ज्ञानदीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानदीप हा मुंबई दूरदर्शन केंद्रावरील मुंबई शहर समाज शिक्षण समितीच्या प्रेरणेने सुरू झालेला अनौपचारिक प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम होता. आकाशानंद तो सादर करीत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दूरदर्शनने हा कार्यक्रम बंद केला. “ज्ञानदीप” मालवला असला तरी १५०० ज्ञानदीप मंडळे आणि ज्ञानदीपचे मासिक “ज्योत एक सेवेची” हे २७ वर्षांहून अधिक वर्षे चालू होते. कार्यक्रम आपला वाटावा यासाठी “सहभागी-कलाकार प्रेक्षकांमधूनच निवडावे’ ही गोष्ट आकाशानंद लंडनमध्ये असताना शिकले आणि त्यामुळे ज्ञानदीपमध्ये, ज्ञानदीप मंडळाचे सभासदच बहुतेक कार्यक्रम जिव्हाळ्याने सादर करीत आणि त्यातून त्यांनी स्वतःलाच दिलेल्या संदेशांचे निष्ठेने पालन करीत.

ज्ञानदीपमधून ज्या मुलाखतींच्या मालिका प्रसारित झाल्या त्या केवळ अद्वितीय ठरल्या.. दुसरीकडे कुठेच अशा मुलखती आजवर पाहायला मिळाल्या नाहीत. उदा० जागतिक कीर्तीच्या मुलांच्या मातांच्या मुलाखती. यांत पु.ल.देशपांडे, जयंत नारळीकर, सुनील गावसकर इत्यादींच्या मातांनी जुनी छायाचित्रे दाखवून प्रेक्षकांशी सुसंवाद साधला. ’कल्पवृक्ष कन्येसाठी’ या कार्यक्रमात लोकमान्य कन्यांनी आपल्या कीर्तिमान वडिलांचा वारसा कसा जोपासला हे सांगितले. ता कार्यक्रमात लता मंगेशकर, भारती मालवणकर, अनुप देशमुख, (राजा नेनेंची मुलगी) श्रीमती जोशी, संत तुकारामांच्या भूमिका वठवणाऱ्या विष्णूपंत पागनिसांची कन्या इत्यादींचा सहभाग होता.’ऊन-पाऊस’ नावाच्या कार्यक्रमात सेवाधर्मी वृद्ध जोडप्यांशी बातचीत केली जाई. कर्वे जोडपे हे त्यांपैकी एक.

एका विशिष्ट दिवशी लोक आपापल्या देशात GLOBAL UNITYची शपथ घेतात. ज्ञानदीप मंडळांचे सदस्य जुहू समुद्र किनाऱ्यावर दर गुढीपाडव्याला अशीच शपथ घेतात. हा उपक्रम २०हून अधिक वर्षे चालू आहे. तो इतका चालत असे की लोक हजारोंच्या संख्येने आलेल्या ज्ञानदीप सदस्यांना, विशेषतः जोडप्याने आलेल्या सदस्यांना पाहण्यासाठी उपस्थित रहात. टाइम्स ऑफ इंडियाने तर एका वर्षी, पानभर मजकुरात अर्धा पान समूह छायाचित्रे छापून या कार्यक्रमाला अमाप प्रसिद्धी दिली होती.

ज्ञानदीपवर झालेल्या देहदानावरील नाटिका बघून प्रेरित झालेल्या अनेकांनी देहदान पत्रे भरली. त्यानंतर पुढील वर्षांत ज्यांचा मृत्यू झाला देहदानाची इच्छा पूर्ण करण्यास आली आहे. आयुधचे संपादक म.कृ.सावंत, तळेगावचे प्रा. नाना पटवर्धन, शशिकलाबेन आणि त्यांचे बंधू रमेश, मेहताभाई, डॉ. एच.एम. गरूड अशा कित्येकांनी यशस्वीपणे देहदान केले आहे. “मरावे परी नेत्ररूपी उरावे” हे डॉ. गोविंद खरे यांचे ज्ञानदीपमधील कीर्तन ऐकून त्यातून प्रेरणा घेऊन पुण्याच्या “तेजस” ज्ञानदीप मंडळाच्या सभासदांनी घरोघरी फिरून नेत्रदानाची २५० आवेदनपत्रे भरून आणली व ससून हॉस्पिटलमध्ये नेऊन दिली. मागे एकदा हार्बर लाईनवर लोकलला अपघात होऊन सायन रुग्णालयात जखमींना हलवण्यात आले होते. त्यावेळी टीव्ही वरून भक्ती बर्वे यांनी दिलेल्या बातम्यांनंतरच्या अहवालाला प्रतिसाद देऊन अनेक ज्ञानदीप मंडळाच्या सभासदांनी इस्पितळात जाऊन त्वरित रक्तदान केले होते.

नाशिक जिल्हा ज्ञानदीप मंडळाने, एकूण ११११ आदिवासी आणि सर्व धर्मीय जोडप्यांचा विवाह पोलीस परेड मैदानावरील भव्य शामियानात एकाच दिवशी आणि एकाच मुहूर्तावर लावण्याचा उपक्रम केला होता. ही घटना गिनीज बुकमध्ये नोंदविली जाण्याइतकी एकमेवाद्वितीय होती

या ज्ञानदीप मंडळांचा एक महासंघ आहे. हा महासंघ लोणावळ्यात आदिवासींकरिता, अनेक ठिकाणी बालमंदिरे, बोरीवलीत महिलांसाठी व इगतपुरीतील ८ एकरात वृद्धांसाठी आश्रम चालवीत आहे. हा महासंघ अनेक ठिकाणी आरोग्यसेवा, महिला साक्षरता आणि असेच काही लहान मोठे उपक्रम स्वतःच्या वास्तू उभारून चालवीत आहे ज्ञानदीपने कोणत्याही सामाजिक कार्यासाठी सरकारला एका पैशाचीसुद्धा मदत मागितलेली नाही, आणि कोणत्याही पक्षाच्या सरकराने आपणहून दिली नाही. महासंघाची सर्व कामे स्वतंत्र रजिस्टर्ड ट्रस्टमार्फत शिस्तबद्ध रीतीने चालतात .

ज्ञानदीपवरून प्रेरणा घेऊन दिल्ली दूरदर्शन केंद्राने कुमार वासुदेव यांनी दिग्दर्शित केलेली ’हमलोग’ ही मालिका बनवली आणि प्रसारित केली. १९८५ मध्ये दिल्लीहून हिंदी ज्ञानदीप सुरू करण्यात आला पण निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अभावी तो फक्त दोन वर्षेच टिकला.

’ज्ञानदीप’वर मालाडच्या अमिता भिडे यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी प्राप्त केली.

ज्ञानदीप या कार्यक्रमावर बी.बी.सी. टीव्हीच्या वरिष्ठ निर्मात्या एलिiझाबेध स्मिथ यांनी मुंबईत येऊन एक डॉक्युमेंटरी बनवली आणि तिला नाव दिले DNYANDEEP-UINIQUE IN THE WORLD. ती करण्यापूर्वी एलिझाबेथ यांनी पुण्यातील आणि लोणावळ्यातील अनेक ज्ञानदीप मंडळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या होता. ही डॉक्य़ुमेंटरी २६ जानेवारी १९८५ रोजी जगभरात प्रसारित झाली.