वसंत मिटकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंत रामेश्वर मिटकरी

वसंत रामेश्वर मिटकरी (जन्म : लोणीघाट-बीड जिल्हा, ३ ऑगस्ट १९५४) ऊर्फ भाऊ मिटकरी हे श्री स्वराज एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आहेत.. एखादी महाराष्ट्रीयन व्यक्ती शून्यातून सर्वकाही कसे उभे करू शकते याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

व्यवसाय[संपादन]

दहावीचा परीक्षा अर्ज भरायला पुरेसे पैसे नाहीत म्हणून म्हणून भाऊ काम करण्यासाठी पुण्याला आले. येथे त्यांनी लहानलहान उद्योग सुरू केले. सकाळी ते एका वाण्याच्या दुकानात काम करीत. त्याशिवाय चहाचा मोठा पुडा आणून त्या छोट्या पुड्या बनवून विकणे, घरीच राख्या तयार करून त्या राखी पौर्णिमॆच्या सुमारस बाजारात विकणे वगैरे उद्योग त्यांनी सुरू केले. ते सायकलवरून साबण आणि साबणाची खोकीही विकत. असे करता करता वसंत मिटकरींना चांगले दिवस आले. घरची अडीच एकर शेती होती, तीत ऊस पिकवून त्यापासून गूळ बनवण्यासाठी त्यांनी 'रानभवानी गूळ' नावाचा लघुउद्यॊग सुरू केला. सुरुवातीला भाऊंची शेती केवळ अडीच एकर होती मात्र आज ती पाचशे एकर आहे. शेतीतला जास्तीचा ऊस ते जवळच्याच भीमाशंकर शुगर्सला विकू लागले. कालांतराने ते त्या साखर कारखान्याचे भागीदार झाले.

भाऊंनी बीड-गावाकडे शेती सांभाळायला दोन भाऊ ठेवून, दोन भाऊ पुण्यात व्यवसायाला आणले. ते सर्व कष्टाने मोठे झाले. ते रिटेल आणि होलसेलची दोन दुकाने चालवतात.

भाऊंचे लहान बंधू शंकर मिटकरी यांनी साईशंकर फिल्म्सची स्थापना केली आणि त्यातर्फे महेश कोठारी दिग्दर्शित ‘दुभंग’ आणि मकरंद अनासपुरेच्या अभिनयाचा ‘तीन बायका फजिती ऐका’ हे चित्रपट काढले. जागतिक पातळीवर सन्मानित झालेला ‘सतना गत’ हा चित्रपट भाऊंनी फायनान्स केला. 'तीन बायका फजिती ऐका'मध्ये वसंत मिटकरींनी सरपंचाची एक छॊटी भूमिका देखील केली आहे.

शिक्षण आणि शिक्षण संस्था आणि समाजकार्य[संपादन]

किंमतीच्या बाबतीत कडक असलेले भाऊ व्यवहाराला चोखंदळ आहेत. तरीही रिटेल दुकानदारांना २०% मार्जिन देऊन भाऊंनी व्यवसाय पुढे आणला. किंमतीच्या या खेळापासून भाऊंनी स्वराज महाविद्यालयाला खूप लांब ठेवले. कारण ‘मी शिकलो नाही माझी मुले शिकतील, माझ्या गावची मुले शिकतील, माझ्यासारख कोणी गरीब म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये’ ही त्यांची समज शिक्षकांना असते.

आळंदीमध्ये भाऊंनी वसंत मिटकरी भक्त निवासाची स्थापना केली यामध्ये सुमारे शंभर मुले शालेय शिक्षणाबरोबर ‘गायन – वादन – तबला – पेटी’ असे वारकरी संप्रदायातील शिक्षण घेत आहेत.

भाऊंची माणसे[संपादन]

भाऊंचा ओरडा खाऊनसुद्धा त्यांच्याबरोबरच काम करायचे असा भाऊंच्या कामगारांचा आग्रह असतो. त्यासाठी भाऊंनी बरेच परिश्रम घेतले आहेत. कामगारांसोबत वयाच्या साठीतही ते कामगारांसारखे काम करतात, कामगारांसमवेत एकत्र डबा खातात. कामगारही त्यांच्यावर प्रेम करतात. भाऊ या सगळ्यांना घेऊन कधी ट्रीपपण आखतात. नुकतेच भाऊंनी तीनशे भाविकांना काशीयात्रेला नेऊन आणले.

भाऊंच्या दुकानातील दिवाळीची लक्ष्मीपूजा काही औरच असते. सर्व कामगारांना खुश ठेवण्याचे खूप सारे फंडे भाऊंकडे आहेत. कामगारांचे चुकले तरी थोडी ॲडजेस्टमेंट करायची, कारण थोडीशी चूक असेल तर आपल्यासारखे दिवस कोणी बघू नयेत ही त्यांची भूमिका आहे.

भाऊंचे काम[संपादन]

पायाचा ॲक्सिडेंट झाल्यावरही ते बँडेज बांधलेला पाय टेबलावर ठेवून काम सुरू ठेवत. कोणतेही काम जलदगतीने व कोणत्याही गोष्टीला न घाबरता बिनधास्त करण्याचे अशी भाऊंच्या कामाची रीत आहे.

भाऊंनी स्थापन केलेल्या काॅलेजचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाबद्दलच्या आस्थेकडे बघून 'भाऊ तुम्ही राजकारणात का ट्राय करत नाहीत' असे विचारल्यावर एक त्यांचे उत्तर खरच मजेदार होते, ‘मला राजकारणात बरेचदा या म्हटलं गेलं, पण त्यासाठी खोटं बोलण्याचा क्लास कुठे आहे का? खोटी आश्वासने देण्याचा वर्ग कुठे भरतो का? हे मला शोधावं लागेल, कारण अद्याप मी असं आधी कधी केलेलं नाही आणि असा वर्ग मिळाला तर नक्की राजकारणही करीन...’

भाऊंचा इमानदारीने काम करावा हा आग्रह असतो. चुकीचे काम करायचे नाही आणि त्यामुळे कुणाच्या बापाला घाबरायचे नाही, म्हणून त्यांची सर्व उत्पादने ही ‘इमानदारीयुक्त उत्पादने’ म्हणून प्रसिद्ध आहेत. याचे चांगले उदाहरण म्हणजे टीव्हीवर कोणतीही जाहिरात नसताना रोजचा पुणे, सातारा, अहमदनगर आणि मराठवाडा येधील भाऊंच्या उत्पादनांचा खप.

भाऊंचे आणखी एक दर्जेदार उत्पादन म्हणजे ‘भाऊंच्या स्वराज महाविद्यालयातले विद्यार्थी’. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणींना जातीने लक्ष देऊन त्या गरजा पुरवताना भाऊ प्रत्येक मुलाच्या पालकांची भूमिका बजावतात. एखादी गोष्ट कमी पडते आहे असे सकाळी लक्षात आल्यास ती संध्याकाळपर्यंत पूर्ण कशी होईल याची भाऊ गंभीरतेने दखलअंदाजी घेतात. आणि कोणती गोष्ट अपुरी आहे हे समोरच्याने सांगण्याच्या किंवा दाखवण्याच्या आतच ते पुरी करतात.