कडोली साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उचगाव साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

कडोली साहित्य संघ ही संस्था दरवर्षी कडोली साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील कडोली या तालुक्यात भरवते. १४-१५ जानेवारी, २०१२ रोजी झालेले अधिवेशन २७वे होते. संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते.

कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी साहित्य संमेलनाने रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा कर्नाटक सरकार हे दोघेही या संमेलनाला आर्थिक मदत करत नाहीत.

कडोली प्रमाणेच कर्नाटकातल्या उचगाव, येळ्ळूर, चामरा, बेळगल्ली, माचीगड, काडदगा, सांबरा, बेळकुंद्री आणि कुद्रेमुख अशा आणखी आठ-नऊ गावांमध्येही दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांकरता बेळगाव, कारवार, विजापूर, हुबळी या भागांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातूनही लेखक-कवी येत असतात. माचीगडला २७-१२-२०१०ला झालेले संमेलन तिथले १३वे होते. संमेलनाध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे हे होते.

बेळगावजवळील कडोली, उचगाव, येलूर, माचीघर या परिसरात गेली सन १९८४पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरत असते. दि. २४ डिसेंबर २००६ रोजी प्रथमच सांबरा गावी साहित्य संमेलन संपन्न झाले.

२९वे कडोली साहित्य संमेलन[संपादन]

मराठी साहित्य संघ कडोली, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव, `अक्षरयात्रा’ दै. तरुण भारत व कडोली ग्रामस्थ आयोजित २९वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी २०१४ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष कोल्हापूरचे प्रा. कृष्णात तुकाराम खोत होते.

संमेलन चार सत्रात झाले. पहिल्या सत्रात उद्‌घाटन समारंभ, त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. कृष्णात खोत यांचे अध्यक्षीय भाषण होते. दुसऱ्या सत्रात दुपारी प्राचार्य आनंद मेणसे यांचे `सामाजिक परिवर्तनाची दिशा’ या विषयावर व्याख्यान झाले.. तिसऱ्या सत्रात दुपारी २ ते २-३० या वेळेत बक्षीस वितरण समारंभ व नंतर ३-३० पर्यंत निमंत्रित नवोदितांचे कवी संमेलन झाले. चौथ्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत निमंत्रितांचे कवि संमेलन झाले. या कविसंमेलनात कवी इंद्रजीत धुले (मंगळवेढा), कवी शिवाजी महादेव सातपुते (मंगळवेढा), कवी तुकाराम शिवराम धांडे (इंगलपुरी नाशिक) आदी कवींचा सहभाग होता..कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे कवी मनोहर रणपिसे होते.

यापूर्वी आणि यानंतर झालेली कडोली साहित्य संमेलने[संपादन]

  • २७वे : १४-१५ जानेवारी, २०१२
  • २५वे : ९-१०जानेवारी, २०१०, संमेलनाध्यक्ष : रा.रं.बोराडे
  • २४वे : केले या गावी, ११-१२ जानेवारी, २००९, संमेलनाध्यक्ष : अशोक कामत
  • २१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे
  • कडोली मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित ३३वे मराठी साहित्य संमेलन १४ जानेवारी २०१८ रोजी झाले. अध्यक्षपदी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे होते.
  • ३४वे कडोली साहित्य संमेलन १४ जानेवारी २०१९ रोजी झाले. प्रा. शेषराव मोहिते संमेलनाध्यक्ष होते.
  • ३५वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बालाजी जाधव होते.