बिंदुमाधव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिंदुमाधव जोशी (२५ सप्टेंबर, इ.स. १९३१ - १० मे, इ.स. २०१५[१]) हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक होते. ग्राहक संरक्षण कायदा निर्मितीमध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता.

बिंदुमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी अनंत चतुर्दशीला झाला. त्यांचे वडील बटुकभैरव जोशी हे लोकमान्य टिळक यांचे अंगरक्षक होते. त्यांचा प्रभाव असल्यामुळे बिंदुमाधव जोशी यांनी तालमीत जाऊन बलोपासना केली होती. पुण्यातील स.प. महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी संपादन केली. १९५४ मध्ये दादरानगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र उठावात भाग घेतला होता. पुढे ते गोवा मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी झाले होते. देशभरातील ग्राहकांना संघटित करण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सर्वसामान्य ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देणारी ही चळवळ देशभर फोफावली. जोशी यांच्या अथक प्रयत्‍नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर असताना १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. कॅबिनेट दर्जा असलेल्या या समितीचे अध्यक्षपद बिंदुमाधव जोशी यांनी भूषविले होते.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5538549035833418284&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20150511&Provider=- Archived 2016-03-04 at the Wayback Machine. सकाळ वृत्तसेवा&NewsTitle='ग्राहक पंचायत'संस्थापक बिंदुमाधव जोशी यांचे निधन