पदरगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्जत - खांडस मार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मित करण्यात आली होती. हे दोनही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे प्रस्तरारोहणाचे सामान वापरूनच गड सर करता येतो.पदरगडावरील २ कातळ सुळक्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते.
Padargad
इतिहास :
पदरगड कोणी व केंव्हा बांधला याची माहीती उपलब्ध नाही. या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयन्तांचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले. त्यावेळी पदरगड व तुंगी हे पूरातन किल्ले त्याने टेहळणीसाठी पुन्हा बांधून घेतले.
पहाण्याची ठिकाणे :
पदरगडावर चढण्यासाठी "चिमणी क्लाईंबचा" टप्पा व त्यानंतरचा प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून, गडमाथा व डोंगर यांमधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पहायला मिळते.यात ५-७ माणसे आरामात राहू शकतात. तर डाव्या बाजूला ५ फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा पहायला मिळते. (यात जेमतेम एक माणूस बसेल एवढी जागा आहे.) या दोन्ही गुहांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. तसेच त्या वेगवेगळ्या उंचीवर असल्यामुळे या गुहांमधून गणेश घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर दूर पर्यंत लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. गडमाथा व डोंगर या मधील खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. पण यातील ५ फूट उंचीपर्यंतच्या सर्व पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. या अडचणीच्या ठिकाणी असलेल्या झाडाचा आधार घेऊन हा भाग पार करावा लागतो. पुढे ५-६ पायऱ्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूस कातळकडा व दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. कातळकड्याला लागून बांधीव १०-१२ पाय‍र्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
गडमाथा दोन भागात विभागलेला आहे. पहील्या भागात छोटे पठार असून त्यावर कातळात कोरलेली ३ पाण्याची बुजलेली टाकी आहेत. या भागात वास्तूंचेही दोन चौथरे पहायला मिळतात. गडमाथ्याचा दुसरा भाग पहील्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे. गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले २ कातळाचे सुळके आहेत. त्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते. पहील्या सुळक्याच्या खाली समोरच कातळात खोदलेल १ पाण्याच टाक आहे. जवळच वास्तूचा चौथरा आहे. या सुळक्याला उजव्या बाजूस ठेवून २ सुळक्यांमधील जागेतून आपण दुसऱ्या सूळक्यापाशी पोहोचतो. या दुसऱ्या सुळक्याला डावीकडे ठेवत चिंचोळ्या मार्गावरून आपण कातळात खोदलेल्या प्रशस्त गुहेत पोहोचतो. या गुहेत १०-१२ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. तसेच ३० माणसे बसू शकतात. गडावरील पाण्याची सर्व टाकी बुजलेली असल्यामुळे गडावर पिण्याचे पाणी नाही.
पदरगडावरून पूर्वेला भिमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते. त्याच्या उत्तर टोकाला सिद्धगडाचा डोंगर दिसतो. गडाच्या उत्तरेला खाली तुरळक घरांची वस्ती दिसते, तीला "पदरगडवाडी" या नावाने ओळखतात. पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक दिसते.
पोहोचण्याच्या वाटा :
पदरगडावर जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. कर्जतहून खांडस या गावी यावे. खांडस ते कर्जत सुमारे १४ कि.मीचे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने जाण्याची सोय आहे. खांडस गावातून शिडी घाट , गुगळ घाट आणि गणेश घाट या तीन वाटांनी भीमाशंकर गाठता येते. त्यापैकी गणेश (गणपती) घाटाने अर्ध्या तासात घाटातील गणपती मंदिरापाशी पोहोचता येते. तेथून अर्ध्या तासात घाटातील विहिरी जवळ पोहोचतो. या विहिरीला जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. याठिकाणी पाणी भरून घ्यावे कारण गडावर पाणी नाही.
विहिरीच्या पुढे (लगेचच) एक वाट उजवीकडील जंगलात शिरते. या वाटेने जंगल संपल्यावर लागणारा खडा चढून आपण अर्ध्या तासात कातळाच्या एका चिंचोळ्या बोळापाशी येतो. ४ फूट लांब २ फूट रूंद व १० फूट उंच असलेल्या या बोळाची दुसरी बाजू बंद आहे. तसेच वरून पडलेल्या दगडांमुळे याचे छ्त ही बंद झालेले आहे. या ठिकाणी एका वेळी फक्त २ माणसे उभी राहू शकतात. "चिमणी क्लाईंब तंत्राचा" (पाठ व पाय एकाचवेळी भिंतीवर रोवून वर चढणे) वापर करून हे अंतर चढून जावे लागते. याठिकाणी वरच्या बाजूला एक बोल्ट मारलेला आहे. त्यात रोप लावूनही वर चढता येते.
हा कठीण टप्पा पार केल्यावर लगेच एक कातळटप्पा आहे. हा १५ फूटाचा टप्पाही दोर लावून चढावा लागतो. त्यासाठी वरच्या बाजूला एक बोल्ट मारलेला आहे. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून, गडमाथा व डोंगर यांमधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पहायला मिळते. गडमाथा व डोंगर या मधील खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. पण यातील ५ फूट उंचीपर्यंतच्या सर्व पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. या अडचणीच्या ठिकाणी असलेल्या झाडाचा आधार घेऊन हा भाग पार करावा लागतो. पुढे ५-६ पायऱ्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूस कातळकडा व दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. कातळकड्याला लागून बांधीव १०-१२ पाय‍र्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
खांडस गावातून पदरगडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. उतरण्यासही तेवढाच वेळ लागतो.
राहाण्याची सोय :
गडावरील गुहेत रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय :
गडावरील पाण्याची सर्व टाकी बुजलेली असल्यामुळे गडावर पिण्याचे पाणी नाही. गणेश (गणपती) घाटातील विहिरीला जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. याठिकाणी पाणी भरून घ्यावे कारण गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
खांडस गावातून पदरगडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. उतरण्यासही तेवढाच वेळ लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा व त्यानंतरचे २ महिने हा ट्रेक करू नये. तसेच एप्रिल - मे महिन्यात ट्रेक करणार असल्यास पाण्याचा जास्तीचा साठा बरोबर बाळगावा लागतो.
सूचना :
१) पदरगड सर करण्यासाठी गिर्यारोहण/ प्रस्त्ररारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२) सोबत १०० फूटी व ३०फूटी असे दोन वेगवेगळे दोर घेतल्यास दोनही कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही. दोन्ही रॉक पॅचमध्ये व पहिल्या रॉकपॅच पूर्वी जागा अरुंद असल्यामुळे २ ते ३ जणांपेक्षा अधिक माणसे उभी राहू शकत नाहीत त्यासाठी दोन रोप असलेले चांगले.
३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
४) गावात कातळटप्प्याची माहिती असणारे वाटाडे आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांची मदत घ्यावी.
५) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
६) हा एक दिवसाचा ट्रेक असला तरी उतरे पर्यंत अंधार होतो. त्यामुळे सोबत टॉर्च बाळगाव्यात.
७) पावसाळा व त्यानंतरचे २ महिने हा ट्रेक करू नये. तसेच एप्रिल - मे महिन्यात ट्रेक करणार असल्यास पाण्याचा जास्तीचा साठा बरोबर बाळगावा लागतो.