संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मोडी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ नसायचे तशी व्याकरण चिन्हेही नसायची. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण आग्रह करत आहोत. तो रास्त आहे. तसा दर्जा मराठीला मिळायलाच हवा.
दोन शब्दांमध्ये व वाक्यांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. मात्र मराठीसाठी आंग्लभाषेतून स्वीकारलेली व्याकरण चिन्हे लिहिताना ती शब्दास जोडून लिहिली जावीत.
वृत्त आणि छंदातील काव्य लिहिताना कवीला ऱ्हस्व-दीर्घाचे स्वातंत्र्य असते. मात्र काही महाकवी मुक्तछंदातही नको तिथे जोड-तोड करतात.
एखाद्याचे उद्गार लिहिताना मात्र ते दुहेरी अवतरण चिन्हात जसेच्या तसे लिहिले जातात.
विरामचिह्न[संपादन]
- पूर्णविराम ( . ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिह्न संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि.आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
- स्वल्पविराम ( , ) (इंग्रजीत comma ) : एकाच विभागातील अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. शेवटच्या दोन शब्दांमध्ये व/आणि वापरतात. एखाद्याला हाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात भाजी,गाजरे,पालक,बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
- अपूर्णविराम (:) (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
- अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
- उद्गारचिह्न ( ! ) (इंग्रजीत exclamatory) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत! अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
- प्रश्नचिह्न ( ? ) (इंग्रजीत Qualification mark) : एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
- एकेरी अवतरणचिन्ह (‘…’) (इंग्रजीत single inverted comma) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हे वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचचिन्हे असतात. ही चिन्हे उलट-सुलट स्वल्पविरामांसारखी दिसतात.
- दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) (इंग्रजीत double inverted commas) : बोललेले वाक्य मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी अवतरण चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
- संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पती-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
- 'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
- तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० किंवा ७/५/२०२० रोजी.
- अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी खुलाशाच्या अगोदर वापरतात. उदा० सुमेध-माझा मामे भाऊ- आज एक चित्र काढणार होता.
- शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
- जुन्या काळी साहेबचे संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, आप्पासाहेबसाठी आप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
- 'किंवा' या शब्दाऐवजी (/) (तिरपा डॅश) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे सुद्धा :
- 'एकेरी खंजीर' नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दाला लागून हे चिन्ह वापरतात व एकापेक्षा अधिक खुलासे असतील तर दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ - पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
- 'संदर्भ अंक' ग्रंथात/पुस्तकांत खुलासे परिशिष्टात केले असतील तर जितके खुलासे असतील त्यांना क्रमाने नंबर दिले जातात. ते शब्दाच्यापुढे घातांकासारखे लिहितात.
उदा.नचिकेत² वज्रबाहू³
- 'काकपद)^ हस्तलेखनात एखादा शब्द विसरला तर तो ओळीच्या वर लिहून तो शब्द ज्या ठिकाणी हवा त्या जागी काकपद दिले जाते.
उदा.
- मूर्ख
तुम्ही एक ^माणूस आहांत. वगैरे, वगैरे.
विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी मराठी उदाहरणे[संपादन]
खालील गोष्ट प्र.के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे.[ संदर्भ हवा ] स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.
एकदा ना.सी. फडके अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन."
त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,
"मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या."
ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे :
"अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'
विरामचिन्हांनी नटलेली मराठी स्त्री[संपादन]
या विषयी एक गंमतीदार कविता आहे, ती अशी :
'अनुस्वारी' शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी ।
'प्रश्नचिन्ही'डुलती झुमके
सुंदर तव कानी ।
नाकावरती 'स्वल्पविरामी'
शोभे तव नथनी ।
'काना' काना गुंफुनी माला
खुलवी तुज कामिनी ।
'वेलांटी'चा पदर शोभे
तुझिया माथ्याला ।
'मात्रां'चा मग सुवर्णचाफा
वेणीवर माळिला ।
'उद्गारांचा' तो गे छल्ला
लटके कमरेला ।
'अवतरणां'च्या बटा
मनोहर भावती चेहऱ्याला ।
'उ'काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरती ।
'पूर्णविरामी'
तिलोत्तम तो
शोभे गालावरती ।।
हिंदी[संपादन]
रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!